पाथरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे साई बाबांचे जन्मस्थान, सिंचन व्यवस्थेने परिपूर्ण असा मतदारसंघ. असं सर्व काही विकासाला पोषक असताना केवळ दूरदृष्टी असलेलं नेतृत्व न मिळाल्याने पाथरी विधानसभा मतदार संघांची अवस्था अत्यंत बकाल झालेली आहे. रोजगार, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मतदारसंघातील जनतेने अनेक पक्ष आणि शेवटी अपक्ष आमदार देखील निवडून दिला मात्र परिस्थिती काही बदलली नसल्याने यंदा मतदारसंघातील जनता कुठला पर्याय निवडते हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाथरीतील आघाडीची बिघाडी, युतीतील संघर्ष कुणाच्या पथ्यावर पडणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.


पाथरी विधानसभा मतदार संघ हा 1990 पासून शिवसेनेचा गढ आहे. 1990  ते 1999 असे सलग 15 वर्ष इथे शिवसेनेचे हरिभाऊ लहाने हे आमदार होते. 2004 साली राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्रानी यांनी हरिभाऊ लहाने यांचा पराभव करून मतदार संघावर वर्चस्व मिळवले. मात्र बाबाजानी यांना मतदारांनी केवळ पाचच वर्षच संधी दिली. पुन्हा 2009 ला मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने मीरा रेंगे यांच्या रूपाने आपला कौल दिला. तर 2014 ला सर्वच पक्षांनी स्वबळावर लढवलेल्या महत्वपूर्ण निवडणुकीत इथल्या मतदारांनी सर्व पक्षांतील मात्तबर नेत्यांचा पराभव करत थेट अपक्ष उभ्या असलेल्या मोहन फड यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आणि आपले वेगळेपण दाखवून दिले.

परभणी जिल्ह्यातील दोन नंबरचा मोठा मतदार संघ असलेल्या पाथरी विधानसभेत पाथरी, सोनपेठ आणि मानवत या तीन तालुक्यांसह परभणी तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे इथे मराठा समाजाचं मताधिक्य हे सर्वाधिक आहे पाठोपाठ धनगर,मुस्लिम दलित आणि ओबीसी मतांचे प्रमाण आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीतील मतदान पाहता यावेळी वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर हि इथे चांगलीच टक्कर देऊ शकतो त्यामुळे इच्छुकांनी सर्वच जाती धर्मातील मतदारांकडे लक्ष देण्यास सुरुवात केलीय हे विशेष.

जागावाटपात 4 विधानसभा मतदार संघातील परभणी आणि पाथरी हि काँग्रेस,गंगाखेड,जिंतूर हे राष्ट्रवादी कडे तर युतीमध्ये पाथरी,परभणी जिंतुर हे मतदार संघ कायम शिवसेनेकडे होते भाजप चे जिल्ह्यात प्राबल्य नसल्याने गंगाखेड हाच मतदार संघच  भाजपकडे असायचा मात्र आज परिस्थिती बदलली आहे त्यामुळे भाजप शिवसेना कुठले मतदार संघ एकमेकांना देणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही पाथरी चे विद्यमान आमदार मोहन फड हे अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप ला पाठींबा दिल्याने त्याच्यासाठी भाजप पाथरी मतदार संघ शिवसेनेकडून सोडवून घेण्याची शक्यता आहे,मात्र शिवसेना आपला गढ असलेला मतदार संघ सहजा सहजी सोडणार का हाही प्रश्नच आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. ज्यात शिवसेनेकडून मीरा रेंगे, राष्ट्रवादीकडून बाबाजानी दुर्रानी, काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर, मनसेकडून हरिभाऊ लहाने तर भाजपच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय सीताफळे यांच्यासह अपक्ष म्हणून मोहन फड अशा नेत्यांनी ही निवडणूक लढवली. ज्यात जिल्ह्यातील मात्तबर नेते असलेल्या वरपुडकर, बाबाजानी यांचा पराभव करून अपक्ष मोहन फड यांनी विजय मिळवला आणि लगेच मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आपला पाठिंबा दर्शवला. महत्वाचं म्हणजे या नंतर काही दिवसातच मोहन फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तिथेही ते फार काळ टिकले नाहीत. पुन्हा त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणे पसंत केले. मात्र पाथरी विधानसभेची जागा ही शिवसेनेची असल्याने त्यांना ही जागा स्वतः साठी सोडवून घ्यावी लागणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत विद्यमान शिवसेना खासदार संजय जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्याचा केलेल्या प्रचाराने शिवसैनिक चांगलेच नाराज आहेत. ही नाराजी फड यांना या निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीचा चांगलाच प्रभाव असणार आहे. कारण परभणी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीची ताकत आहे. लोकसभेत विटेकरांना पराभव स्वीकारावा लागला ज्यात प्रामुख्याने पाथरी विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचा उमेदवारच या मतदार संघातील होता असं असताना ज्या पद्धतीने त्यांना मतदान होणे अपेक्षित होते ते झाले नाही. त्यामुळे त्यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची असणार आहे. मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले सुरेश वरपुडकर पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी पाथरी मतदारसंघात प्रचार सुरु केलाय. मात्र लोकसभा निवडणुकीतील घडामोडीमुळे आता त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आ.बाबाजानी दुर्रानी, राजेश विटेकर हे राहणार का? हा प्रश्न आहेच. शिवाय विद्यमान आमदार मोहन फड यांनीही लोकसभेत शिवसेनेच्या विरोधात प्रचार केल्याने खासदार संजय जाधव यांचे समर्थक आणि शिवसैनिक फड यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच शिवसेनेकडून देखील पाथरी विधानसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र ही सगळे गणितं युतीवर अवलंबून आहेत.

