दया, कुछ तो गडबड है..


यह ऐसे हुआ कैसे..

किसने किया यह..

इसकी सजा तो मिलेगी...

हे डायलॉग्ज आपल्याला नवे नाहीत ना. पण आयरनी अशी की असंच काहीसं झालं ते सीआयडीच्या टीमसोबत. आता बघा हं विचार करा, तब्बल 20 वर्षं जी सीरिअल सुरु आहे, ज्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं ती मालिका जर बंद करायचीच झाली, तर कशी बंद होईल? अरे त्याला ग्रॅण्ड सेंडऑफ मिळेल की नाही? पण असं काही झालं नाही. म्हणूनच कुछ तो गडबड है..

सीआयडी बंद होण्याच्या बातम्या आल्यानंतर, अहो...आम्ही ही मालिका बंद करत नाही. हा अल्पविराम असून आम्ही ती नव्या रुपात आणू, असं चॅनल सांगतं. पण हा अल्पविराम किती अल्प असेल हे सांगायला ते तयार नाहीत. वरवर दोन महिने असं सांगितलं जातं. पण तसं नाही. सीआयडीचं नेमकं झालंय काय ही कोंडी फुटता फुटत नव्हती. पण आता आपण त्या कोंडीचा दरवाजा तोडलेला आहे. बाबो...

बातमी अशी की सीआयडी मालिका बंदच झाली आहे. ती पुढे सुरु होण्याची शक्यता नाही. डिप्लोमॅटिकली बोलायचं, तर हा विराम अल्प नाही. त्यातल्या कलाकारांनाही याबद्दल फार काही माहित नाही. आता सीआयडीचे फॅन किती आहेत सांगा.. तर ही मालिका बंद होतेय हे कळल्यावर एका सीआयडी वेड्या व्यक्तीने थेट चॅनलमध्ये फोन केला. त्यांचं नाव काय होतं माहितीय? शी इज नन अदर दॅन लता मंगेशकर. लतादीदींनी फोन केला चॅनलला. तर त्यांनाही फार काही वेगळं उत्तर मिळालं नाही.

सीआयडीवर होणाऱ्या खर्चाचं कारण निर्मात्याला दिलं आहे. आता ‘दस का दम’ किंवा तत्सम कार्यक्रमांचं बजेट किती हे वेगळं सांगायला नको. पण खर्च हे निमित्त झालं. पण चॅनललाच ही मालिका चालवायची नाही. सीआयडीमधल्या कलाकारांनीही याची आयडिया नाही. एक नक्की, चॅनलला ही मालिका थांबवावी वाटूच शकतं. पण त्याला काहीतरी रीत असायला हवी.

खरंतर, एक ग्रॅण्ड सेंडऑफ या टीमला देता आला असता. तब्बल वीस वर्षं काम केल्यावर दे डिजर्व बेस्ट सेंड ऑफ. एनी वे,सांगायचा मुद्दा असा की सीआयडी बंद झाली आहे. आपण आपापल्या मनात एसीपी प्रद्युम्न, फ्रेडी, दया, अभिजीत, साळुंखे आदींना निरोप देऊ. लई वाईट झालं राव. सीआयडी..असायला हवी होती. देशाच्या अंतर्गत संरक्षण व्यवस्थेला अचानक मोठं भगदाड पडल्यासारखं झालंय. काय सांगायचं आता.