Gokulashtami 2022 : श्रावण महिना सुरु आहे आणि एकामागोमाग सणांची जणू रांगच लागली आहे. याच श्रावणात येणारा आणखी एक महत्वाचा उत्सव म्हणजेच गोपाळकाला अर्थात दहीहंडी. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. मात्र या सणामागची पार्श्वभूमी नेमकी काय हे जाणून घेणे महत्वाचे आहे.     


अशी आहे परंपरा : 


श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो आणि त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण आणि आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला आणि सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची आणि मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात आणि बघणाऱ्यांची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते.


गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू आणि आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत आणि वाटून खात असत असे मानले जाते. गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.


असे करावे व्रत : 


अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या,वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात आणि सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात. अष्टमीच्या दिवशी उपवास करतात आणि देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात. पूजा झाल्यानंतरचे कृत्य अग्नी पुराणात सांगितले आहे. ते असे-' याप्रमाणे पूजा करून पुरुषसूक्ताने, विष्णूसूक्ताने आणि इतर स्तोत्रांनी स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण-इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत ती रात्र घालवावी. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ.चे सिंचन करावे. कारण 'गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक, यांनी परस्परांवर सिंचन आणि लेपन केले'असे भागवतामध्ये वचन आहे, त्यावरून असा विधी प्राप्त होतो. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.


महत्वाच्या बातम्या :