Sant Nivruttinath Palkhi : 'आनंदाच्या रिंगणात आनंदाचा तरंग | विठूच्या नामाचे गातो आम्ही अभंग ||, ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम..' असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या एक दिवसात पंढरपूरला पोहोचतील. तर अनेक दिंड्या या पंढरपुरात पोहोचल्या असून विठुरायाची नगरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. अशातच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) पंढरपूरच्या जवळ पोहोचली असून कालच्या करकंब येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पांढरीच्या वाडीकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी आष्टीतून मार्गस्थ होत पंढरपूरच्या दिशेने चालू लागली आहे. आज सायंकाळपर्यंत संत मुक्ताबाई विठुरायाच्या चरणी पोहोचतील. 


गेल्या 23 दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातून दिंड्यांनी पंढरपूरकडे कूच केली आहे. अनेक दिंड्या पंढरपुरात पोहोचल्या आहेत. अनेक दिंड्या पंढरपूरच्या मार्गावर आहेत. त्या आज सायंकाळपर्यंत पंढरपूरला (Pandharpur) पोहोचतील. जवळपास 23 दिवसांहून अधिक दिवसांचा पायी प्रवास करत मजल दर मजल करत दिंड्या पंढरपूरला पोहोचत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा पंचविसावा दिवस आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी करकंब येथे मुक्कामी होती. या मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. 


राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आता काही अंतरावर पंढरपूर असून एक दिवसाच्या मुक्कामानंतर दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचणार आहेत. त्यामुळे दिंडीतला वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेला असून कधी एकदाची भेट होतेय, अशी अवस्था वारकऱ्यांची झाली आहे. संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी आष्टी गावात मुक्कामी होती. त्यानंतर आज सकाळी येथून मार्गस्थ होऊन रोपळे येथे दुपारचे जेवण केले जाणार आहे. त्यानंतर आज संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. 


आज पालख्यांचा मुक्काम कुठे?


संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या जवळ पोहोचली असून अवघ्या काही अंतरावर पंढरपूर आहे. अजून एक दिवसांचा मुक्काम केल्यानंतर नाथांच्या पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. आजचा मुक्काम पंढरपूरजवळील पांढरीची वाडी येथे होणार असून त्यानंतर पंढरपूर शहराकडे मार्गस्थ होणार आहे. काल करकंब येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने पांढरीच्या वाडीला मुक्कामाला पोहचणार आहे. संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत 400 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तर आष्टी गावातील मुक्कामानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी पायी मार्गाने रोपळे, बाभूळगाव, अढीव, विसावामार्गे पंढरपुरात पोहोचणार आहे. आतापर्यंत मुक्ताईनगरपासून पालखीने तब्बल 448 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.


हेही वाचा


Ashadhi Wari 2023 : विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ येणार; असा असेल संपूर्ण दौरा