मुंबई : 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या गाजलेल्या मालिकेतील रोसेश म्हणजेच अभिनेता राजेश शर्मा. राजेशने मनोरंजन विश्वाला तूर्तास रामराम ठोकला असून शेतात घाम गाळायला सुरुवात केली आहे. राजेश सध्या झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेती ही पद्धत अवलंबत आहे.


बिहारमध्ये पाटण्यापासून सव्वाशे किलोमीटर दूर असलेल्या बर्मा गावात राजेश शेती करत आहे. बर्मा गावाला स्मार्ट व्हिलेज करण्याचा ध्यास त्याने घेतला आहे. शेतीविषयी माहिती देतानाच त्याने स्वतः हातात कुदळ घेतली.

राजेशचा जन्म पाटण्याचा. एक दिवस झाडाखाली बसलं असताना त्याच्या डोक्यात आलं, बर्मा गावाची स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करायला हवं. राजेशने गावात जाऊन पाहिलं, तर तिथे कोणत्याच सुविधा नव्हत्या. ना पाणी ना वीज. त्यावेळी त्याने ठरवलं
बर्मा गावाला स्मार्ट व्हिलेज करायचं.

गावात वीज आणि पाणी आणण्यासाठी त्याने अधिकाऱ्यांशी बातचित केली. प्राण्यांचं दूध काढणं, गवत कापणं, शेती याशिवाय राजेश घरातली सर्व कामं करतो. राजेशने शून्य बजेट आध्यात्मिक शेतीची पद्धत निवडली. सुभाष पाळेकरांनी शोधलेली झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेती राजेश पाळत आहे.

झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेती काय आहे?

झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेती निसर्ग, विज्ञान, अध्यात्म आणि अहिंसा यावर आधारित शेतीची पद्धत आहे. यासाठी रासायनिक खतं, गोबर गॅस, जैविक खत किंवा विषारी रासायनिक-जैविक खतं वापरावी लागत नाहीत. एका देशी गायीच्या मदतीने 30 एकर शेती करता येऊ शकते. यासाठी केवळ 10 टक्के पाणी आणि 10 टक्के विजेची गरज असते. म्हणजेच 90 टक्के पाणी आणि विजेची बचत होते.

राजेश 1998 मध्ये त्याच्या प्रेग्नंट बहिणीला भेटायला मुंबईत आला होता. बिहार युनिव्हर्सिटीतून त्याचं पदवी शिक्षण झालं होतं. मुंबईत त्याला झेव्हियर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घ्यायचं होतं. राजेशला त्याच्या मित्राच्या शोमध्ये एक छोटीशी भूमिका मिळाली. मात्र त्याची एक ओळ म्हणता-म्हणताच राजेशच्या नाकी नऊ आले. त्याने तब्बल 20 रिटेक्स घेतले. मात्र त्यावेळी त्याला तब्बल एक हजार रुपयांचं मानधन मिळालं होतं.

2004 मध्ये आलेल्या 'साराभाई' मालिकेच्या पहिल्या सिझनमुळे राजेश प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या, मात्र रोसेशला कोणीच विसरु शकत नाही.