लक्ष्मी.. अक्षयकुमार, कियारा आडवानी, शरद केळकर, राजेश शर्मा, अश्विनी काळसेकर, आयेशा रझा मिश्रा..ही अशी चांगली स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. लक्ष्मी हा चित्रपट मूळात दाक्षिणात्य इंडस्ट्रीत लोकप्रिय ठरलेल्या कंचनाचा रिमेक आहे. कंचना हा चित्रपट तिकडे प्रदर्शित झाला होता तो 2011 मध्ये. म्हणजे त्यालाही आता 10 वर्ष झाली. आता इतक्या वर्षानंतर कंचनाचा रिमेक करणं हीच पहिला एक मोठा चुकीचा निर्णय वाटतो. शिवाय रिमेक करायचा असेलच तर त्यामध्ये बदलत्या काळानुसार काही बदल अपेक्षित असतात ते न केल्यामुळे लक्ष्मी हा चित्रपट फारच कंटाळवाणा आणि तितकाच निराशाजनक बनतो.


सर्वसाधारणपणे आपण कोणत्या सिनेमाचा रिमेक करतो आहोत.. तो का करतो आहोत. हा रिमेक करताना आता जर काळ बदलला असेल तर चित्रपटाच्या पटकथेत काळानुरुप काही बदल करावे लागतील का याचा विचार आधी करणं अपेक्षित आहे. कारण अलिकडे दर पाच वर्षांनी पिढी बदलताना दिसतेय. हा बदल विचारांचा.. नव्या तंत्रज्ञानाचा आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या शक्यतांचा असायला हवा. अगदीच ढोबल उदाहरण फरहान अख्तरच्या डॉनचं देता येईल. हा सिनेमा चांगला झाला होता की वाईट हा वादाचा मुद्दा आहे. त्यात सध्या आपण पडायला नको. पण डॉन या चित्रपटाचा रिमेक करायचा ठरल्यानंतर नव्या डॉनमध्ये फरहानने काही सरप्राईजेस दिली होती. तशी पटकथाही बदलली. कंचना या चित्रपटाचा रिमेक जवळपास 10 वर्षांनी करताना या चित्रपटात नाविन्य असायला हवं होतं. पण कथा, पटकथा, संवाद या तीनही पातळ्यांवर चित्रपट भयानक निराश करतो. अत्यंत ढोबळ पटकथा आणि संवाद असल्यामुळे या चित्रपटात राजेश शर्मा, अक्षयकुमार यांच्यासारखे कलाकार असूनही चित्रपट थिल्लर वाटत राहतो.


गावातली एक जागाा भुताटकीची जागा म्हणून ओळखली जाात असते. त्या भूतापासून वाचण्यासाठी कुणीही त्या जागेत जात नसतं. अगदी कोणी गेलंच तर या जागेत असलेली काळी सावली त्या घराचं जगणं मुश्कील करत असते. याच गावात बऱ्याच वर्षांनी रश्मी (कियारा आडवानी) आपला पती असीफ (अक्षयकुमार) याच्यासह पहिल्यांदाच माहेरी येते. रश्मीने मुसलमान व्यक्तीशी विवाह केल्यानं रश्मीच्या वडिलांनी तिच्यासोबतचे संबंध तोडलेले असतात. पण आता हे सगळं पॅचअप करायची वेळ आलेली असते. त्याला रश्मीच्या आईचा (आयेशा रझा मिश्रा) यांचा पाठिंबा असतो. यानिमित्ताने असीफ त्या गावात येतो. असीफ अंधश्रद्धा निर्मूलन समितीतही सक्रिय असतो. गावात भुताटकीची जागा आहे हे कळल्यावर गावातल्यांचा हा समज खोटा ठरवण्यासाठी असीफ मुलांना घेऊन त्या जागेत क्रिकेट खेळायला जातो आणि तिथे त्याची गाठ त्या काळ्या सावलीशी पडते. त्यानंतर ही सावली असीफ आणि त्याच्या कुटुंबियांना कशी जेरीस आणते.. ती सावली कुणाची असते.. तो आत्मा का भटकत असतो आदी गोष्टींचा मिळून लक्ष्मी हा चित्रपट बनला आहे.


