नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर अजूनही ठाम आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला असला तरी ते आपला निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत राहुल गांधी यांनी निर्णय नाहीच बदलला, तर काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.


मी राजीनामा देतोय म्हटल्यावर लगेच प्रियंकाचं नाव सुचवू नका, गांधी घराण्याबाहेरचं नाव हवंय असं बैठकीत राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेसला एका कुटुंबाचा पक्ष या आरोपातून ते मुक्त करुन इच्छितायत हे उघड आहे. बऱ्याचं कालावधीनंतर पुन्हा काँग्रेसवर गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष शोधण्याची वेळ येऊ शकते.

गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्षासाठी काय काय आहेत पर्याय-

गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष करायचा झाल्यास काँग्रेससमोर नेमके पर्याय तरी काय आहेत.

ए. के. अँन्टोनी

ए. के. अँन्टोनी यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांचं नाव त्यासाठी पहिल्यांदा घेतलं जातं आहे. ज्या केरळनं काँग्रेसला यावेळी भरघोस साथ दिली, त्याच केरळमधून अँन्टोनी येतात. पण त्यांच्या विरोधात जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे त्यांचं वय. भाजपला मात देण्यासाठी वेगानं संघटना उभी करण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारी एनर्जी, नवा विचार अँन्टोनी पक्षाला देऊ शकतील का याबाबत साशंकता आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह

मोदींच्या वादळातही ज्यांनी सहीसलामत आपला किल्ला शाबूत ठेवला, असे काँग्रेसचे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह. पंजाब विधानसभेत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचं कसब दाखवलंय. पण त्यांना अध्यक्ष करायचं झाल्यास सध्या उत्तम घडी बसलेलं पंजाब सोडण्याची रिस्क पक्षाला घ्यावी लागेल. ती घेतली जाणार का हाही प्रश्न आहे.

अशोक गहलोत

सहा महिन्यांपूर्वी अशोक गहलोत हे संघटनेत सर्वात महत्वाचं पद सांभाळत होते. संघटना महासचिव म्हणून त्यांना मिळालेली जबाबदारी ही राहुल गांधींच्या खालोखालच मानली जात होती. पण राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा मोह त्यांना सोडवला नाही. आता पक्षाची पुनर्रचना करताना पुन्हा त्यांना दिल्लीत आणलं जाणार का याची उत्सुकता आहे. गहलोत यांचा मुलगा वैभव यावेळी जोधपूरमधून पराभूत झालाय, शिवाय हट्टानं मागितलेल्या मुख्यमंत्रिपदानंतरही त्यांना लोकसभेत पक्षाला एकही जागा जिंकून देता आलेली नाहीय. त्यामुळे त्यांच्या नावाचा सकारात्मक विचार होणार का याचीही उत्सुकता आहे.

मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेस पक्षाचा प्रमुख दलित चेहरा. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते म्हणूनही त्यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढण्याचं काम पाच वर्षे इमानइतबारे सांभाळलंय. पण या लोकसभा निवडणुकीत त्यांनाही अपयशाचा फटका बसलाय.गुलबर्गा मतदारसंघातून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे पराभूत झाल्यानंतरही त्यांना अध्यक्षपदाची माळ घातली जाणार का हा प्रश्न आहे.

सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे

सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे ही नावं काँग्रेसचा भविष्यातला तरुण चेहरा म्हणून पाहिली गेली. यातले ज्योतिरादित्य शिंदे यांना तर मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी डावललं गेलं आणि आता लोकसभेलाही पराभवाचा झटका बसला. सचिन पायलट सध्या राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तुलनेनं पायलट हे जास्त संयमी, कमी आक्रमक आणि बोलण्यात जास्त प्रगल्भ वाटतात. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार काँग्रेस पक्ष करणार का याची उत्सुकता आहे.

अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा निवडल्यानंतर त्यात राहुल, प्रियंका गांधींचा रोल नेमका काय असणार याचीही उत्सुकता आहे. शिवाय नवा अध्यक्ष निवडला गेल्यानंतरही निर्णयांसाठी 10 जनपथच्याच वाऱ्या  होऊ लागल्या तर मात्र या निर्णयाचा हेतू साकार होणार नाही. त्यामुळे नव्या अध्यक्षांना खरंच तितकी मुभा मिळणार का याचीही उत्सुकता असेल.

CWC Meet | अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय इतर नेत्यांचा विचार करा, राहुल गांधींचा प्रस्ताव | ABP Majha



फक्त राहुल गांधींनीच अध्यक्षपदाचा राजीनामा का द्यायचा

राहुल गांधींनी या पराभवानंतर राजीनामा देऊ नये या मतावर काँग्रेसमधले अनेक नेते ठाम आहेत. त्यांना अध्यक्षपद स्वीकारुन आत्ता कुठे दीड वर्षांचा काळ होतोय. शिवाय या निवडणुकीत सगळ्याच पक्षांना जबर पराभवाचा झटका बसलाय.केवळ काँग्रेसच पराभूत झालीय, आणि इतर प्रादेशिक पक्षांना यश आलंय असं झालेलं नाहीय. राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, बसपा, तृणमूल, टीडीपी असे सगळेच पक्ष मोदीलाटेपुढे गारद झालेत. पण इतर पक्षात कुणीही राजीनामा देत नाहीय, मग केवळ काँग्रेस अध्यक्षांनीच का राजीनामा दयायचा असा त्यांचा सवाल आहे. शिवाय या कठीण काळात पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी, नवी उभारी देण्यासाठी राहुल गांधींची गरज आहे असंही त्यांचं मत आहे.

त्यामुळे असं सगळं नाटय सुरु असताना आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा निर्धार बदलण्यात यश येणार का, की खऱंच घराणेशाहीच्या आरोपांतून मुक्त होण्यासाठी काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधणार याचं उत्तर लवकरच कळेल.