Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्री रामजन्मभूमी (Ramjanmbhumi) वाद हे देशातील एक मोठे प्रकरण आहे. परंतु 5 ऑगस्ट 2020 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला गेला. अयोध्येच्या (Ayodhya) 1528 ते 2020 या संपूर्ण 492 वर्षांच्या इतिहासात अनेक वळणं आली. पौराणिक मान्यतेनुसार, अवध शहर अयोध्या हे मुळात मंदिरांचे शहर होते. असे म्हटले जाते की, अयोध्या शहर भगवान श्री रामाचे पूर्वज विवस्वान (सुर्य) पुत्र वैवस्वत मनू यांनी वसवले होते. त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये महाभारत काळापर्यंत सूर्यवंशी राजांची राजवट कायम होती. भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्या शहरातील दशरथ राजवाड्यात झाला. या शहराचे अतुलनीय सौंदर्य आणि सुंदर वास्तूंचे वर्णन वाल्मिकी रामायणातही केले आहे. म्हणूनच महर्षी वाल्मिकींनी रामायणात अयोध्या नगरीच्या सौंदर्याची तुलना करताना त्याला दुसरे इंद्रलोक म्हटले आहे. परंतु प्रभू श्री रामाने जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या काही काळ सुन्न झाली. असे म्हटले जाते की, प्रभू रामाचा मुलगा कुशने पुन्हा अयोध्येची पुनर्बांधणी केली आणि त्यानंतर सूर्यवंशाच्या पुढील 44 पिढ्यांपर्यंत तिचे अस्तित्व त्या ठिकाणी राहिले. यानंतर महाभारत काळात युद्ध होऊन अयोध्या पुन्हा उद्धव्स्त झाली.


अयोध्येला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिमा


पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी भगवान श्रीरामांनी जलसमाधी घेतल्यावर आणि महाभारत युद्धानंतर अयोध्या उद्धव्स्त होऊन पुन्हा लोकवस्ती निर्माण झाल्याचे वर्णन आहे. पण श्री राम जन्मभूमी अयोध्या आणि येथे बांधलेल्या श्री राम मंदिराला एकदा नव्हे तर अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागले. मुघलांनी अयोध्येला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिमाही सुरू केल्या, मंदिरात बाबरीची रचना उभारण्यात आली, भव्य मंदिरे पाडण्यात आली आणि मशिदी बांधण्यात आल्या. परंतु प्रभू श्रीरामाची जन्मभूमी कधीही नष्ट होऊ शकली नाही. वास्तविक, अयोध्या नगरीचा इतिहास त्रेतायुगाहून जुना आहे. दरम्यान श्री रामजन्मभूमी अयोध्येच्या 500 वर्षांच्या अयोध्या शहरातील वादविवादापासून ते विध्वंस, बांधकाम आणि उद्घाटनापर्यंतच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.


श्री रामजन्मभूमी अयोध्येचा इतिहास 


अयोध्या रामजन्मभूमी हे देशातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या प्रकरणांपैकी एक आहे. रामजन्मभूमीचा इतिहास खूप जुना आहे. श्री रामजन्मभूमीच्या 1528 ते 2023 या संपूर्ण 495 वर्षांच्या इतिहासात अनेक टर्निंग पॉइंट आले. यामध्ये 9 नोव्हेंबर 2019 हा दिवस खूप खास होता, जेव्हा 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऐतिहासिक निकाल दिला.



1528 : मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने वादग्रस्त जागेवर मशीद बांधली. या जागेबाबत हिंदू समाजातील लोकांकडून असा दावा केला जात होता की, हे भगवान रामाचे जन्मस्थान असून या ठिकाणी एक प्राचीन मंदिरही होते. हिंदू पक्षातील लोकांनी सांगितले की मशिदीमध्ये बांधलेल्या तीन घुमटांपैकी एक हे भगवान रामाचे जन्मस्थान आहे.


