Sant Nivruttinath Palkhi : ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो, माझा ज्ञानोबा, "राम कृष्ण हरी... जय जय राम कृष्ण हरी... विठोबा रखुमाई... जय जय विठोबा रखुमाई..." या भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी (Ashadhi Wari) मार्गक्रमण करत आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात असून कालच्या गोगलगाव मुक्कामानंतर दिंडीने राजुरीकडे प्रस्थान केले आहे. तर काल देऊळगाव राजा इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखीचं आज सकाळी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. 


हाती टाळ मृदुंगाचा ध्वनी, मुखी हरिनामाचा गजर करत हजारो भाविक पायी वारी सुरू आहे. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा आठवा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. नगर जिल्ह्यातील गोगलगाव येथे मुक्कामी असलेली  संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे राजुरी गावाकडे मार्गस्थ झाली आहे. आज गोगलगावहुन निघून पुढे संगनमनेर तालुक्यातील लोणी, बाभळेश्वरमार्गे राजुरी येथे मुक्कामी प्रस्थान करणार आहे.


घर, गाव सोडून विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल देऊळगाव राजा येथे मुक्कामी होती. आज पालखीचा आठवा दिवस असून देऊळगाव राजावरून दिंडी पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी वाघरुळ या गावातील मारुती मंदिरात दुपारच्या विसावा घेणार आहे. येथील ज्ञानेश्वर खरात यांच्या वतीने दिंडीला दुपारचे जेवण देण्यात येणार आहे. त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असून जालना शहरातील कन्हैय्या नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसावा घेणार आहे. 


आज पालख्यांचा मुक्काम कुठे?


संत निवृत्तीनाथांची पालखी आज गोगलगाव येथून पायमार्गाने लोणी, बाभळेश्वर या गावावरून जाणार आहे. तर दुपारचे जेवण बाभळेश्वर गावी होणार आहे. तर मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथांची दिंडी राजुरी येथे जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज देऊळगाव राजा येथून वाघरुळ गावामार्गे जालना शहराकडे मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान वाघरुळ गाव ग्रामस्थांकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण जालना शहरात असणार आहे.