मुंबई : झी मराठी वाहिनीवर पुढील सोमवारपासून 'खुलता कळी खुलेना' ही नवी मालिका सुरु होणार आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूडची आघाडीची पार्श्वगायिका श्रेया घोषाल पहिल्यांदाच मराठी मालिकेच्या शीर्षकगीताला आवाज देणार आहे. संगीतकार समीर सप्तीसकरने या शीर्षकगीताला स्वरसाज चढवला आहे.


 
श्रेयाने 'जोगवा' या मराठी चित्रपटातील 'जीव रंगला' गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. त्याचप्रमाणे लय भारी, हॅपी जर्नी, डबल सीट, सैराट सारख्या अनेक चित्रपटांतील गाण्यांना तिचा आवाज लाभला आहे. मात्र मालिकेच्या शीर्षकगीतासाठी गाण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत महालक्ष्मी अय्यर, साधना सरगम यांसारख्या बॉलिवूडमध्ये गाजलेल्या गायिकांनी मराठी मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत.

 
18 जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेची गोष्ट देशपांडे आणि दळवी या दोन कुटुंबांची आहे. उषा नाडकर्णी, सविता प्रभुणे, संजय मोने, लोकेश गुप्ते, शर्वरी लोहकरे, मानसी मागीकर आणि आशा शेलार हे प्रथितयश कलाकार मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

 

 

'सौभाग्यवती'ची पाठवणी, लवकरच नवी मालिका


 
'का रे दुरावा' या मालिकेतील साईप्रसादच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता ओमप्रकाश शिंदे मुख्य व्यक्तिरेखा साकारत असून अभिज्ञा नाईक आणि मयुरी देशपांडे हे नवे चेहरेही मुख्य भूमिकेत आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत, तर संतोष भारत कणेकर यांच्या अथर्व थिएटर्स अॅंड इव्हेंट्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.