रखरखत्या वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजून मानवतेचा नवा संदेश देणाऱ्या संत एकनाथांच्या नावाने  पैठण ओळखलं जातं. याच मतदार संघात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाणी पाजून पैठणची आमदारकी मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारानी कंबर कसलीय. नाथवैभव लाभलेला मंतदारसंघ म्हणजे पैठण. या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण याच मतदार संघात आहे. याला नाथ सागर असं म्हटलं जातं.

पैठणच्या मतदारांनी 2009 पूर्वी  तब्बल चार वेळा शिवसेनेचा आमदार निवडून दिला. मात्र 2009 निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार थेट तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. हा मतदारसंघ शिवसेनेने 2014 ला पुन्हा ताब्यात घेतला. औरंगाबाद जिल्ह्यातील हा मतदारसंघ लोकसभेसाठी जालना लोकसभा मतदारसंघात जातो.

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून चांगलं मताधिक्य मिळालं आहे. त्याचं कारण असं होतं की रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अनेकांना दिलेलं तिकीट देण्याचं आश्वासन. आता रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष राहिले नाहीत. त्यामुळे इच्छुकांचे काय हा देखील प्रश्‍न उपस्थित होतो. लोकसभा निवडणुकांपूर्वी पैठणमध्ये भाजपाचं बळ वाढवण्यासाठी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेतूनही काही नेते आयात केले आणि काटशह दिला. या राजकारणामुळे रावसाहेब दानवे यांना 41 हजारांचे मताधिक्य या मतदारसंघातून मिळालं. असं असलं तरी शिवसेना-भाजप युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. त्यामुळे या मतदारसंघातून निश्चितच बंडखोरी होईल अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये युती होईल असं चित्र लोकसभा निवडणुकीपूर्वी दिसत नव्हतं, त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडेना भाजपामध्ये घेतलं. राष्ट्रवादीतून तुषार शिसोदे यांना आणून थेट भाजपा तालुकाध्यक्षपदी नेमणूक केली डॉ. सुशील शिंदे यांना देखील मनसेतून भाजपामध्ये घेतलं. कल्याण गायकवाड यांना उमेदवारीचं आश्वासन दिलं. त्यामुळे युती झाली तरी इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने इथे बंडखोरीचं निशाण फडकणार हे निश्चित आहे.

शिवसेनेकडून पैठण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संदिपान भुमरे यांना पुन्हा संधी मिळू शकते. संदिपान भुमरे यांचं या मतदारसंघांमध्ये चांगलं नेटवर्क आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी जुळवून घेण्याची कला त्यांच्याकडे आहे. या मतदारसंघाची चांगली जाण देखील आहे. असं असलं तरी शिवसेनेतून भाजपात गेलेले काही नेते मात्र संदिपान भुमरे यांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. भाजपातील विधानसभा निवडणूक लढवणाऱ्यांची यादी पाहता संदिपान भुमरे यांच्या समोर भाजपातील या बंडखोरांची मनधरणी करणं हेच सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.

आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 च्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले संजय वाघचौरे हे निश्चितच निवडणूक लढवायला इच्छुक असतील. त्याचबरोबर आप्पासाहेब निर्मळ, धोंडीराम पुजारी, हेदेखील राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीटाची अपेक्षा ठेवून आहेत. मात्र राष्ट्रवादीचं इथलं 2014 पूर्वी जे नेटवर्क होतं ते मात्र इथे पाहायला मिळत नाही.

काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीतच अनिल पटेल यांनी हा मतदारसंघ विधानसभेला राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे घ्यावा अशी मागणी केली होती. वंचित बहुजन आघाडी कडून डॉ. पंडित किल्लारीकर आणि प्रल्हाद राठोड यांना तिकीट हवं आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण हे देखील या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये, शिवसेनेचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार संदिपान भुमरे यांना 66 हजार 991 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय वाघचौरे यांना 41 हजार 952, काँग्रेसच्या रवींद्र काळे यांना 24 हजार 957 मतं मिळाली होती. याच निवडणुकीत भाजपाच्या विनायक शेवाळे यांना फक्त 29 हजार 957 मते मिळाली होती. शिवसेना-भाजप एकत्र लढली तर निश्चितच शिवसेनेचे पारडे जड आहे.

एकंदरीत या मतदारसंघांच्या समस्यावर जर नजर टाकली तर या मतदार संघात सगळ्यात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण या मतदारसंघासाठीच तयार झाली असावी असं वाटतं. या उन्हाळ्यात तर या मतदारसंघातील अनेक गावं ही पाण्यासाठी दाहीदिशा एक करताना पाहायला मिळाली. काही गावात तर घरा-घरा समोर बोर्ड लावण्यात आले होते की  जेवण करा पण पाणी मागू नका. मतदारसंघातला पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे , हे लक्षात येण्यासाठी हे पुरेसं आहे. अनेक गावात रस्त्यांची ही समस्या मोठी आहे.



पैठणला संत एकनाथांमुळे मोठं धार्मिक महत्व आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणावर येतात, मात्र तशा सेवासुविधा इथे पाहावयास मिळत नाहीत. त्यामुळेच स्थानिक आमदाराला ही निवडणूक जिकिरीची ठरण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघाला गोदावरी नदी काठ लाभल्याने आणि जायकवाडी धरण जवळच असल्याने उसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे या मतदारसंघाचं सगळं राजकारण संत एकनाथ साखर कारखान्याच्या अवतीभोवती फिरतं. सध्या संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे आहेत.  या कारखान्याभोवतीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळावा म्हणून संदिपान भुमरे यांनी विवा मांडव्याचा कारखाना चालवायला घेतला. या राजकारणामुळे संदिपान भुमरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल असा त्यांचा विश्वास आहे.


लोकसभा निवडणुकीमध्ये पैठणच्या मतदारांनी जालना मतदारसंघातील लोकसभेचे भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांना 1 लाख 9 हजार 268 मते  दिली तर काँग्रेसच्या विलास आवताडे यांनादेखील 68 हजार 214 मते इथे मिळाली.

पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांचं वर्चस्व राहिलं आहे. या मतदार संघातली जातीय समीकरणे पाहिली तर हा मतदार संघ मराठा बहुलआहे. त्या पाठोपाठच ओबीसींची मते आहेत. इतर समाजाचेही अनेक मतदार या मतदारसंघातील अनेक गावात पाहायला मिळतात.