Sant Nivruttinath Palkhi : 'चला चला पंढरीला, भेदभाव विसराया, संतांचिया चरणी माथा टेकवाया, चला चला पंढरीला भेदभाव विसराया... असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. टाळ मृदूंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) ने सोलापूर जिल्ह्यात असून कालच्या जेऊर येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी जवळा येथील मुक्कामानंतर पालखी आज दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून शेंद्री गावात मुक्कामी असणार आहे. 


गेल्या एकवीस दिवसांपासून पंढरपुरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. आतापर्यंत अनेक दिंड्यानी एकवीस दिवसांहुन अधिक दिवसांचा प्रवास करत मजल दर मजल करत पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू आहे. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा बावीसावा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. संत निवृत्तीनाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात असून काल जेऊरला मुक्कामी होती. या मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. 


राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल उस्मानाबादच्या जवळा गावी मुक्कामी होती. सोलापूर आणि उस्मानाबादच्या वेशीवर मुक्ताबाईंची पालखी असून आज पालखीचा बावीसावा दिवस आहे. त्यानुसार आज पालखीने जवळा गावातून सोलापूर जिल्ह्याकडे मार्गक्रमण केले आहे. आज वाकडी गावातील ग्रामस्थांकडून दुपारचे जेवण दिले जाणार असून त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून पहिला मुक्काम शेंद्री गावात करणार आहे. 


आज पालख्यांचा मुक्काम कुठे?


संत निवृत्तीनाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली असून काल जेऊरला मुक्कामी होती. त्यानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने जेऊरमार्गे शेलगाव वांगी, पांगरे, कवितगावमार्गे कंदर या गावी मुक्कामाला पोहचणार आहे. संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत ३३९ किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तर जवळा गावात मुक्कामी असलेली संत मुक्ताबाईंची दिंडी पायी मार्गानेशेंद्री गावात मुक्कामाला जाणार आहे. आतापर्यत मुक्ताईनगर पासून पालखीने तब्बल ३८८ किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.