Ketki Chitale Angry on BJP Mahayuti : सोशल मीडियावर आपल्या राजकीय सामाजिक मुद्यांवर बेधडक भाष्य करणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत केतकीने थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुम्हाला आता हिंदूंचीही मते नको का असा सवालही तिने केला आहे. वक्फ बोर्डाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर तिने सडकून टीका केली.


राज्यातील महायुती सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करताना केतकीने एक व्हिडीओ जारी केला आहे. केतकीने म्हटले की, आज सकाळीच बातमी वाचून धक्का बसला. या बातमीवर काय बोलावे हे कळत नाही. ज्यांनी मतही दिले नाही, त्यांना बळकट करण्यासाठी 10 कोटी दिले आहेत. तुम्ही बधीर झालाय की आम्हाला बधीर करत आहात असा प्रश्न तिने उपस्थित केला. लोकसभेत पंतप्रधान कोण असेल हे ठरवले होते  आणि त्यानुसार मत दिले होते. विधानसभेत आता कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न पडला असल्याचे केतकीने म्हटले. 


वक्फ बोर्डाच्या मदतीवर आक्षेप, महायुती सरकारवर टीकास्त्र


केतकीने म्हटले की,  देशात मोर्चे काढले जात असून वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी होत आहे. पण तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी दिले आहेत. तुम्हाला आता हिंदू देखील नकोय का, हे ठरवलं आहे का असा सवालही तिने केला. तिघांच्या सरकारमधील एकजण परत काकाकडे जाणार आणि हातापाया पडत मला परत घ्या असे बोलणार. एक जण परत सरकार चालवायला येत नाही म्हणून तीन चाकांची रिक्षा चालवायला जाणार आणि एकजण राजीनामा देतोय पण तो राजीनामा घेतला जात नाही अशी टीकाही तिने केली. तुम्ही विधानसभेत पराभूत व्हायचे आहे असे ठरवले आहे का, असा सवालही केतकीने केला आहे. 


 






वक्फ बोर्डाचे बळकटीकरण कशाला करताय असा प्रश्न तिने उपस्थित केला. उद्या वक्फ बोर्डवाले तुमच्या घरी येतील आणि तुमच्या जमिनीवर दावा करेल, जमीन हडप करेल त्याविरोधात तुम्ही काहीच करू शकत नाही असे म्हणत वक्फ बोर्डाने घेतलेला निर्णय  हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातही बदलता येत नाही असा दावा करत हिंदूच्या जमिनी वक्फ बोर्ड हडप करतील अशी भीती तिने व्यक्त केली. 


मुस्लिम राष्ट्रच जाहीर करा ना...


तुम्ही संघाला तोडलं, आता सनातनी लोकांना तोडताय असे केतकीने म्हटले. निवडणुकीत आपण नोटा या पर्यायाच्या विरोधात होतो. आता मात्र, तिघाडी सरकार तुमच्यामुळे नोटाला मतदान करावं लागणार असल्याचे हताश उद्गगार केतकी चितळे काढले. बंगालमध्ये  ममता दीदी बांगलादेशींना बोलावत आहे, आता तुम्ही रोहिंग्याना मुंबईत वसवा... तुम्ही मुस्लिम राष्ट्र घोषित करा ना..कोणाची वाट पाहताय....महाराष्ट्राचे नामांतर करा...अशा शब्दात केतकीने आपला संताप व्यक्त केला.