Travel : गोमू माहेरला जाते हो नाखवा.. तिच्या घोवाला कोकण दाखवा... हे गाणं ऐकायला जितकं छान वाटतं. तितकंच कोकणचं (Konkan Travel) सौंदर्यही अप्रतिम आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्याची तशी सर्वांनाच भूरळ पडते, केवळ महाराष्ट्रातूनच नाही, तर भारतात विविध ठिकाणी राहणारे पर्यटकही या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रातील रत्नागिरी ही निसर्गप्रेमींची पहिली पसंती आहे, येथे भेट देण्याचे अनेक पर्याय आहेत. निसर्गाच हे अनोखं रूप डोळ्याचं पारणं फेडणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील नदी, डोंगर, दरी यात अधिकच खुलून दिसतात. मात्र मे महिन्यात जर कोकण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करू शकता..



समुद्रकिनारे, हिरवळीने रत्नागिरीचे सौंदर्य वाढते


महाराष्ट्रातील रत्नागिरी हे केवळ आंबा आणि माशांसाठी प्रसिद्ध नाही तर ते अतिशय सुंदर ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा परिसर एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पर्वतांनी वेढलेला आहे. येथे विविध प्रकारची औषधी झाडे, समुद्रकिनारे आणि भरपूर हिरवळ यामुळे परिसराचे सौंदर्य वाढते. वर्षातील बहुतेक महिने येथील हवामान आल्हाददायक असते. रत्नागिरीमध्ये नैसर्गिक सौंदर्यासाठी अनेक पर्याय आहेत, परंतु जर तुम्हाला भारताचा समृद्ध इतिहास जाणून घेण्यात रस असेल, तर त्या दृष्टिकोनातूनही हे ठिकाण खूप खास आहे. पौराणिक माहितीनुसार, पांडव त्यांच्या वनवासाच्या 13 व्या वर्षी रत्नागिरीच्या आसपास राहिले असल्याचा उल्लेख आहे.


गणेशपुरी मंदिर


रत्नागिरी हे प्रामुख्याने गणेशपुरी येथील 400 वर्ष जुन्या स्वयंभू मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक मान्यतेनुसार, सुमारे 600 वर्षांपूर्वी येथील गावातील प्रमुखाला केवडे वनात खोदकाम करताना ही गणेशमूर्ती सापडल्याचे मानले जाते. हे भारतातील आठ गणपती मंदिरांपैकी एक आहे. प्रत्येकाने या मंदिराची प्रदक्षिणा करावी, अशी श्रद्धा आहे.


आरे-वारे समुद्र


आरे-वारेला दुहेरी समुद्रकिनारा आहे. या समुद्राच्या मध्यभागी एक पूल आहे. समुद्रकिनाऱ्यावर काही ठिकाणी काळी माती तर काही ठिकाणी पांढरी माती आहे. सर्वत्र नारळाची झाडे आहेत, ज्यामुळे त्याचे सौंदर्य द्विगुणित होते. हा समुद्रकिनारा खूप स्वच्छ आहे. जसं की येथे तुम्ही पाण्यात तुमचा चेहरा देखील पाहू शकता.


गणपतीपुळे मंदिर


रत्नागिरीपासून 35 कि. मी. अंतरावर समुद्राच्या किनाऱ्यावर हे सुंदर गणपती मंदिर स्थित आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या ठिकाणी नंदादीप स्थापित केला तर बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी नगारखान्याची व्यवस्था केली. तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली असा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो. येथील सुव्यवस्था आणि सुशोभिकरणामुळे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण बनले आहे. ॉ


जयगड किल्ला


जयगड किल्ला हा ऐतिहासिक असून 16 व्या शतकामध्ये विजापूरकरांनी बांधला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. 1695 पासून हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. तर 1818 मध्ये कोणतीही लढाई न करता इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला असे इतिहासात सांगण्यात येते. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तटबंदी खोल्या दिसतात. तर उजव्या बाजूला प्रशस्त मैदान आणि अनेक वास्तू दिसून येतात. ब्रिटीश काळात येथे दोन मजल्यांचे विश्रामगृह बांधलेले आढळते. तर इथेही गणेश मंदिर असून येथे दीपमाळही आहे. जयगड किल्ला हा 12 एकरमध्ये विस्तारित असून चढायला एकदम सोपा आहे. तर जयगड पोलीस चौकीपासून जाण्यासाठी केवळ 5 मिनिट्स लागतात. 



वेळणेश्वर शिवमंदिर


वेळणेश्वरचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. साधारण 1200 वर्षापूर्वी हे गाव वसलं असं सांगण्यात येते. किनाऱ्यावर वेळणेश्वराचे अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रामध्ये घुसला आहे, त्याला मेरूमंडल असं म्हटलं जातं. या गावाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. महाराष्ट्र शासनाने वेळणेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. हिरव्यागार वनराई, नारळाच्या बागा यामुळे मनाला अधिक प्रसन्नता लाभते. येथे जाण्यासाठी वळणावळांचा रस्ता असल्यामुळे अधिक मजा येते. 


येथे कसे पोहोचायचं?


ट्रेनने तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता. पण गावागावात जायचं असेल तर एस. टी. अथवा बस हा उत्तम पर्याय आहे. तुमचे स्वतःचे वाहन असेल तर अप्रतिमच. रत्नागिरी शहर असो वा तुम्हाला पर्यटनासाठी एखाद्या खेड्यात जायचे असो अनेक हॉटेल्स आणि गावात घरगुती सोयही उपलब्ध आहेत. तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवल्यास, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो. 


रत्नागिरी पर्यटन स्थळ यादी


भाट्ये बीच
पावस 
सागरी मत्सालय आणि संग्रहालय
मांडवी बीच 
थिबा पॅलेस
गणेशगुले बीच 
रत्नदुर्ग किल्ला
गणपतीपुळे मंदिर
जयगड किल्ला
मालगुंड 
वेळणेश्वर शिवमंदिर
कुणकेश्वर 
गुहागर बीच
टिळक अली संग्रहालय
जय विनायक मंदिर जयगड
देवगड समुद्रकिनारा
पूर्णगड किल्ला
धामापूर तलाव
परशुराम मंदिर
बामणघळ


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Travel : भर उन्हात टेन्शन विसराल! जेव्हा 'या' थंडगार धबधब्याचं स्वर्गसुख अनुभवाल.. एकदा भेट देऊन तर बघा...