Bhaiyya Ji Review : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee) आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याच्या अभिनयाची रेंज खूपच जबरदस्त आहे. मनोजचे 2023 मध्ये 'गुलमोहर', 'एक बंदा काफी है' आणि 'जोरम' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यांसारख्या असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. मनोजचा 'भैया जी' (Bhaiyya Ji) हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भैया जी' हा मनोजचा 100 वा चित्रपट आहे. त्याने चित्रपटाची निर्मितीही केली आहे. त्याची पत्नीच चित्रपटाची निर्माती आहे. चित्रपटात मनोजचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पण कथानकात मात्र नाविन्य नाही. 


'भैया जी'चं कथानक काय? (Bhaiyya Ji Story) 


'भैया जी' आपल्या लग्नसोहळ्याची तयारी करत आहे आणि दिल्लीहून येणाऱ्या आपल्या छोट्या भावाच्या लग्नाची तयारी करत आहे. त्याचा भाऊ स्टेशवर पोहोचतो. पण तिथे काही कारणाने दबंगचा भाऊ त्याचा जीव घेतो. भैया जीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा हिंसा सोडलेला तो बदला घ्यायला लागतो. तो कशाप्रकारे बदला घेतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 


'भैया जी' कसा आहे? 


'भैया जी' हा चित्रपट 20 ते 25 वर्षांपूर्वी आला असता तर कमाल वाटला असता असं वाटतं. आजच्या घडीला सत्यघटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडत आहेत. मनोज वाजपेयीने आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपट दिलेले आहेत. त्यासमोर हा चित्रपट मात्र त्याचा स्टँडर्ड डाऊन करणारा ठरतो. चित्रपट लवकरच मुळ मुद्द्यावर येतो. अॅक्शन ठिक आहेत. पण चित्रपट मात्र आधीच्या दशकातला वाटतो. सिंगल स्क्रिनवर हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल. पण आजच्या काळातील तरुणांना मात्र हा चित्रपट आवडणार नाही. 


मनोजचा कमाल अभिनय


मनोज वाजपेयीचा अभिनय कमाल आहे.  मनोज आपल्या भूमिकेच्या माध्यमातून तो कमालीचा अभिनेता आहे हे सिद्ध करतो. भावाच्या मृत्यूचा बदला घेणं असो किंवा त्याचा मृत्यून झाल्याने तांडव करणं असो प्रत्येक सीनमध्ये मनोज आपल्या अभिनयाने छाप पाडतो. मनोज या चित्रपटाचा जान आहे. विपिन शर्माने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सुविंदर विक्की कमजोर खलनायकाच्या भूमिकेत आहे. जोया हुसैननेही बरं काम केलं आहे.


अपूर्व सिंह कार्कीने 'भैया जी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याआधी त्यांनी 'एक बंदा काफी है' सारखे शानदार चित्रपट बनवले आहेत. पण इथे मात्र कथानका पासून ते सिलेक्शनपर्यंत काहीतरी गडबड झाली आहे. 20 वर्षांपूर्वी जर त्यांनी हा चित्रपट बनवला असता तर त्याचं कौतुक झालं असतं. आता मात्र त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पण मनोज वाजपेयीच्या अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.