Kedar Shinde on Arya Jadhao : वाद, भांडणं या सगळ्याच गोष्टीमुळे बिग बॉस मराठीचा पाचवा (Bigg Boss Marathi Season 5) सीझन हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं. या सीझनमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या मागच्या काही सीझनमध्ये घडल्या नव्हत्या. त्यातच आर्याने निक्कीवर (Nikki Tamboli) हात उचलला आणि एक खळबळ माजली. विशेष म्हणजे आर्याने (Arya Jadhav) हात जरी उचलला असला तरीही सोशल मीडियावर मात्र आर्याला बराच पाठिंबा मिळत असल्याचं चित्र होतं. पण आर्याने बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं उल्लंघंन केल्याने तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 


हा सगळा प्रकार घडला तरीही कलर्सचे चॅनल हेड केदार शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली नव्हती. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या घटनेवर भाष्य करणंही टाळलं होतं. पण आता नुकतच त्यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकावर भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे आर्याला घराबाहेर का काढलं याचं कारणंही त्यांनी सांगितलं आहे. 


...तर 16 लोकं एकमेकांना मारतच बसले असते'


आर्याला घरातच एखादी शिक्षा करुन ठेवता आलं असतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना केदार शिंदे यांनी म्हटलं की, प्रत्येक खेळाचे काही नियम असतात. तुम्ही एकमेकांवर आरोप करु शकता, काहीही बोलू शकता, धक्का होऊ शकतो पण तुम्ही हात नाही उचलू शकत, हा बिग बॉसचा नियमच आहे.नियम डावलून जर आर्याला घरातच ठेवलं असतं तर दुसऱ्या दिवशी 16 लोकं एकमेकांना घरात मारतच बसले असते. एंडमॉल हा कार्यक्रम चालवतो. त्यामुळे ही घटना  घडल्यानंतर आम्ही तीन दिवस थांबलो होतो. त्यांच्यासोबत चर्चा केली. सगळे नियम बघण्यात आले आणि त्यांनी तो निर्णय घेतला. 


बिग बॉसचा सहावा सीझनही 70 दिवसांचाच असणार का?


केदार शिंदे यांना बिग बॉसचा हा सीझन 70 दिवसांतच का संपवण्यात आला आणि पुढचा बिग बॉस आल्यावर तेच नियम लागून होणार का? की तो 100 दिवसांचा असणार? असा प्रश्न विचारण्यात आला.  या प्रश्नाचं उत्तर देताना केदार शिंदे यांनी म्हटलं की, मी आता कॉर्पोरेटमध्ये काम करतो, तेव्हा काही गोष्टी या मॅनेजमेंटच्या असतात. जेव्हा मॅनेजमेंट आम्हाला या गोष्टी समजावून सांगते, त्याचे परिणाम दुष्परिणाम जे पूर्ण नेटवर्कसाठी असतात, त्यावेळचा विचार करता हा सीझन 70 दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  


ही बातमी वाचा : 


Kedar Shinde : बिग बॉसचा 6वा सीझनही 70 दिवसांचाच असणार? केदार शिंदें म्हणाले...