Swatantra Veer Savarkar Review : गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव संपूर्ण देशात एकदा चर्चिले जात आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावे म्हणून काही राजकीय पक्ष मागणी करीत आहेत तर काही राजकीय पक्ष सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हते तर माफीवीर होते असे म्हणत आहेत. राहुल गांधींनी तर मी राहुल गांधी आहे सावरकर नाही असेही एकदा म्हटले होते. त्यामुळे ज्यांना सावरकरांविषयी काहीही माहिती नाही त्यांनाही सावरकरांचे नाव ठाऊक झाले होते. आताची आणि मागील पिढी सावरकरांचे फक्त नाव ऐकून आहे. त्यांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेविषयी त्यांना माहिती आहे. 


पण स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे कसे आणि किती योगदान आहे, अनेक क्रांतिकारकांना त्यांनी कसे प्रभावित केले हे जसे तरुण पिढीला माहिती नाही, तसेच ते किती मोठे साहित्यिक होते, मराठी भाषेत त्यांनी किती नवीन शब्दांची भर टाकली हेसुद्धा त्यांना ठाऊक नाही कारण तो इतिहास समोर आलाच नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांविषयीही जास्त माहिती कोणाला नाही. किंवा सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकातून जेवढे सावरकर समोर आले तेवढेच समजले असेल. केवळ तरुणच नव्हे तर देशातील अनेकांना सावरकरांबाबत माहिती नसेल. आणि हीच बाब रणदीप हुड्डाने लक्षात घेतली आहे. सावरकरांनी केलेला त्याग योग्य पद्धतीने भारतीय जनतेसमोर आलाच नाही.


‘व्हू किल्ड हिज स्टोरी’ ही टॅगलाईन घेऊनच रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची महागाथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याने फक्त अभिनयच केलेला आहे असे नाही तर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यानेच केलेले आहे. दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रयत्नात त्याने सिक्सर मारला आहे असे म्हणावेसे वाटते. एका चित्रपटात मावेल इतकेच सावरकरांचे काम नाही, तर त्यासाठी चित्रपटांची शृंखलाच काढावी लागेल. पण रणदीप हुड्डाने एकाच चित्रपटात सावरकर पूर्णपणे उभे केले आहेत. 


चित्रपटाची सुरुवात अठराव्या शतकाच्या शेवटापासून होते. 1896 च्या आसपास देशात प्लेगची साथ पसरलेली होती. इंग्रज सरकार प्लेग झालेल्यांना जीवंत जाळत असे. तेव्हापासून लहान विनायकचा इंग्रजांवर राग होता. इंग्रजांविरुद्ध काही तरी करायला हवे असे त्याला वाटत असे. त्यातूनच तो देशसेवेची शपथ घेतो आणि मोठा भाऊ गणेशसोबत अभिनव भारत संघटनेची स्थापना करतो. या संघटनेच्या माध्यमातून तो युवकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देतो. विनायकच्या कामाची लोकमान्य टिळकांना माहिती होते. लोकमान्य टिळक जहालवादी असल्याने ते विनायकला मदत करतात. 


कायद्याची माहिती व्हावी म्हणून विनायक वकिलीचा अभ्यास करण्यासाठी लंडनला जातो. तेथेही त्याचे क्रांतिकारक म्हणून काम सुरुच असते. तेथेही अभिनव भारतची शाखा सुरु केली जाते आणि त्याचे काही सहकारी इंग्रज अधिकाऱ्यांना यमसदनी धाडतात. त्यामुळे इंग्रजांचा विनायक वर राग असतोच. त्यामुळे विनायकला अटक करून अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवले जाते. काळ्या पाण्याची शिक्षा ते भारताला स्वातंत्र्य मिळणे आणि सावरकरांचे निधन असा टप्पा चित्रपट गाठतो. गांधींजींच्या अहिंसेने नव्हे तर हिंसेनेच देशाला लवकर स्वातंत्र्य मिळेल असे सावरकरांना वाटत असते आणि त्यावरच या चित्रपटात भर दिला आहे.


जवळ जवळ तीन तासाच्या या चित्रपटात सावरकर सामावणे शक्य नाही, पण रणदीप हूडाने हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. सावकरांच्या जीवनावर चित्रपट बनवायचा म्हणजे त्याची डॉक्यूमेंट्री होण्याची भीती होती, पण रणदीपने तसे होऊ दिले नाही. चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका अक्षरशः जगला आहे. चित्रपट पाहाताना आपण सावरकरांनाच पाहतो आहोत असे वाटते. आणि मला वाटते रणदीप अर्धी लढाई येथेच जिंकला आहे. त्याने पडद्यावर सावरकर हुबेहूब साकार केले आहेत. 


लंडनमधील सावरकर असोत. अंदमानातील असोत वा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातील सावरकर असोत त्याने ते अगदी उत्कृष्टरित्या साकारले आहेत. या चित्रपटाचे हे मोठे यश म्हणावे लागेल. स्वातंत्र्यवीराची भूमिका फक्त गेटअप घेऊन साकारली म्हणजे ती चांगली होते असे नाही तर त्या भूमिकेत जगावे लागते आणि ते रणदीपने केले आहे. अंदमानातील दृश्यांमध्ये रणदीपचा अभिनय कमालीचा झाला आहे.


सावरकरांच्या पत्नीची यशोदाबाईंची भूमिका अंकिता लोखंडेने साकारली आहे. तिच्या भूमिकेची लांबी जास्त नाही पण तिने यशोदाबाईच्या भूमिकेत जीव ओतला आहे. अमित सियालने सावरकरांच्या मोठ्या भावाची गणेशची भूमिका साकारली आहे. त्यानेही गणेशच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. अन्य भूमिकांमध्ये 


याचे एक महत्वाचे कारण मला वाटते चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनीही रणदीपने करणे हेच असावे. मुळात रणदीप हूडाला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट बनवावासा वाटणे हीच एक मोठी गोष्ट आहे. चित्रपटाची कथाही त्याने उत्कर्ष नैथानीसोबत लिहिली आहे. सावरकरांची गाथा एक दिग्दर्शक म्हणूनही रणदीपने खूपच चांगल्या प्रकारे प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची दक्षता घेऊन पडद्यावर मांडली आहे. सावरकरांच्या माफीबाबत खूप चर्चा होते त्याबाबतही चित्रपटात सविस्तरपणे दाखवण्यात आले आहे. गांधींजींचे आणि सावरकराचे विचार यातील फरकही त्याने चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. 


मदनलाल धिंग्रा, नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांच्या जीवनात कसे येतात, सावरकर त्यांना कसे प्रभावित करतात तेही रणदीपने दाखवले आहे. निलेश वाघ याने 1900 च्या काळाचे सेट उत्कृष्टपणे तयार केले आहेत तर सिनेमॅटोग्राफर अरविंद कृष्णा यांनी  19 व्या शतकातील काळ कॅमेऱ्यावर तेवढयाच चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. हितेश मोडक आणि श्रेयस पुराणिक यांचे चित्रपटाला संगीत आहे. चित्रपटातील गाणे काही खास नाही पण चित्रपटाच्या शेवटी सावरकरांवर मराठी रॅप साँग आहे ते अवश्य ऐकण्यासारखे आहे.


एकूणच सावरकरांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबाबत माहिती हवी असेल तर आणि सावरकर जाणून घ्यायचे असतील तर हा चित्रपट अवश्य पाहावा.


मी या सिनेमाला देतोय 3 स्टार्स