यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघ आदिवासी बहुल मतदार संघ आहे. अनेक छोटे छोटे खेडे, वस्ती, पोड, बेडे यांनी व्यापलेला आहे. या मतदारसंघात जंगलव्याप्त परिसर मोठ्या प्रमाणात असून मतदारसंघातील 85 टक्के ग्रामीण जनता शेतीशी संबधित आहे.

या मतदारसंघामध्ये राळेगाव, बाभुळगाव आणि कळंब या तालुक्याचा यात समावेश होतो. हा मतदारसंघ आदिवासीसाठी राखीव आहे.

सुरवातीला हा मतदार संघ येळाबारा मतदार संघ म्हणून ओळखला जात होता.

काँग्रेसचे महादेव खंडाते या मतदारसंघाचे पहिले आमदार. त्यानंतर हा मतदारसंघ 1967 पासून येळाबारा ऐवजी राळेगाव विधानसभा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावेळी अपक्ष उमेदवार  एन  एन  भलावी हे आमदार म्हणून जिंकून आले होते. नंतर 1972 साली  काँग्रेसचे आनंदराव देशमुख येथून जिंकून आले होते.  साळेगावच्या मतदारांनी 1978 आणि 1980 साली काँग्रेसच्या सुधाकरराव दुर्वे यांना आमदार म्हणून निवडून दिलं.

त्यानंतर 1985 साली  गुलाबराव उईके हे काँग्रेसचे उमेदवार राळेगावातून विजयी झाले.

1990 साली जनता दलाचे चक्र मतदारसंघात फिरले आणि नेताजी राजगडकर हे राळेगावातून विधानसभेवर पोहोचले. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि प्रा. वसंत पुरके यांनी 1995 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि सलग चार वेळा म्हणजे 1995,1999, 2004 आणि 2009 निवडणूक जिंकली. पुरके सरांच्या विजयाचा अश्व तब्बल 20 वर्ष  कुणीच रोखू शकलं नाही. मात्र 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक उईके यांनी पहिल्यांदा राळेगाव विधानसभेत कमळ फुलविले.

एकुणातच राळेगाव वेगवेगळ्या लाटेत वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जिंकले असले तरी प्रामुख्याने इथल्या मतदारांचा कल हा काँग्रेसकडेच राहिलाय.

अशोक उईके यांनी वसंत पुरके यांच्या विरोधात 2004 झाली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती तर 2009 साली अशोक उईके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून पुरकेंना जोरदार टक्कर दिली होती. मात्र 2014 साली भाजपकडून उमेदवारी मिळवून अशोक उईके यांनी या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा 38 हजार मतांनी विजय संपादन केला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या अशोक उईके यांना 1 लाख 618 मते मिळाली तर वसंत पुरके यांना 61 हजार 868 मते मिळाली होती.

राळेगाव मतदारसंघांमध्ये सध्या  एकूण 2 लाख 81 हजार 271 एकूण मतदार आहे यामध्ये 1 लाख 44 हजार 342 पुरुष
तर एक लाख 36 हजार 928 महिला मतदार आहेत.

आमदार अशोक उईके यांना अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. त्यात ते कैबिनेट मंत्री झाल्यामुळे अशोक उईके यांची ताकत आता वाढली आहे. छोट्या-मोठ्या गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांची आपुलकीची भाषा यामुळे ते सर्वपरिचित आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे नेते वसंत पुरके हे या मागील तीन वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळेल या आशेवर निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे. त्यांनीही एकेकाळी आपला गड असलेला हा मतदारसंघ नव्याने पिंजून काढला आहे.

आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघांमध्ये आजही ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांची दूरवस्था आहे. रस्त्यांची चाळणी झालेली  पहायला मिळते. अनेक गावांमध्ये वीज पुरवठा सारखा खंडित होणे ही शेतकरी आणि सामान्य नागरिकांची डोकेदुखी बनली आहे.

या मतदार संघात अनेक पोड आणि बेडे यांचा समावेश आहे. मागील वर्षी मोहदा आणि लगतच्या 30 गावात अवनी वाघिणीची दहशत होती. वाघिणीच्या हल्ल्यात 13 लोकांचा बळी गेला होता त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर या भागातील जनतेचा प्रचंड रोष आहे. आजही या  परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी आणि शेतकरी, शेतमजूर जखमी होतात.  या भागात लोकांची वस्ती आणि शेती ही जंगलाला लागून आहे, त्यामुळे अनेकदा वन्यप्राण्यांकडून शेतीचं मोठं नुकसान होतं. वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची नेहमीची मागणी असते, मात्र हा विषय अजूनही गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे जनतेमध्ये रोष पाहायला मिळतो.

येथील सर्वाधिक मतदार हे शेतकरी असून खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची लागवड करतो. पीक निघाल्यावर त्यांना योग्य भाव मिळत नाही. राळेगावात कापसाची मोठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना लगतच्या वर्धा जिल्ह्याच्या बाजार समितीवर अवलंबून राहावं लागतं.

