मुंबई : कलर्स वाहिनीवर गाजलेल्या 'बालिका वधू' मालिकेत 'आनंदी'ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या तोरल रासपुत्राचा घटस्फोट झाला. पाच वर्षांच्या संसारानंतर पती धवलसोबत वेगळं होण्याचा निर्णय तोरलने घेतला.


'हो, आमचा घटस्फोट झाला. तेच आमच्यासाठी सोयीस्कर ठरलं. लग्न वाचवण्यासाठी आम्ही दोघांनीही परोपरीने प्रयत्न केले, पण ते वर्क आऊट झालं नाही. आपल्याला जसं वाटतं, गोष्टी तशा नेहमी होतीलच असं नाही. सध्या आम्ही आनंदात आहोत. धवल आणि मी कायमच चांगले मित्र राहू' अशा भावना तोरलने व्यक्त केल्या आहेत.

तोरल आणि धवल यांनी 2013 मध्ये विवाह केला होता. त्यावेळी 'बालिका वधू' ही मालिका यशाच्या शिखरावर होती. 2015 च्या अखेरीस दोघांमधील मतभेद वाढल्यामुळे तोरल माहेरी परतली होती.

तोरलने 2008 साली धूम मचाओ धूम या कार्यक्रमातून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने यहा के हम सिकंदर, एक नयी छोटीसी जिंदगी यासारख्या मालिकांमध्ये भूमिका केल्या. मात्र बालिका वधू मालिकेने तिला यशाच्या शिखरावर नेलं.

2013 मध्ये आनंदीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जीला तिने रिप्लेस केलं. मालिका संपेपर्यंत म्हणजेच 2016 पर्यंत तोरलच ही भूमिका करत होती.