Fighter Movie Review : हॉलीवूडमध्ये (Hollywood) देशभक्तीपर चित्रपट खोऱ्याने बनतात. अमेरिकन सैन्याची, पेंटॉगॉनची ताकद दाखवणारे अनेक चित्रपट आहेत आणि ते बॉक्स ऑफिसवर सुपरहिटही झालेले आहेत. त्यामुळे जगभरात अमेरिकन सैन्य म्हणजे सगळ्यात बलाढ्य ही जी गोष्ट सांगितली जाते त्याची पुष्टी हे चित्रपट करतात. भारतीय सैन्यही कमी नाही, पण त्यांची यशोगाथा दाखवणारे चित्रपट अभावानेच तयार झालेले आहेत. आणि जे तयार झाले त्यापैकी काही सुपरहिटही झाले आहेत. याचे कारण म्हणजे त्यात देशभक्तीसह सगळा मसाला पुरेपूर भरून एक मनोरंजक प्रेक्षकांना बांधून ठेवेल असे होते. 'हकीकत', 'बॉर्डर', '1971', 'लक्ष्य' 'उरी' ही नावे यासाठी घेता येतील. अजूनही अनेक  याच यादीत आता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) अभिनयाने सजलेल्या 'फायटर'चे (Fighter) घेता येईल. या चित्रपटांमध्ये गाझी अटॅकसारख्या चित्रपटाचेही नाव घेता येईल. फार कमी लोकांनी गाझी अटॅक पाहिला असेल. 


"दुनिया में मिल जाएगे आशिक कईं, पर वतन से हसीन सनम नहीं होता, हीरो में, सोने से लिपट कर मरते कई होंगे, तिरंगे से हसीन कफ़न नहीं होता" हा डायलॉग हृतिक रोशन पडद्यावर बोलतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात आणि चित्रपट पुढे कसा असेल याची कल्पना येते. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तयार झालेला हा चित्रपट अत्यंत उत्कृष्टरित्या पडद्यावर साकारण्यात आलेला आहे. टॉप गन वगैरे अशा हॉलीवूडच्या चित्रपटात दिसणारी हवाई हल्ल्याची दृश्ये यात खूपच चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेली आहेत. जर तुम्ही चीनी चित्रपट बॉर्न टू फ्लाय पाहिला असेल तर त्यातीही आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहाणार नाही.


'फायटर'चं कथानक काय आहे? (Fighter Movie Story)


पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर झालेला बालाकोट हल्ला याला धरून चित्रपटाची कथा रचण्यात आलेली आहे. या हल्ल्याची योजना अझहर अख्तर (ऋषभ साहनी) ने आखलेली असते आणि ती पूर्णत्वास नेलेली असते. या अझहर अख्तरचा खात्मा करण्याची जबाबदारी इंडियन एअर फोर्सने विशेषत्वाने तयार केलेल्या स्पेशल टास्क फोर्सवर सोपवली जाते. या टास्क फोर्सचा प्रमुख राकेश जयसिंह (अनिल कपूर) असतो. त्याच्या टीममध्ये शमशेर पठानिया उर्फ पॅटी (हृतिक रोशन), मीनल राठोड उर्फ मिन्नी (दीपिका पदुकोण), सरताज गिल उर्फ़ ताज (करण सिंह ग्रोव्हर) आणि बशीर खान उर्फ बाश (अक्षय ओबेरॉय) असतात. हा टास्क फोर्स पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांचा तळ उद्धस्त करतात पण अझहर वाचतो. यानंतर पाकिस्तानी हवाई दल भारतीय हवाई दलाच्या ठिकाणांवर हल्ला करते. त्यांना प्रत्युत्तर देताना भारताचे दोन जवान ताज आणि बशीर पाकिस्तानच्या हद्दीत जातात. पाकिस्तान त्यांना कैदी बनवते. या दोघांची सुटका करण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर येते.


