मुंबई : सुजय विखे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो, अमुक एका जागेचा हट्ट करतो. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही, आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा. माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू त्यांना काय वाटेल? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांची उमेदवारी आणि सुजय विखेंच्या भाजपप्रवेशावर भाष्य केलं आहे.




कोणी रस्ता बदलत असेल त्यावर त्यांना हवं ते मिळणार असेल तर त्यांनी खुशाल घ्यावं, असा सल्लाही त्यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्यांना दिला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

मला राजकारणात 52 वर्ष झाले. राजकारणातून बाहेर पडण्याचा कधी तरी विचार करायला हवा. म्हणून मी निवडणुकीतून माघार घेतली, असेही ते यावेळी म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी ना कधी हरले आहेत. पण मी कधी हरलो नाही. त्यामुळे पराभवाच्या भीतीने मी माघार घेतली हे भाजपचे वक्तव्य बालिशपणाचे आहे, असे पवार म्हणाले.

या निवडणुकीच्या नंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत. त्यांना जे बहुमतासाठी नंबर लागणार आहेत, ते मिळणार नाहीत. भाजप सर्वात मोठा पक्ष असू शकेल मात्र ते बहुमत मिळू शकणार नाहीत. त्यामुळे आघाडी करण्यासाठी मोदींना स्वीकारले जाणार नाही, असे ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आंबेडकर कधी आमच्यासोबत होते का? काहीही गळ्यात मारु नका, असेही पवार म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी बोलणं झालं आहे. त्यांच्या जागेची मागणी पूर्ण होईल. स्वाभिमानी सोबतची राष्ट्रवादीची चर्चा समाधानी झाली आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- अजित पवार यांनी पक्ष हायजॅक केल्याचे आरोप केले जात आहेत, असे आरोप करणारे वेडे लोक आहेत.
- काँग्रेस राष्ट्रवादी 48 जागा सोडून फक्त 24 जागा लढेल अशी परिस्थिती अजून आलेली नाही.
- एअर स्ट्राईकमध्ये आम्ही राजकारण आणू इच्छित नाही. ज्यांना निवडून येता येणार नाही, असे लोक याचे राजकारण करत आहे.
- आरबीआयचे आज वक्तव्य आहे की, आम्ही नोटबंदी करण्यास सांगितली नव्हती. मात्र तरीही सरकारने नोटबंदी केली. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावे लागले.
- स्वाभिमानला आमच्या कोट्यातून जागा दिलेली आहे. त्यांची काँग्रेससोबत बोलणी सुरु आहे.
- कौटुंबिक आणि पक्षीय संस्कारानुसार जे ते लोक वक्तव्य करत असतात.