Relationship Tips : नात्यात तुमचं तुमच्या जोडीदाराशी भांडण किंवा वाद होणे तशी सामान्य गोष्ट आहे. पण भांडण झाल्यावर लगेचच जोडीदाराशी तडजोड करण्याची अनेकांना सवय असते. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जोडीदाराशी वाद झाल्यानंतर तुम्ही ते सोडवण्याचा विचार करता. पण हे करताना तुम्ही केलेल्या तीन चुका महागात पडू शकतात. रिलेशनशिप एक्सपर्टच्या मते,अनेक वेळा जोडीदाराशी समेट घडवण्याच्या प्रक्रियेत काही गोष्टी चुकीच्या ठरतात आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही राहत नाही. आजच्या लेखात आपण या गोष्टींबद्दल बोलणार आहोत.


कळत-नकळत बोलल्याने वाद वाढू लागतो


रिलेशनशिप एक्सपर्टच्या मते, नातेसंबंधांमध्ये वाद कितीही होऊ द्या पण नियमितपणे संवाद होणे महत्वाचे आहे. कारण संवादच अशी एक गोष्ट आहे. जी काही प्रमाणात नातेसंबंध टिकवून ठेवते. कधी कधी आपण अबोला धरून बसतो, एकमेकांचे तोंड पाहणे आवडत नाही.. पण रागाच्या भरात भांडण झाल्यावर काही गोष्टी कळत-नकळत बोलल्याने वाद वाढू लागतो.


वादाचे कारण 


अनेकदा जोडप्यांमधील वाद कालांतराने कमी होतात. पण जर एखाद्या जोडप्याने वाद का केला? त्याची स्वतःला सारखी आठवण करून देत राहिल्यास वाद कधीच संपणार नाही. म्हणून जर तुम्हाला वाद संपवायचा असेल तर वाद कोठून सुरू झाला याबद्दल कधीही बोलू नका, कारण असे केल्याने ठिणगी पुन्हा पेटू शकते. भांडणाची सुरुवात कुठून झाली, यावर चर्चा करून सामंजस्याचा विचार करत असाल तर आपली चूक होत आहे. अनेक वेळा यामुळे पार्टनर आणखी चिडतो.


समेट करण्याचे ढोंग करू नका


रिलेशनशिप एक्सपर्टच्या मते, वाद मिटवण्याचा आणि शांतता राखण्याचा तुमचा हेतू असेल तर ते दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून करा. कारण अनेक वेळा खोट्या भावना समोर येतात आणि मग नवा वाद सुरू होतो. चूक तुमची असेल तर ती सहज मान्य करा, माफ करा आणि समोरच्या व्यक्तीचीही चूक असेल तर गोष्टी आणि परिस्थिती समजून घेऊन प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करा. परंतु काही वेळेस बहुतेक जोडपी केवळ समेट करण्याचे नाटक करतात. रिलेशनशिप एक्सपर्टच्या मते, हे तुमच्या रिलेशनशिपसाठी चांगले नाही, जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत काही समस्या असेल तर त्यावर चर्चा करा आणि त्यावर उपाय शोधा.



अजिबात घाई करू नका


वाद सोडवण्यासाठी घाई करण्यात अर्थ नाही. जर एखाद्या गंभीर विषयावर वादविवाद होत असेल तर आपल्या जोडीदाराला शांत होण्याची संधी द्या. संवादातून तोडगा काढणे हा योग्य मार्ग आहे, पण योग्य संधीची वाट पाहा. रागाच्या भरात योग्य गोष्टही चुकीची वाटते आणि योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसते. भांडणानंतर, मुद्दाम तोच तोच विषय काढणे,  शिवीगाळ करण्याची सवय सोडून द्या, काही काळ एकमेकांना एकटे सोडा. पण त्यानंतर विषय कसा शांत करता येईल याची काळजी घ्या.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Relationship Tips : 'कधीतरी पतीच्याही भावना समजून घ्या की...' नवऱ्याला पत्नीकडून नेमकं काय हवं असतं? 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या