मात्र क्लायमॅक्सला जाण्यापूर्वी चित्रपटात अनेक घटना घडतात, पॅट आणि मिम्मी एकमेकांवर प्रेम करू लागतात. राकेश जयसिंह पॅटवर एका कारणामुळे नाराज असतो. पॅटचीही एक कहानी असते. मिम्मीची वेगळीच कहानी असते. अशा सगळ्यांची कहानी एकत्र करून सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) फायटरची रचना केली आहे. भारतीय हवाई दलावर आधारित चित्रपट असल्याने यात हवाई हल्ले, हवाई युद्धाची दृश्ये मुबलक प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे ग्राफिक्स असूनही ती दृश्ये खरी वाटतील अशा पद्धतीने तयार करण्यात आलेली आहेत. यासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करणाऱ्या ब्रिटनमधील कंपनी जीएनईजीला पैकीच्या पैकी मार्क दिले पाहिजेत. आणखी विशेष उल्लेख करावा लागेल आणि तो म्हणजे कॅमेरामन सतचित पॉलोसचे. चित्रपटाचे चित्रिकरण त्याने खूपच उत्कृष्टपणे केले आहे.


दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थ आनंदचा हा आठवा चित्रपट आणि निर्माता म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्याचे बँग बँग, वॉर, पठाण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेले आहेत. त्यामुळे त्याला प्रेक्षकांना काय हवे ते बऱ्यापैकी ठाऊक आहे. फायटर हा त्याचे आणखी एक पाऊल पुढे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सिद्धार्थने चित्रपटाची कथा रमण छिब यांच्याबरोबर लिहिली आहे. रमण छिबचे वडील भारतीय हवाई दलात होते आणि रमण छिब यांनी स्वतःही कुमाऊं रेजिमेंटमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलातील कामाची त्यांना चांगलीच माहिती आहे. चित्रपट मध्ये मध्ये रेंगाळतो मात्र नंतर लगेचच पकड घेतो. चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. देशभक्ती, अॅक्शन, रोमांस आणि इमोशनची चांगली गुंफण सिद्धार्थ आणि रमण यांनी केलेली आहे.


कलाकारांच्या अभिनयाची कमाल


सगळ्यात जास्त प्रशंसा करावी लागेल ती पॅट झालेल्या हृतिक रोशनची. स्वतःला पायलट नव्हे तर फायटर समजणाऱ्या पॅटची भूमिका ऋतिक जगलाय असे म्हणावेसे वाटते. त्याचे इमोशन, त्याचे स्टंट, त्याचा एटीट्यूड आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी खूपच चांगली आहे.


हृतिक रोशनसोबतच राकेश जयसिंह बनलेल्या अनिल कपूरनेही (Anil Kapoor) चांगलेच प्रभावित केलेले आहे. दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) मिम्मीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध भारतीय हवाई दलात पायलट होण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करणारी आणि स्वतःची कर्तबगारी सिद्ध करून आईवडिलांना मान उंच करायला लावणाऱ्या मिम्मीच्या भूमिकेत दीपिका आवडेल अशीच आहे. हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्रीही चांगलीच जमली आहे.


खलनायक बनलेल्या ऋषभ साहनीला खरे तर खूप काही करण्यासारखे होते पण त्याची भूमिका प्रखरपणे लिहिलेली नसल्याने त्याला काही करता आले नाही. फक्त वाढवलेले केस आणि एक डोळा लाल असा गेटअप घेऊन त्याने खलनायक अझहर साकारला आहे, पण तो प्रभावी वाटत नाही. विशाल-शेखर यांचे संगीत ठीकठाक आहे.


प्रजासत्ताक दिन असल्याने देशभरात देशभक्तीचा माहौल आहे आणि फायटर देशभक्ती जागवणारा चित्रपट आहे. चित्रपट एकदा पाहण्यास हरकत नाही आणि तो ही मोठ्या पडद्यावर.