काही दिवसांपूर्वीच एक वाक्य  वाचलं होतं जे मला प्रचंड आवडलं.   ते वाक्य असं होतं की, एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. मला वाटतं त्या उत्तरं सापडण्याची गोष्ट म्हणजेच  'झिम्मा 2' हा सिनेमा. सहजता ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू. जे काही दिसतं, जे काही घडतं ते अगदी सहज. आम्ही काही तरी सांगतो आहोत असा आव अजिबात न आणता तरीही खूप काही सांगून जाणारी ही गोष्ट आपल्या प्रत्येकानेच अनुभवायला हवी. 


एखादा सिनेमा सुपरहिट ठरला म्हणजे त्याच्या यशाचा फ़ॉर्म्युला सेट झाला असं अजिबात म्हणता येत नाही. किंबहुना तो प्रयोग पुन्हा करायला जातो तेव्हा त्यात अपयशाचीच शक्यता जास्त असते. झिम्मा 2 च्या बाबतीत तो धोका नक्कीच होता. पण हेमंत ढोमे त्याला पुरून उरलाय. सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून ते एण्ड स्क्रोलपर्यंत प्रेक्षकांना एक छान सुखद अनुभव देण्यात यशस्वी झालाय. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर ‘फील गूड’ जॉनरचा हा सिनेमा आहे. 


अर्थात हे गूड फिलिंग वरवरचं नाहीये. समजून उमजून तावून सुलाखून आलेलं शहाणपण आहे. प्रश्न आहेत, समस्या आहेत, एकटेपण आहे, आजारपण आहे, न दिसणारं भविष्य आहे प्रत्येक पात्र काही ना काही संघर्ष करतच आहे. पण जेव्हा प्रत्येकजण व्यक्त होतो, आपलं साचलेपण रितं करतो तेव्हा घडणारी जादू हा सिनेमा आपल्यासमोर मांडतो. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसते आणि त्यामागे आपली आपली काहीतरी कारणं असतात आणि जेव्हा कोणीतरी आपल्यासोबत नेमकी तीच गोष्ट करतं तेव्हा आपण प्रचंड चिडतो. त्या चिडण्यामागचं कारण आपल्याला माहित असतं. मात्र समोरचा अनभिज्ञ असतो आणि नेमकं हेच आपण विसरतो. ‘हे त्याला कुठं माहित होतं’ असं एका सीनमध्ये क्षिती जेव्हा बोलते तेव्हा आपणही विचारात पडतो. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या अगदी सहजपणे या सिनेमात येतात. 


मुळात लिखाणाच्या पातळीवर हा सिनेमा खूप सशक्तपणे लिहिला गेलाय. खास करुन पटकथा आणि संवाद. कथेला कसलीच चौकट नसताना आणि सात जणींची परदेशातील सहल असा प्रचंड मोठा कॅन्व्हास असतानाही सिनेमा नेमका झालाय. इरावती कर्णिक आणि  हेमंत ढोमे यांचं लिखाणासाठी कौतुक करायलाच हवं.


अर्थात एका उत्तम गोष्टीला कॅमेऱ्यासमोर तितक्याच उत्तमपणे सादर करणारी यातली कलाकारांची टीम कमाल आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर या साऱ्यांनीच अफ़लातून कामं केली आहेत. मुळात भूमिका कलाकारांकडे पाहूनच लिहिल्यामुळं ती सहजता दिसते.  निर्मिती सावंत आणि रिंकूची केमिस्ट्री भाव खाऊन जाते. 


सत्यजीत शोभा श्रीरामची सिनेमॅटोग्राफी कथेला पूरक आहे. परदेशातलं निसर्ग सौंदर्य दाखवण्याच्या प्रेमात तो पडलेला नाहीये. फैसल महाडिकने केलेलं संकलन गोष्टीतला प्रत्येक पदर आपल्यापर्यंत तितक्याच सहजतेनं पोहोचवतं. जो नेमकेपणा या सिनेमाचा आत्मा आहे,  तो देण्यात संकलन आणि पटकथेचा  मोठा वाटा आहे. क्षितीज पटवर्धनचे शब्द आणि अमितराजचं संगीत गोष्टीला पुढं घेऊन जातं. 


अशा सगळ्या उत्तम गोष्टी असताना खटकणारं फार काही उरत नाही. अगदी सांगायचंच झालं तर उत्तरार्धात सिनेमा काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो. कारण काही सीन्स आपण पुन्हा पुन्हा पाहतोय असं वाटत राहातं.


शेवटी एवढंच सांगेन की नात्यांची, भावनांची, प्रश्नांची आणि सोबत उत्तरांची ही सहल पाहताना तुम्हाला तुमचं प्रतिबिंब नक्की दिसेल. तुमचे प्रश्नही कळतील आणि उत्तरंही मिळतील. आणखी एक गोष्ट आवर्जून सांगेन की हा सिनेमा पाहाताना तुमच्या चेहऱ्यावरचं गोड हसू कायम राहील. या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.