Kiran Mane : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nayay Yatra) नुकताच मुंबईत समारोप झाला. त्याचपार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची (I.N.D.I.A Alliance) सभा देखील शिवाजी पार्कात पार पडली. याच सभेतून इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलीये. शनिवारी लोकसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आणि रविवारी इंडिया आघाडीची सभा पार पडली. यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. या सगळ्यामध्ये किरण माने (Kiran Mane) यांची राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरील एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आलीये. 


किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करत राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टही बऱ्याच चर्चेत येत होत्या. शरद पवारांवरील पोस्ट असो किंवा इलेक्टोरल बॉण्डच्या मुद्द्यावरुन सरकारविरोधात केली टीका असो किरण मानेंच्या प्रत्येक पोस्टनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. सध्या किरण माने यांनी राहुल गांधी यांच्यावर पोस्ट लिहिली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर दादरमधील चैत्यभूमीवरही गेले. त्यांचा चैत्यभूमीवरचा फोटो किरण माने यांनी शेअर केलाय. 


'एकमेव माणूस या सगळ्याच्या विरोधात भक्कमपणे पाय रोवून उभा ठाकलाय'


किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, तथागत बुद्धांनी वैदिकांचे वर्चस्व झुगारून स्वातंत्र्य-समता-बंधुता ही मुल्यं या भुमीत रूजवली... बहराला आणली. नंतरच्या काळात कटकारस्थानानं ती चिरडून टाकून पुन्हा वैदिकांनी मनुस्मृती निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित केलं... डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळून पुन्हा बुद्धविचाराकडे या देशाला नेलं. तथागतांची स्वातंत्र्य-समता-बंधुता ही अनमोल मुल्यं संविधानात उतरवली. त्या जोरावर आपला भारत देश सर्वात मोठी लोकशाही म्हणून जगात सन्मानानं आणि रूबाबात उभा  राहिला.आज पुन्हा ती त्रिसुत्री पायदळी तुडवली जात असताना... 'त्या' विषारी विचारसरणीनं पुन्हा मानवतेचं नरडं आवळलेलं असताना... वर्चस्ववाद्यांच्या पिलावळीचा सोशल मिडीयावर, न्यूज चॅनलवर आणि बाहेरही अर्वाच्य, हिंसक ट्रोलींगचा थयथयाटी उन्माद सुरू असताना.. एकमेव माणूस या सगळ्याच्या विरोधात भक्कमपणे पाय रोवून उभा ठाकलाय. तो म्हणजे राहूल गांधी !



'सगळ्या चौकशांच्या छाताडावर पाय दिलाय'


'काल भारत जोडो यात्रेची सांगता करताना राहुल गांधी चैत्यभुमीवर नतमस्तक झाले ते पहाताना माझं मन भरून आलं... डोळे पाणावले... क्रूर, कपटी, कारस्थानी हुकूमशहांच्या नजरेला नजर भिडवून या माणसानं आज अख्खा देश हलवून टाकलाय. ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स सगळ्या चौकशांच्या छाताडावर पाय दिलाय. बदनामीचा वर्षावाला पुरून उरलाय. काळानं त्याचं चारित्र्य चोवीस कॅरेट सोन्यासारखं लखलखून, झळाळून जगासमोर आणलंय', असं किरण माने यांनी म्हटलं


'सत्याला विजय मिळवूनच देतो'


'काळ' हा लै मोठ्ठा न्यायाधीश असतो भावांनो. सत्याला विजय मिळवूनच देतो. ज्याला मुद्दाम प्लॅनिंग करून पप्पू ठरवायचा प्रयत्न केला गेला, तो आज 'देश की धडकन' बनलाय... ज्याला ओढूनताणून अख्ख्या विश्वाचा गुरू ठरवायचा भिषण प्रयत्न झाला, त्याचे पुर्ण जगात हसे झालेय. बुरखा टराटरा फाटलाय. काळाचा महिमा ! ही निवडणुक नेहमीसारखी नाही. कालची सभा ही प्रचारसभा नव्हती. हा देश आणि बुद्धांची मुल्यं असलेलं संविधान वाचवण्यासाठी केलेला 'क्रांती'चा एल्गार होता ! या ऐतिहासिक प्रसंगी पं. नेहरूंच्या आणि डाॅ. आंबेडकरांच्या वंशजांना त्यांचा विचार पुढं नेणार्‍या मंचावर एकत्र बघणं हा आयुष्यभर काळजात साठवून ठेवावा असा क्षण होता, अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी सोशल मीडियावर केलीये. 


ही बातमी वाचा : 


Elvish Yadav Arrested: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची तस्करी ते एल्विश यादवला अटक, 4 महिन्यांत काय काय घडलं?