Ashadhi wari 2023 : संत तुकाराम महाराज आणि सत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होता. आषाढातील काळे-पांढरे ढग पाहत वारकरी पंढरीची वाट पार करतात. चार वर्षापासून तर 80 वर्षांपर्यंतचे विठ्ठल भक्त वय विसरुन या वारीत तल्लीन झाल्याचं पहायला मिळतं. विठुरायाचा गरज सगळ्यांच्या मुखी सुरु असतो. हा वारकरी जीवाची तमा न बाळगता ऊन, वारा पाऊस विठ्ठलाच्या भक्तीने मार्गस्थ होत असतो. रोज अनेक किलोमीटरचा प्रवास पार करुन विसावा घेतो आणि पुन्हा नवा टप्पा गाठायला तयार होतो. शेकडो वर्षाच्या वारीचं रुप आपल्यातील प्रत्येकाला दाखवण्यासाठी वारीत शेकडो फोटोग्राफर झटत असतात. त्याच्यामुळेच हा वारी सोहळा आपण घरी बसून अनुभवू शकतो. अनेकांनी काढलेले फोटो व्हायरल होतात तर अनेकांनी काही टिपलेले भावनिक क्षण व्हायरल होतात. त्यांच्या या मेहनतीमुळे अनेकांना घरबसल्या विठुरायाचं दर्शन घडतं. अनेकजण वारीत नोकरीतून सुट्ट्या काढून वारीत फोटोग्राफी करायला येतात. या फोटोग्राफीचे ना पैसे मिळत ना त्यातून मोठा पुरस्कार मिळत मात्र याच फोटोग्राफीतून मोठं समाधान मिळतं, अशा भावना सगळा फोटोग्राफर व्यक्त करतात.



'चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, कोणाचे पडलेले दात तर कोणाच्या पायावरच्या भेगा.. उर्जा देते'


22 वर्षांचा केदार कोद्रे लहानपणापासून वारी अनुभवतो आहे. पुण्यातील हडपसर परिसरात पालखीचा दुपारचा मुक्काम असतो. त्याच दरम्यान केदारने वारी पाहिली. केदारच्या वडिलांनादेखील वारी सोहळ्यात रस आहे. हेच बाळकडू त्याला घरुनच मिळाले. लहानपणी वारी पाहत असताना शेकडो आजी आजोबा बघायला मिळतात याचं त्याला कुतूहल वाटायचं. मात्र वारीचे संस्कार आणि वारीची शिस्त त्याला आकर्षित करत होते. कॉलेजमध्ये शिकत असताना त्याना फोटोग्राफीचा छंद होता. त्यानंतर वारीत फोटोग्राफी करण्याचा त्याने निर्णय घेतला. लहानपणी बघितलेल्या शेकडो आजी आजोबांना 2017 पासून तो टिपत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, कोणाचे पडलेले दात तर कोणाच्या पायावरच्या भेगा पाहून वारी कठिण आहे पण पांडुरंग सगळं सोपं करतो याची अनुभूती येते आणि त्यांना टिपण्यात समाधान आणि आनंद मिळतो, असं तो सांगतो. त्याने पुण्यातील महाविद्यालयातून बी कॉमचं शिक्षण घेतलं आहे. मात्र कितीही मोठी नोकरी लागली तरीही वारीतील फोटोग्राफी करायला परत पांडुरंगाच्या वाटेवर येईल, असंही तो उत्साहाने सांगतो. 






