नाशिक : आज नाशिकमध्ये खासदार राजू शेट्टी आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भाजप विरोधात रणनीती आखण्यात आली, तसेच एकमताने काम करून भाजपला पराभूत करण्याचा निर्धार या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत आहे. आम्ही एकत्रित भाजपला पराभूत करणार आहोत. संपूर्ण कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव हा आमचा कॉमन अजेंडा आहे. आघाडीत यावर एकमत झाले आहे.


शेट्टी म्हणाले की, आमची 3 जागांची मागणी होती. याआधी राष्ट्रवादीनं हातकणंगलेची जागा सोडली आहे. आता काँग्रेस वर्धा किंवा सांगली यातील एक जागा स्वाभिमानीला देणार आहे, असे शेट्टी यावेळी म्हणाले.


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, स्वाभिमानीला काँग्रेस 1 जागा निश्चित देणार आहे. यासाठी पवार साहेब स्वतः हा प्रयत्न करत आहेत, असेही भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की,  राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आहे. शेतकरी सन्मान योजना ही अपमान योजना आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव यावर आमचं एकमत आहे, असे ते म्हणाले.