नाशिक शहराच्या मध्यवस्तीत विस्तारलेला हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ. नाशिक शहराचा खरा चेहरा दाखविणारा, सर्वजाती धर्माचा प्रभाव दिसून येणारा गरीब-श्रीमंत अशी मिश्र लोकवस्ती असणारा, शहराची वाडा संकृती जपणारा, गावठाण भाग सामावून घेणारा आणि तेवढाच पुढारलेला हा मतदारसंघ. गंगापूर रोड, कॉलेज रोड सारखे हाय प्रोफाईल लोकवस्ती सामावणारा शहराची मुख्य बाजारपेठ, महत्वाची शाळा, महाविद्यालयं. जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा मुख्यालय असे सारेच या मतदार संघात सामावलेलं आहे.


सुरुवातीपासूनच या मतदार संघावर भाजपचा वरचष्मा आहे. भाजपचे डॉ. डी. एस. आहेर आणि या मतदारसंघाचे सुरुवातीपासूनच समीकरण राहिले आहे. स्वर्गीय डी. एस. आहेर यांच्या रूपाने आरोग्यमंत्री तर डॉ. शोभा बच्छाव यांच्या रूपाने आरोग्य राज्यमंत्रीपद याच मतदारसंघाला लाभले. आहेर यांचा विजयी रथ शोभा बच्छाव यांनीच 2004 मध्ये रोखला. 2009 मध्ये मतदारसंघ फेररचनेत नाशिक विधानसभा मतदारसंघातून नाशिक मध्यची निर्मिती झाली.

इतर तीन मतदारसंघात नाशिक विधानसभा मतदारसंघ विभागाला गेला परंतु गाभा 'नाशिक मध्य' मध्येच राहिला. सध्या या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकतोय.  माजी उपमहापौर देवयानी फरांदे 2014 मध्ये या मतदारसंघातून तब्बल 61 हजार मतांनी निवडून आल्या. भाजपला असणारे अनुकुल वातावरण लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार हेमंत गोडसेंना मिळालेली 94 हजार मतं आणि भाजपमध्ये सुरु असणारे इनकमिंग पाहता भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढतेय. आमदार देवयानी फरांदे यांना पक्षातून आव्हान दिले जात आहे.

मागील निवडणुकीत तिकिटासाठी रस्सीखेच सुरु असताना देवयानी फरांदे यांनी गुजरातहून सूत्र हलवीत तिकीट मिळविले. फरांदे यांना यंदाही स्पर्धक तयार झालेत. माजी मंत्री डी एस आहेर यांच्या पुतणी मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके गेल्या सहा महिन्यापासून तिकिटासाठी फिल्डिंग लावतायेत. तर मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढविणारे आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार वसंत गीते हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. फरांदे आणि गीते यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. एकमेकांचे दोघांचे पत्ते कट करण्यासाठी दोन्ही गटा सक्रिय आहेत.

भाजपचेच प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून त्या दृष्टीने वातावरण निर्मितीला सुरवात ही केलीय. एकेकाळी सुनील बागुल हीच नाशिक शिवसेनेची ओळख होती. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमार्गे भाजपत दाखल झालेत.  त्यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र ते नाशिक मध्य मधून लढणार की नाशिक पूर्व याबाबत अद्यापही निर्णय नाही. शिवसेना भाजपात युती झाली तर भाजप या जागेवरून आपला हक्क सोडणार नाही अशी दाट शक्यता आहे. मात्र शिवसेनेकडून ही उमेदवाराची चाचपणी केली जात असून मागील पंचवार्षिक निवडणुकीचा अनुभव असणारे माजी महानगर प्रमुख अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, विद्यमान महानगर प्रमुख सचिन मराठे इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत.

युती झाली तर युतीचा उमेदवार निवडून येईल अशी स्थिती आहे. मात्र जर युती तुटली तर शिवसेना-भाजपला निवडणूक जड जाण्याची चिन्ह असून ऐनवेळी कोणती लाट येते त्या लाटेवर स्वार होणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माल पडण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसकडून माजी गटनेते शाहू खैरे,  नगरसेवक राहुल दिवे, प्रदेश प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव यांची नाव आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादीकडून समीर आणि शेफाली भुजबळ यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीआधीच समीर भुजबळ यांनी लोकसभा न लढविता मध्य मधून आमदारकी लढवावी अशी काही समर्थकांची इच्छा होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आणले जात असून त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांच्यासाठीही चाचपणी केली जात आहे.

राष्ट्रवादीचे मनपा गटनेते गजानन शेलार, विश्वास को ऑप बँकेचे संचालक सुप्रिया सुळे यांचे समर्थक विश्वास ठाकूर, माजी खासदार देविदास पिंगळे हेही इच्छुक आहेत. तर  शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले आणि आता अजित पवारांशी जवळीक साधलेले अर्जुन टिळे यांनीही इच्छा दाखविलीय मात्र ते वातावरण बघून सावध भूमिका घेणार आहेत. मुस्लीम दलित भाग जास्त असल्यान वंचित आघाडीचा प्रभावही निवडणुकीच्या निकालावर परिणाम दाखविणार आहे. त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवार कोण असणार? यावरून आतापासून उत्सुकता कायम आहे. माजी नगरसेवक संजय साबळे यांना वंचितची उमेदवारी बहाल होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तर मागील पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मत घेणाऱ्या आणि 2009 मध्ये आमदारकी भूषविणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार असून आघाडीत मनसेला सामावून घेतले जाते की नाही याकडे कार्यकत्यांचं लक्ष आहे. अन्यथा माजी महापौर अशोक मुर्तडक यांना बोहल्यावर चढविले जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार वसंत गीते यांनी मनसेला रामराम ठोकल्यानं  या मतदारसंघात मनसेला चेहरा उरला नाहीये.

सत्तेच्या या साठमारीत नागरिकांचे प्रश्न मात्र जसेच्या तसे राहत आहेत. पूररेषा, गावठाण भागाचा विकास, पाणी प्रश्न, वाहनतळ, वाहतूक कोंडी, अतिक्रमण अरुंद रस्ते यावर गेल्या कित्येक वर्षात तोडगा निघालेला नाही.

2014 च्या  विधानसभेचा कौल

प्रा.देवयानी फरांदे (भाजप)  -६१५४८
वसंत गिते - (मनसे) -३३२७६
अजय बोरस्ते - (शिवसेना ) -२४५४९
शाहू खैरे - (काँग्रेस) - २६३९३
विनायक खैरे- राष्ट्रवादी काँग्रेस)- ७०९५

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य 'मध्य'चा कौल
हेमंत गोडसे- (शिवसेना )-९४ हजार ४२९
समीर भुजबळ- राष्ट्रवादी काँग्रेस) -५६ हजार ४५९
पवन पवार -( वंचित आघाडी) -१५ हजार ४०५
माणिकराव कोकाटे-( अपक्ष)- ६६६६