मतदार संघातील ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधांची वानवा आहे. अनेक प्राथमिक उपकेंद्र आणि आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसणे आणि रुग्णांवर वेळेवर योग्य उपचार न झाल्यामुळे रुग्णांना नाईलाजाने उपचारासाठी  यवतमाळ गाठावं लागतं.

या मतदारसंघामध्ये बेंबळा धरणाचा कॅनाल असला तरी, ते शेवटपर्यंत पोहोचले  नाही आणि ठिकठिकाणी त्यांची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात काहीच फायदा होत नाही. बाभूळगाव आणि राळेगाव परिसरामधून वर्धा नदी वाहते. वर्धा नदीच्या पात्रातून रेती तस्कर अवैध वाहतूक करतात आणि त्यामुळे या नदीकाठच्या भागात रस्त्यांची चाळणी झाली आहे.

म्हणायला काही दिवसांपूर्वी वडकी परिसरामध्ये बिरसा मुंडा सूतगिरणीचे भूमी पूजन झालं, पण त्याचं काम अजून सुरू झालेलं नाही.

राळेगाव विधानसभा मतदारसंघात आदिवासी पोड, वस्ती, बेडा यांची संख्या अधिक आहे. ते पळसकुंड, भीमकुंड, जिरामीरा, निमगव्हाण आणि किनवट या भागांमध्ये यांची वस्ती आहे. मात्र अजूनही मूलभूत सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत.

शैक्षणिक सुविधांमध्येही हा मतदारसंघ पिछाडलेला असल्याने तरुणांना पदवीच्या  पुढच्या शिक्षणासाठी यवतमाळ किंवा वर्धा गाठावं लागतं. या भागांमध्ये एमआयडीसी सुद्धा नाही.

अशा समस्या असतानाही राळेगावच्या मतदारांनी वसंत पुरके यांना सलग चार वेळा आणि मागील वेळी अशोक उईके यांना काहीतरी बदल होईल म्हणून संधी दिली. नामदार अशोक उईके यांच्यामागे मतदारसंघातील अनेक वजनदार नेते आहेत. यामध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे यांना काही खेड्यात मानणारा मोठा वर्ग आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांच्यासोबत काँग्रेसचे जुने जाणते नेतेही पाहायला मिळतात. याच मतदारसंघातील कळंब विकास आघाडीचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देखमुख यांनी आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावरून पुरके समर्थकांमध्ये नाराजी होती. वसंत पुरके आणि प्रवीण देशमुख यांच्या समर्थकांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्याचा परिणाम काँग्रेसचे लोकसभा उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या घटलेल्या मतांमध्ये दिसून आला. असं असलं तरी प्रवीण देखमुख याची कळंब आणि लगतच्या परिसरात मोठी ताकत आहे. प्रवीण देशमुख यांचे समर्थक पुरकें सरांसाठी काम करतील की त्यांच्या विरोधात यावर निवडणूक निकाल अवलंबून असेल.

दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप आमदार अशोक उईके यांच्याकडून झालेली मदत लक्षवेधी ठरली. लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना राळेगाव मतदारसंघातून 97172 मतांची आघाडी आघाडी मिळाली होती. त्यामुळे त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत अपेक्षित आहे.

राळेगाव परिसरातील आणखी एक काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल मानकर यांची या भागातील ग्रामविकास सोसायटीमध्ये मोठी पकड आहे. काँग्रेससाठी ही जमेची बाजू आहे. अशा वेळी वसंत पुरके यांना मानकर यांची किती मदत होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि त्यांच्याच पक्षातील राळेगाव नगरपरिषदेतील नेते अॅड. प्रफुल चव्हाण यांच्यात मतभेद मतदारसंघात सर्वपरिचित आहेत. आताच झालेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेमध्ये राळेगाव येथे लावलेल्या बॅनरवरही या मतभेदाचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजप नेते नितीन मडावी हे या राळेगाव मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांना प्रफुल चव्हाण यांचे समर्थन असल्याचं बोललं जातं. भाजपच्या महाजनादेश यात्रेमध्ये नितीन मडावी आणि प्रफुल्ल चव्हाण यांचे एकत्र बॅनर लावले होते. त्या बॅनरवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची अनुपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती.

या मतदारसंघातील हृदय असलेल्या राळेगावच्या जनतेला 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्यामुळे येथील नागरिक नगरपरिषदच्या कारभारावर नाराज आहे.

या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. अशावेळी भाजपकडून अशोक उईके यांच्यासोबत वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी हे भाजपकडून तिकीटासाठी उत्सुक आहेत.

तर काँग्रेसमध्ये तिकिटासाठी मोठी स्पर्धा आहे. चार टर्म आमदार राहिलेले प्रा. वसंत पुरके यांच्यासोबत मनोहर मेश्राम, किरण कुमरे, सुरेश चिंचोळकर, चंद्रशेखर परचाके, संजीवनी कासार, सुरेश कन्नाके, रमेश कन्नाके, दिलीप नेहारे अशी नावे काँग्रेसमध्ये चर्चेत आहेत