Kavya Anjali Sakhi Saavali : 'काव्यांजली-सखी सावली' (Kavya Anjali Sakhi Saavali) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत लग्नविशेष भाग रंगणार आहे. प्रितम आणि अंजली अखेर लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नविशेष भागाची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.


प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ


'काव्यांजली- सखी सावली' या मालिकेमध्ये सध्या अंजली प्रितमच्या लग्नाची तयारी सुरू आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून अंजली प्रितमची घट्ट मैत्री पाहायला मिळाली आहे. अखेर अंजलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार, प्रितमच्या स्वरूपात मिळणार आहे. एकेकाळी मैत्रीचे प्रतीक असलेले प्रितम आणि अंजली आता एकमेकांचे जीवनसाथी बनणार आहेत.


अंजली आणि प्रितमचा पारंपरिक लग्न सोहळा


प्रितांजलीच्या मेहंदी, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नासाठी घरातले तर उत्सुक आहेतच. त्याचबरोबर रमा-राघव, राज-कावेरी, आणि अर्जुन-सावी सुद्धा प्रितांजलीच्या मेहेंदी हळदी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. लवकरच अंजली आणि प्रितमचा पारंपरिक लग्न सोहळा पार पडणार आहे. 




अंजली आणि प्रितमच्या लग्नात येणार ट्विस्ट?


अंजली आणि प्रितमचा हा लग्नसोहळा सर्वांसाठीच आनंदाचा असणार आहे. तरीही एकीकडे सुनंदा आणि आशु हे लग्न न व्हावं म्हणून प्रत्येक प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे विश्वजीत आणि श्रेष्ठाचं सत्य कळल्यावर काव्याला मोठा धक्का बसला आहे. तरीही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी ती सगळं दुःख बाजूला करून आनंदाने, उत्साहाने या लग्न सोहळ्यात सामील होणार आहे, कारण आजवर तिने अंजलीसाठी पाहिलेलं एकमेव स्वप्नं आता पूर्ण होणार आहे. पण या स्वप्नाला कोणाची दृष्ट लागणार? की हे स्वप्नं पूर्ण होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना 'काव्यांजली-सखी सावली' या मालिकेचा आगामी भाग पाहायला लागेल.


'काव्यांजली' या मालिकेचं कथानक काय आहे?


'काव्यांजली-सखी सावली'  या मालिकेचा 10 डिसेंबरला दोन तासाचा विशेष भाग पार पडणार आहे. 10 डिसेंबरला दुपारी 12 आणि संध्याकाळी सात वाजता प्रेक्षक ही मालिका पाहू शकतात. 'काव्यांजली' (Kavya Anjali Sakhi Saavali) अश्याच एकमेकींवर प्रेम करणाऱ्या दोन जिवाभावाच्या बहिणींची गोष्ट आहे. या दोघी चुलत बहिणी असल्या तरीदेखील त्यांचं नातं आई - मुलीसारखं आहे. अंजलीचा जन्म झाल्यापासून ती काव्याची मानसकन्या झाली. काव्याचं लग्न झाल्यावर अंजलीने घराची जबाबदारी उचलली.