Hema Malini :  अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास बॉलिवूडमध्येही सुरू राहिला. हेमा मालिनी यांनी नायिकेच्या भूमिकेसह खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. भले त्यांनी खलनायकी भूमिका दमदारपणे साकारली असेल, पण प्रेक्षकांनी त्यांना नायिकेच्या भूमिकेत पाहणे पसंत केले. 


हेमा मालिनी यांनी अशाच एका चित्रपटात काम केले, जो त्यांना आता पुन्हा पाहण्याची इच्छा नाही. त्या विषयावर आधारीत असलेल्या चित्रपटातही काम करण्याची त्यांची इच्छा नाही. प्रेक्षकांनी नाकारलेला हा चित्रपट हेमा मालिनींच्या दृष्टीने वाईट चित्रपट ठरला. 


IMDB च्या रिपोर्टनुसार, 19 ऑक्टोबर 1990 रोजी रिलीज झालेला 'जमाई राजा' या चित्रपटाला हेमा मालिनी आपल्या कारकिर्दीतील वाईट चित्रपट मानतात. या चित्रपटात हेमा मालिनी यांच्याशिवाय, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी माधुरी दीक्षितच्या आईची तर अनिल कपूरच्या सासूची भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. कोदंडरामी रेड्डी यांनी केले. चित्रपटातील हेमा मालिनीच्या पात्राचे नाव दुर्गेश्वरी होते, जी एक अतिशय श्रीमंत आणि स्वाभिमानी स्त्री होती.


हेमा मालिनी होत्या नाराज... 


हेमा मालिनी या चित्रपटात आपल्या व्यक्तिरेखेला ज्या पद्धतीने सादर करण्यात आल्या होत्या त्यावरून त्या नाराज होत्या. हेमा मालिनी यांना जसे ब्रीफ करण्यात आले, तशी भूमिका त्यांना देण्यात आली नाही. प्रत्यक्षात चित्रीकरणात ती व्यक्तीरेखा वेगळी होती. हेमा मालिनी या चित्रपटाला आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट चित्रपट असल्याचे म्हटले. 


हेमा मालिनी यांनी चित्रपटात सासूची भूमिका करावी असे अनिल कपूर यांनाही वाटत नव्हते. अनिल कपूरने मुमताजचे नाव सुचवले होते.  मुमताजला आपल्या ऑन-स्क्रीन सासूच्या भूमिकेत अनिल कपूरला पाहायचे होते. मात्र, मुमताजला कोणत्याही किंमतीत चित्रपटांमध्ये परतायचे नव्हते. त्यामुळेच या चित्रपटाला त्यांनी नकार दिला होता.


चित्रपट रिलीज अन् आडवाणींची रथयात्रा... 


19 ऑक्टोबर 1990 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर 'जमाई राजा' चित्रपटगृहात रिलीज झाला होता. रिलीजच्या 3 दिवसात या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पण त्याचवेळी लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा सुरू झाली होती आणि त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी त्यांना रथयात्रे दरम्यान झालेल्या अटकेने देशात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम चित्रपटावरही झाला. अडवाणींची रथयात्रा रिलीज झाली नसती तर कदाचित त्यांच्या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली असती, असे म्हटले जाते.