मुळात दाक्षिणात्य चित्रपटांची ठेवण वेगळी असते. एक नायक-नायिका आणि खलनायिक वास्तवदर्शी ठेवून बाकी सगळ्या व्यक्तिरेखा विनोदी- स्लॅपस्टिक ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यातून 'हास्यास्पद' विनोद निर्मिती होत असते. हे सिनेमे ओरिजिनली दाक्षिणात्य बनावटीचे असल्याने ते पाहताना किमान नाविन्य असतं. पण त्याचा रिमेक करताना दाक्षिणात्य चित्रपटांसाठी वापरलं जाणारं तेच व्याकरण हिंदीत वापरताना ते फारच जुनाट वाटतं. शिवाय तितकंच थिल्लर. हा कॉमेडी थ्रिलर अशा प्रकारात हा चित्रपट मोडत असला, तरी कॉमेडी प्रसंगांतून तयार ीव्हायला हवी. असीफभवतीच्या सगळ्या व्यक्तिरेखा स्लॅपस्टिक केल्यानं सगळा मामला पानचट होतो. भीतीने गाळण उडणे.. किंवा बोबडी वळणे.. या गोष्टी सिनेमात दाखवताना ही भीती कॉमेडी दाखवल्यानं पुढचा सगळा प्रकार खोटाच वाटू लागतो. उरला प्रश्न अक्षयकुमारचा. तर असीफ म्हणून असलेली व्यक्तिरेखा त्याने नेटकी साकारली आहे. त्यात त्याने कॉमेडीही आणली आहे. पण तिथून पुढे त्याची लक्ष्मी होते तेव्हा मात्र पुरतं मातेरं झालेलं असतं. एकतर त्यातही तो अक्षयच वाटतो. परकाया प्रवेश नावाचा काहीही भाग त्यात दिसत नाही. पूर्वार्धामध्ये किमान काही थ्रिल आहे. पण उत्तरार्धात सावळा गोंधळ आहे. या कथानकात लक्ष्मीची (शरद केळकर) एंट्री झाल्यावर तर कथानक वळण घेऊन पार भरकटू लागतं. गाण्यांमध्ये बुर्ज खलिफा हे गाणं ऐकायला चांगलं आहे. ते प्रेक्षणीयही झालं आहे. पण पटकथेत त्याचं येणं हे झेपणारं नाही. अक्षयचं शेवटचं गाणं व्हिज्युअली छान वाटतं. अक्षयचे काही मॅनरिझम्स मस्त दिसतात. पण ते गाणं फार बरं नाही. छायांकन, संकलन, कलादिग्दर्शन आदी प्रकार नेटके झाले आहे. राजेश शर्मा यांनी रश्मीचे वडील चांगले रंगवले आहेत. तर कियारा आडवानी, शरद केळकर आदींनी वाट्याला आलेल्या भूमिका चोख केल्या आहेत. यात अक्षयचंही आता वय दिसू लागलं आहे. तो आहे फिट यात शंकाच नाही. पण व्यक्तिरेखेपेक्षा फारच वयस्कर असा तो वाटू लागला आहे. आता त्याने आपल्या वयाला शोभतील अशा एव्हरग्रीन भूमिका साकारणं उत्तम.


थोडक्यात कंचना हा 2011 मध्ये आलेला चित्रपट होता. त्याचा जशाचा तसा रिमेक करताना साल उजाडलं आहे 2020. साहजिकच आता हा सिनेमा बघताना आपण फार जुना असा सिनेमा पाहातोय की काय असं वाटून जातं. मघाशी म्हटल्याप्रमाणे एक पिढी 12 वर्षांनी बदलायची. आता दर पाच वर्षांनी पिढी बदलते. म्हणजे 10 वर्षांत लोकांच्या विचारात पूर्वीच्या 24 वर्षांचं अंतर आहे. थोडक्यात आपण फारच जुना सिनेमा पाहतो आहे असं जाणवत राहतं. त्यामुळे हा सगळा मामला दुर्लक्ष करुन सोडून देण्यासारखा आहे. 'दुर्लक्ष-मी' असंच हा सिनेमा म्हणतो आहे की काय असं वाटून जातं. ओटीटीवर आला आहे म्हणून सिनेमा पाहायचा असेल तर या सिनेमाची एक फास्ट फॉरवर्ड रपेट मारायला हरकत नाही. दिग्दर्शक राघव लॉरेन्स, अक्षय कुमार आणि निर्माते तुषार कपूर यांचा हा डाव फसला आहे. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळतोय एक स्टार. इट्स टोटली नो बॉल! म्हणूनच आता पुढच्या वर्षात अक्षयकुमारचा सूर्यवंशी येतोय त्यात तो फ्री हिटचा फायदा घेत सिक्सर हाणेल अशी आशा करुया.