मुंबई : गोविंदा नाचू लागला की थिएटरमधलं पब्लिक खुळं व्हायचं. त्याला पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर सगळं मिळालं. पण 'बहुत कुछ पाने के चक्कर मे कभी कभी इन्सान सब कुछ खो देता है' या आंदोलन चित्रपटातील डायलॉगप्रमाणे त्याची अवस्था झाली.


जवळपास दीडशेंपेक्षा जास्त चित्रपटांमधून नायकाचं काम केलेला अभिनेता एके दिवशी खासदार होतो. खासदारकी मिरवतो आणि त्याची टर्म संपल्यावर पुन्हा सिनेसृष्टीत येऊ पाहतो. पण इथेच काहीतरी गडबड होते.

हिरो नं. 1, कुली नं 1, राजाबाबू, जोडी नं. 1 असे एकापेक्षा एक धडाकेबाज सिनेमे देऊनही आता मात्र त्याची झोळी रिकामी असते. एकेकाळी तरुणाईच्या गळ्यातला ताईत ठरलेला गोविंदा आता मात्र नैराश्याच्या गर्तेत गटांगळ्या खात आहे.

आगामी 'रंगीला राजा' चित्रपटाच्या पत्रकार परिषदेतही गोविंदा उदास दिसला. खासदारकी करुन आल्यानंतर आपले सिनेमे मुद्दाम प्रदर्शित होऊ दिले जात नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. राजकीय सत्ताधीश आपल्याला मुद्दाम इंड्स्ट्री बाहेर ठेवण्याचा घाट घालत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं त्याने पोटतिडकीने मांडलं.

एक चित्रपट नऊ वर्षं प्रदर्शित होऊच दिला नाही आणि अखेर तो गेल्या वर्षी आला. या सिनेमाचं नाव होतं फ्राय डे. शुक्रवारवाला फ्राय नव्हे, तळण्यातला फ्राय.

आता रंगीला राजाची गोष्ट मात्र भलतीच वेगळी झाली. पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष. त्यांचा हा सिनेमा असल्यामुळे आपल्याविरोधात कारस्थान रचलं जात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात गोविंदा आल्याने वड्याचं तेल वांग्यावर निघायची शक्यता निर्माण झाली आहे. गोविंदासारख्या कलाकारावर, माजी खासदारावर ही परिस्थिती ओढवत असेल, तर तिथं बाकीच्यांची काय बात?