LIVE BLOG : भारतमातेचे वीरपूत्र शहीद संजय राजपूत आणि नितीन राठोड अनंतात विलीन

Background
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांचा समावेश आहे. मूळ मलकापूरचे असलेले संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील वीरपुत्रांवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 40 जवान शहीद झाले असून काही जवान जखमी आहेत. दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.























