प्रशांत दामले आणि कविता लाड एकत्र येणार ही बातमी नाट्यप्रेमींना सुखावणारी होती. नाटकाचे बोर्ड लागले, होर्डिंग्ज लागले. 'मला सांगा सुख म्हणजे..'चं गाणं पुन्हा एकदा रिक्रिएट झालं आणि लोक नॉस्टॅल्जिक झाले. साहजिकच कधी एकदा नाटक येतं असं झालं लोकांना. नाटक आलं आणि लोकांच्या या नाटकावर उड्या पडत आहेत.
या नाटकाचे व्यवस्थापक मंगेश कांबळी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले की, 'या नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. 17 नोव्हेंबरला हे नाटक सुरु झालं. त्यानंतर रोज दोन-दोन प्रयोग लागत आहेत. ते सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यानंतर 22, 23, 24 आदी प्रयोगही काही हाऊसफुल्ल आहेत, तर काही हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. पुढचे प्रयोग ठरले असले, तरी बुकिंग अद्याप सुरु झालेलं नाही. पण ऑनलाईन बुकिंग जोरावर आहे. 17 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात या नाटकाचे जवळपास 60 प्रयोग होतील. हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल होतील यात शंका नाही.'
नाटक रंगतंय साडेतीन तास
अलिकडे लोकांना असलेला वेळ लक्षात घेऊन एक दिवसीय क्रिकेटचे सामने 20-20 वर आले. नाटक-सिनेमांचंही तसंच झालं. अलिकडे सिनेमे 100 मिनिटांवर तर नाटकं दोन तासांवर आली आहेत. पण 'एका लग्नाची पुढची गोष्ट' मात्र त्याला अपवाद ठरतं आहे. मुळात मध्यंतरासह तीन तास असलेलं नाटक आता रंगत रंगत वाढतं आहे. या नाटकाची लांबी आता साडेतीन तास झाली आहे. अर्थात, रसिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून ही लांबी वाढते. पण लोकांचा हशा, टाळ्या आणि वन्समोअर पाहता हा वेळ साडेतीन तासांवर जात आहे.