 


'सोनी, ओपो कंपनीत फोटोग्राफी करतो, मात्र वारी चुकवत नाही'


लहानपणापासून मुंबईसारख्या धावत्या शहरात वाढलेल्या 29 वर्षाच्या गणेश वनारेचे रिल्स यावर्षी प्रचंड व्हायरल झाले. गणेश हा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. सोनी, ओपो सारख्या कंपनीसाठी फोटोग्राफी करतो. मात्र वारीत फोटोग्राफी किंवा व्हिडीओ ग्राफी करण्यासाठी कामातून सुट्टी घेऊन वारकरी टिपण्यासाठी मुंबईतून आळंदी गाठतो आणि पंढरीच्या वाटेने निघतो. महाराष्ट्रातील सगळे सण विविधरंगी आहेत. याच सणांचे वेगवेगळे रंग टिपण्याचा त्याला छंद आहे. मुंबईचा असल्याने वारी संदर्भात त्याला कोणतीही माहिती नव्हती. सात वर्षांपूर्वी वारीत फोटोग्राफी करायला गेला आणि पांडुरंगाच्या आणि वारकऱ्यांमध्ये देव शोधला. 'अनेकांच्या आईवडिलांना चालता येत नाही मात्र पंढरीला नेण्यासाठी त्याचे मुलं श्रावण बाळ होतात. कोणी व्हिल चेअरवर तर कोणी अगदी खांद्यावर आईवडिलांना घेऊन पंढरीला नेतात. हे पाहून भारावून जातो. धकाधकीच्या आयुष्यात माणसं किती काय करतात, हे वारीत शिकायला मिळतं, असं गणेश सांगतो.


 







पाटबंधारे विभागात शिपाई आहे, पण वारी टिपतो...


वारीत फोटोग्राफी करणारा पंढरपूरचा योगेश लालबेगी वारकऱ्यांचे चेहऱ्यावरीलम भाव टिपण्यासाठी वारीत येतात. ते पंढरपूरला पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून काम करतात. ते सांगतात की, मी गेले 7 वर्ष झालं वारी शूट करतो आहे. वारी हा आनंद सोहळा म्हणून ओळखला जातो. वारी काय आहे, हे त्या सोहळ्याचा भाग झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला तो आनंद घेता येत नाही. वारीमध्ये फोटोग्राफी करत असताना खूप सारे फोटोग्राफर मित्र भेटले आणि विशेष म्हणजे त्या मित्रांना वर्षातून भेटण्याच एकमेव ठिकाण म्हणजे पांडुरंगाची वारीच आहे. वारीमध्ये लोकांचे भाव टिपताना, पावसाच्या सरी अंगावर घेत हरीनामाच्या गजरात प्रवास करताना, जी मजा येते जे समाधान मिळतं त्याची तुलना पैशात करणं अशक्य आहे. वारीतील काही फोटोंना स्पर्धेत बक्षिसं मिळाली. यामुळे नाव लौकिक मिळाला हिच पांडुरंगाने दिलेलं सगळ्यात मोठा प्रसाद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


 


सोहळ्यात हरवून जाण्यासाठी नांदेड ते पुणे प्रवास खास


अवी दास हे मित्रांच्या हट्टामुळे वारीत फोटोग्राफी करु लागले. ते मुळचे नांदेड जिल्ह्यातील भोकरचे. वारीत फोटोग्राफी करण्यासाठी ते खास पुण्यात येतात. त्यानंतर संपूर्ण पंढरपूरपर्यंत प्रवास करतात. ते म्हणतात की, महाराष्ट्राची तेराव्या शतकापासून चालत असलेली अद्भुत ,अप्रतिम , अवर्णनीय परंपरा आहे. मी 8 वर्षपुर्वी मित्रांच्या आग्रहामुळे वारीतील फोटोग्राफीचा अनुभव घ्यावा म्हणून वारीत सामील झालो आणि त्या रमणीय आनंद सोहळ्यात जणू स्वतः ला हरवूनच गेलो. त्यानंतर दरवर्षी वारी कधी सुरू होणार याचीच वाट बघत असतो. वारी टिपताना जो आनंद आम्ही अनुभवतोय तेवढेच डोळे शेवटीला वारीला निरोप देतांना पाणावलेले असतात. विविध अनुभवाने अनेक आठवणीची अविस्मरणीय शिदोरी आम्हाला या वारीमध्ये मिळते.