अपक्ष असल्याने मोहन फड करू शकले असते विकास  
पाथरी विधानसभा मतदार संघाला पहिल्यांदाच अपक्ष म्हणून मोहन फड यांच्या रूपाने आमदार लाभला. शिवाय फड यांनीही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे वजन सरकार दरबारी वाढले असताना त्यांना या मतदारसंघात मानवत नगरपालिका सोडले तर कुठेही आपले वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. पाहिजे त्या पद्धतीने विकास ही करता आला नाही. विशेष म्हणजे मतदारसंघातील खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात उल्लेख केलेल्या साई जन्मभूमीचा विकास आराखडा अद्यापही रखडलेलाच आहे. 10 वर्षांपासून रखडलेल्या तारुगव्हाण बंधाऱ्याचा प्रश्न देखील तसाच आहे. सोनपेठ मधील शिर्सी पुलाचे काम देखील पूर्ण करता आलेले नाही. या मतदारसंघात जायकवाडी डावा कालवा, गोदावरीवरील बंधाऱ्यानी सिंचन व्यवस्था असताना इथे कृषी आधारित प्रक्रिया उद्योग झाले नाहीत. यातील सर्व प्रश्न सुटण्यासारखे असताना फड यांना ते सोडवता आले नाहीत. त्यामुळे पाच वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतरही त्यांनी या मतदारसंघावर कितपत पकड मिळवली हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल.

वंचित बहुजन आघाडीचा धसका
लोकसभा निवडणुकीत पडलेल्या मताधिक्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना वंचित आघाडीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने वंचित बहुजन आघाडीचा चांगलाच धसका मतदार संघातील नेत्यांनी घेतला आहे. शिवाय वंचितकडे विलास बाबर,सुनील बावळे यांच्यासह अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे.

परभणी मतदार संघावर दृष्टीक्षेप

विद्यमान आमदार मोहन फड
पक्ष- अपक्ष
तालुके- पाथरी, सोनपेठ, मानवत
एकूण मतदार- 3 लाख 47 हजार 451

मतदारसंघातील मुख्य समस्या
-तारूगव्हाण बंधारा अपूर्ण
-साखर कारखाने आहेत मात्र पूर्ण क्षमतेने गाळप नाहीत
-साई जन्मस्थान विकासाच्या प्रतीक्षेत
-रस्ते, रोजगार, शिक्षण, आरोग्य समस्या गंभीर
- 25 वर्षांपासून रखडलेला शिर्शी पुलाचा प्रश्न
-तिन्ही तालुक्यातील बस स्थानकांची बिकट अवस्था
-इंद्रायणी नदी पुनर्जीवन प्रकल्प अपूर्ण

जाणून घ्या या मतदारसंघाविषयी