मुंबई : राज्य शासनाची आणि महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद यांची मान्यता न घेता फिजिओथेरपी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था तसेच फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची पदवी न घेता आणि परिषदेकडे नोंदणी न करता बेकायदा पद्धतीने उपचार करणाऱ्या बोगस फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परिषदेमार्फत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 14 अनधिकृत शैक्षणिक संस्थांना आणि 18 अनधिकृत व्यक्तींना कायदेशीर नोटीस देण्यात आल्या असून या संस्था आणि व्यक्तींवर परिषद कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

  


फिजिओथेरपी ही विना औषध आणि विना इंजेक्शन अशी उपचार पद्धती आहे. विविध शास्त्रीय व्यायाम पद्धती आणि मशीनच्या साहाय्याने रुग्णाच्या मांसपेशी मजबूत करून रुग्णांना बरे केले जाते. अस्थिरोग आणि फिजिओथेरपीचा संबंध सर्वसामान्यपणे लोकांना माहित आहे. मात्र, त्यापेक्षाही पुढे जाऊन ही उपचार पद्धती विविध रुग्णांसाठी काम करत असते. सर्वसामन्याच्या मते  फिजिओथेरपी फक्त व्यायाम करून घेतात असा गैरसमज आहे, अनेक अस्थिरोगांचे रुग्ण केवळ योग्य फिजिओथेरपी उपचाराने बरे झाल्याची अनके उदाहरणे आहेत. सध्या कोरोनाच्या काळात या फिजिओथेरपी उपचारांचा अति दक्षता विभागातील रुग्णांना फार मोठा फायदा होत आहे. अनेक रुग्ण व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन लावल्याने झोपून असतात त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी शरीर कुमकुवत झालेले असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना फिजिओथेरपी उपचार घेण्यास सांगितले जाते. या उपचार पद्धतीमुळे रुग्ण हालचाल करून शकतो, बसू शकतो, जे काही डॉक्टरांनी उपचार दिलेले आहेत, त्या उपचारांना फिजिओथेरपी दिल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळतो.


याप्रकणी महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, अध्यक्ष, डॉ सुदीप काळे यांनी काढलेल्या पत्रकात माहिती दिली आहे की, मागील काही वर्षात फिजिओथेरपी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला आहे. तसेच नागरिकांमध्ये फिजिओथेरपी उपचाराचे महत्त्व आणि जागृती वाढलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक संस्थांनी महाराष्ट्र शासनाची आणि महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद यांची मान्यता न घेता  फिजिओथेरपीचे अभ्यासक्रम सुरु केले आहे. महाराष्ट्र अधिनियम 2004 (2) अन्वये परवानगी घेणे बंधनकारक आहे. काही संस्था बेकायदेशीर पणे अभ्यासक्रम राबवित आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणत फसवणूक होत आहे. त्यामुळे कारवाईच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, बुलढाणा या ठिकाणावरील 14 अनधिकृत शैक्षणिक संस्थांना आणि 18 अनधिकृत व्यक्तींना कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत. या संस्थांवर परिषदेने महाराष्ट्र अनधिकृत अभ्यासक्रम आणि अनधिकृत शैक्षणिक संस्था कायदा 2013 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


या अनधिकृत शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत आणि अशा अनधिकृत संस्थां आणि व्यक्ती याची माहित मिळाल्यास या परिषदेस otptcouncil@gmail.com यावर कळवावी,असे आवाहन प्रबंधक दिगंबर बिडवे यांनी केले आहे.