Salman Khan :  बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ रविवारी, 14  एप्रिल रोजी गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाला नाही. गोळीबाराच्या घटनेचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे या घटनेवर आपल्या वक्तव्याने वादात अडकणाऱ्या कमाल खानने वेगळेच मत व्यक्त केले आहे. हे सगळं सलमान खानने रचलेले कुंभाड असल्याचे कमाल खानने म्हटले. सलमान खानने स्वत:च  हा बनाव रचून आणला असल्याचा आरोपही त्याने केला. 


अभिनेता कमाल खान हा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत असतो. सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराच्या घटनेनंतर कमाल खानने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. कमाल खानने ट्वीट करत म्हटले की, 'हे सगळं सल्लूचे (सलमान खान) नाटक आहे. सल्लू हा भारतातील सर्वात मोठा गँगस्टर आहे आणि इतर सर्व गुंड त्याच्यासाठी काम करतात. पहाटे 5 वाजता सर्वजण झोपलेले असताना हवेत गोळीबार का केला? प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळावी म्हणून त्याने ही सगळी व्यवस्था केली असावी! कारण त्याला माहित आहे की त्याने सुशांत सिंगला काय केले हे मी उघड करणार आहे, असे कमाल खानने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. 






पुढील ट्वीटमध्ये केआरकेने लिहिले की, सलमान खानच्या वडिलांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. सलीम खान साहेब एक प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे ते सत्य सांगत आहेत, असे कमाल खानने म्हटले. 


दरम्यान, गोळीबाराच्या घटनेवर बोलताना सलीम खान यांनी म्हटले होते की, काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही. गोळीबार करणाऱ्या गुंडांना प्रसिद्धी हवी आहे.   


कमाल खानवर नेटकरी भडकले... 


कमाल खानच्या या ट्वीटवर युजर्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर्सने म्हटले की, 'भाई कधी गौप्यस्फोट करणार आहेस?' आणखी एका युजरने गंमतीत लिहिले की, 'सल्लू भाईला एकदा समोरासमोर भेटा आणि प्रकरण संपवा. गंभीर घटना घडली असताना अशी थट्टा करणे योग्य नसल्याचेही काही युजर्सने म्हटले आहे.