वर्ध्याला सेवाग्राममुळे एक वेगळी ओळख आहे. सेवाग्राम ही महात्मा गांधीजींची कर्मभूमी राहिल्याने वर्ध्याचं नाव आंतरराष्ट्रीय पटलावर ओळखलं जातं. आजवर हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. पण वर्धा आता भाजपच्या ताब्यात आहे. मागील काळात वाढलेलं भाजपचं पाठबळ पाहता काँग्रेसला हा बालेकिल्ला परत मिळवणं तितकं सोपं नाही. वर्ध्यात भाजपमध्ये तिकीटावरून घमासान होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्येही दावेदार वाढले आहेत. वर्ध्यात कॉंग्रेसचा उमेदवार सलग दोनदा पराभूत झाल्याने, या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसही दावा करण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचा कल, शहरालगतच्या ग्रामपंचायतींची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे.


वर्धा विधानसभा मतदारसंघात 1962 मध्ये काँग्रेसकडून बापूराव देशमुख निवडून आले. 1967 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून माकपचे रामचंद्र घंगारे निवडून आले. त्यानंतर सातत्याने येथे काँग्रेसचेच उमदेवार विजयी ठरले. 1972 ते 1985 पर्यंत प्रमोद शेंडे काँग्रेसकडून आमदार राहिले. 1990 मध्ये अपक्ष उमेदवार माणिक सबाने यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 1995 ते 2004 पर्यंत पुन्हा प्रमोद शेंडे आमदार होते. प्रमोद शेंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात रस्त्यांचा विकास केला. प्रशासनावर त्यांची उत्तम पकड असल्याचे अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. त्यानंतर काँग्रेसकडून प्रमोद शेंडे यांचे चिरंजीव शेखर शेंडे यांना 2009 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. पण त्यांना मतदारांनी नाकारलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवत शेखर शेंडे यांचा पराभव केला. या काळात जिल्हा सहकारी बँक रसातळाला पोहोचली. बँकेच्या शाखा बंद होऊ लागल्या. ठेवीदारांना ठेवी परत न मिळाल्याने असंतोष निर्माण होऊ लागला.

२०१४ च्या मोदी लाटेचा प्रभाव विधानसभा निवडुकीवरही पाहायला मिळाला. माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासोबतच त्यावेळचे युवक काँग्रेसचे नेते डॉ. पंकज भोयर यांनी भाजपात प्रवेश केला. पंकज भोयर यांनी प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना तिकीट दिले. त्यात डॉ. पंकज भोयर विजयीही झाले. या पाच वर्षांच्या काळात आमदार भोयर यांचे मुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांसह पक्षातील ज्येष्ठांशी जवळचे संबंध राहिले आहेत.

पाच वर्षांच्या कार्यकाळात वर्धा विधानसभा मतदारसंघात सातत्याने संपर्क राखण्याचा प्रयत्न डॉ. पंकज भोयर यांनी केला असला तरी विविध कारणांनी काही जण दुखावलेदेखील गेले आहेत. शहरातील विकासकामांवरून पक्षांतर्गत चढाओढ पाहायला मिळते. या मतदारसंघात उमदेवार पाहून मतदान झाल्याचे आजवर दिसून येते. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ही जागा कायम राखण्याचे तर काँग्रेसपुढे परंपरागत गड परत मिळविण्याचे आव्हान असणार आहे. काँग्रेस खिळखिळी झाल्याने हे आव्हान अधिकच बिकट असणार आहे.

राष्ट्रवादी काय भूमिका घेते यावरही इथली राजकीय गणित अवलंबून असतील. बसपा उमेदवार बहुतेक वेळा तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पण बसपाच्या उमेदवाराला मिळणारी मते इतर उमेदवाराकरिता महत्वाची ठरतात.

लोकसभेत भाजपला  37 हजार मतांची आघाडी

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप उमेदवार खासदार रामदास तडस यांना 37 हजार 257 एवढ्या मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी रामदास तडस की सागर मेघे यावरुन चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. लोकसभा प्रचारात मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यात झाली होती. येथे भाजपला जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची आघाडी मिळाली. या मतदारसंघात भाजपचे रामदास तडस यांना 94594 तर कॉंग्रेसच्या चारूलता टोकस यांना 57337 मते मिळाली होती.

उमेदवारीसाठी चढाओढ

भाजपातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यात आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नावावरून अनेकदा काथ्याकूट होतो. या मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे या दोन नावाची चर्चा आहे. दरम्यानच्या काळात भाजपसोबत अनेक जण जोडले गेले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकांनी निरोप दिला. शिवसेनेकडूनही काही जण इच्छूक आहेत. पण विद्यमान आमदार असल्यानं ही जागा सेनेला देण्याची कोणतीही शक्यता नाही. काँग्रेसकडून शेखर शेंडे, सुधीर पांगुळ, पराग सबाने, सुनीता इथापे,  रामभाऊ सातव यांनी मुलाखती दिल्या आहेत. यातील शेखर शेंडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष स्व. प्रमोद शेंडे यांचे चिरंजीव आहेत. शेखर शेंडे यांना यापूर्वी दोन वेळा मतदारांनी नाकारले आहे.

काँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थानप्रमाणे यापूर्वी दोनदा पराभूत झालेल्या उमेदवारांना तिकीट नाकारण्याचा फॉर्म्यूला वापरल्यास शेखर शेंडे यांचे नाव बाजूला पडू शकतं. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून घमासान असलं तरी वेळेवर काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसदेखील या जागेवर दावा करू शकते. येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार सुरेश देशमुख दावेदारी करू शकतात. पण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्न त्यांची पाठ सोडण्याची चिन्हे नाहीत. बँकेत लोकांच्या ठेवी अडकल्या आहेत. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँक, सोसायटींचे कर्मचारी बेजार आहेत. अशा स्थितीत या संतापात सुरेश देशमुख यांना दावेदारी करताना या बाबींचा विचार करावा लागणार आहे.

सुरेश देशमुख यांच्यापूर्वी अपक्ष उमेदवारांना यश मिळालं नाही. सध्याच्या घडीला भाजपचं प्रस्थ चांगलंच वाढलं आहे. पण सोबतच पक्षांतर्गत कुरबुरीदेखील वाढल्या आहेत. यावेळी अपक्ष उमेदवार कोण रिंगणात असणार हेही महत्वाचं आहे.

मतदारसंघातील प्रश्न

वर्धा विधानसभा मतदारसंघात वर्धा शहराचा समावेश आहे. सध्या भूमिगत गटार योजना सर्वांसाठी डोकेदुखीची ठरली आहे. यामुळे निर्माण झालेल्या समस्या शहरात ऐरणीवर आहेत. जिल्ह्याचे ठिकाण असतानाही बाजारपेठ, जिल्ह्याचे ठिकाण म्हणून पाहता रोजगाराच्या संधी अल्पच आहेत. मागील काळात डोकावून पाहता फारसा औद्योगिक विकास साधला गेला नाही. सेलू तालुक्यातील बोर अभयारण्यामुळे शेतकर्‍यांना सहन कराव्या लागणार्‍या नुकसानीचा प्रश्न आहे. तेच पर्यटनाला पाहिजे त्या प्रमाणात चालना मिळाली नाही. वर्धा शहरातील लीजधारकांचा मालकी हक्काचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायमच आहे. पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत. पण याकडे आजवर तरी फारसं लक्ष दिलं गेलं नाही. वर्ध्यातील उड्डाणपूल विस्तारीकरणाचा प्रश्न असूनही सुटलेला नाही.