1853-1949 : 1853 मध्ये प्रथमच श्रीराम जन्मभूमीवर मशीद बांधलेल्या जागेच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. यानंतर, 1859 मध्ये, ब्रिटिश प्रशासनाने विवादित जागेजवळ कुंपण घातले आणि मुस्लिमांना इमारतीच्या आत पूजा करण्याची परवानगी दिली तर हिंदूंना व्यासपीठाजवळ बाहेर पूजा करण्याची परवानगी दिली.


1949 : अयोध्या श्री रामजन्मभूमीचा खरा वाद 23 सप्टेंबर 1949 रोजी झाला, जेव्हा मशिदीत प्रभू रामाच्या मूर्ती सापडल्या. याविषयी हिंदू समाजाचे लोक म्हणू लागले की भगवान राम येथे स्वतः प्रकट झाले आहेत. त्याचवेळी कोणीतरी गुपचूप या मूर्ती येथे ठेवल्याचा आरोप मुस्लिम समाजातील लोकांनी केला. अशा स्थितीत उत्तर प्रदेश सरकारने तातडीने पुतळे तेथून हटवण्याचे आदेश दिले. परंतु धार्मिक भावना दुखावण्याच्या आणि दंगली भडकवण्याच्या भीतीने जिल्हा दंडाधिकारी (डीएम) के के नायर यांनी हा आदेश जारी करण्यास असमर्थता व्यक्त केली. अशाप्रकारे सरकारने वादग्रस्त वास्तु असे मानून कुलूप ठोकले.


1950 : फैजाबादच्या दिवाणी न्यायालयात दोन याचिका दाखल झाल्या. यामध्ये एक वादग्रस्त जमिनीवर रामललाच्या पूजेच्या परवानगीसाठी आणि दुसरी मूर्ती ठेवण्याची परवानगी होती.


1961: यूपी सुन्नी वक्फ बोर्डाने वादग्रस्त जमीन ताब्यात घेण्याची आणि मूर्ती हटवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला.


1984: 1 फेब्रुवारी 1986 रोजी, यूसी पांडे यांच्या याचिकेवर फैजाबाद जिल्हा न्यायाधीश के.एम. पांडे यांनी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आणि इमारतीचे कुलूप काढून टाकण्याचे आदेश दिले.


1992 : ही दंगल ऐतिहासिक होती. 6 डिसेंबर 1992 रोजी विहिंप आणि शिवसेनेसह अनेक हिंदू संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांनी वादग्रस्त इमारत पाडली. त्यामुळे देशभरात जातीय दंगली उसळल्या आणि हजारो लोक मारले गेले.


2002 : हिंदू कार्यकर्त्यांना घेऊन जाणारी गोधरा ट्रेन जाळण्यात आली आणि सुमारे 58 लोक मारले गेले. त्यामुळे गुजरातमध्येही दंगल उसळली आणि या दंगलीत दोन हजारांहून अधिक लोक मारले गेले.


2010 : अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, राम लल्ला विराजमान आणि निर्मोही आखाडा यांच्यात तीन समान भागांमध्ये विभागण्याचे आदेश दिले.


2011 : अयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.


2017 : सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे आवाहन केले आणि भाजपच्या अनेक नेत्यांवरील गुन्हेगारी कटाचे आरोप पुन्हा स्थापित केले गेले.


2019 : 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवले आणि 8 आठवड्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले. यानंतर, 1 ऑगस्ट रोजी, मध्यस्थी पॅनेलने आपला अहवाल सादर केला आणि 2 ऑगस्ट रोजी, मध्यस्थी पॅनेल प्रकरणावर तोडगा काढण्यात सर्वोच्च न्यायालयाला यश आले नाही. दरम्यान, अयोध्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू होती आणि 16 ऑगस्ट 2019 रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.


2019, 09 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने श्री रामजन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला. तर 2.77 एकर वादग्रस्त जमीन हिंदू बाजूने आणि मशिदीसाठी 5 एकर जमीन स्वतंत्रपणे मुस्लिम बाजूस देण्यात आली.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ayodhya Ram Mandir : रामललाचा मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश, जलाधिवास-गंगाधीवास होणार, काय आहे ही परंपरा? जाणून घ्या