कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा ठाणे शहराच्या बाजूलाच आहे. ठाणे महानगर पालिकेचा भाग आहे. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग मात्र नाही. हा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे यामध्ये कळवा आणि मुंब्रा हे दोन्ही भाग मोडतात. कळवा भागातील पश्चिमेचा पूर्ण भाग, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. या मतदारसंघातील कळव्यात भूमिपुत्र असलेले आगरी आणि कोळी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत तर मुंब्रा आणि कौसा भागात मुस्लिम वस्ती खूप आहे.


इतिहास काय सांगतो
कळवा मुंब्रा मतदारसंघ हा 2009 साली बनलेला मतदारसंघ आहे. त्याआधी तो बेलापूर या भल्यामोठ्या मतदारसंघाचा हिस्सा होता. बेलापूर मतदारसंघात आताच्या बेलापूरपासून ते वाशी आणि ऐरोली, कळवा-मुंब्रा, घोडबंदरचा पूर्ण पट्टा आणि थेट भाईंदर-उत्तनपर्यंत सर्व विभाग यायचा. एकेकाळचा तो सर्वात मोठा मतदारसंघ होता. तरीही गणेश नाईक या मतदारसंघातून निवडून यायचे. 2009 ला त्याचे पुनर्विभाजन होऊन अनेक वेगवेगळे मतदारसंघ तयार झाले. त्यात कळवा-मुंब्रा हा एक मतदासंघ. इथे मुख्यतः 2 मतदार आहेत. मुंब्र्यात असलेला मुस्लिम समाज आणि कळव्यात असलेला आगरी-कोळी समाज. हे दोन समाज ज्याच्या बाजूने तो हमखास निवडून येतो.

हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार

काय आहे सद्यस्थिती
कळवा मुंब्रा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. आधी गणेश नाईक यांना तर 2009 पासून जितेंद्र आव्हाड यांना इथल्या मतदार राजाने निवडून दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे या विभागात काम देखील खूप आहे. कळव्यात अनेक नवीन संकल्पना त्यांनी राबवल्या. म्हणून की काय 2014 साली जेव्हा मोदी लाट होती. त्यावेळी 47 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून आले होते. आता पुन्हा त्यांनाच राष्ट्रवादी म्हणजे आघाडीकडून तिकीट मिळणार यात शंका नाही. मात्र 2014 प्रमाणे आता थोडे चित्र बदलले आहे. युती आणि आघाडी यांच्यात लढत असल्याने शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आव्हाड यांना पाडण्यासाठी जोर लावू शकतात. युतीकडून इथे शिवसेनेला तिकीट दिले जाते. गेल्यावेळी दशरथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा प्रचंड मतांनी पराभव झाल्याने आता सेना नवीन चेहरा देण्याची जास्त शक्यता आहे. राजेंद्र सापते यांचे नाव देखील चर्चेत आहे. जर युती नाहीच झाली तर भाजपकडून मनोहर सुखदरे, अशोक भोईर यांची नावे पुढे आहेत. काँग्रेसला तर 2014 साली इथे फक्त 4 हजारपेक्षा कमी मतांचा टप्पा गाठता आला होता. त्यामुळे आघाडी तुटली तर काँग्रेसला मजबूत उमेदवार शोधावा लागेल. या सर्व पक्षांसोबत इथे एमआयएमचा प्रभाव देखील आहे. वंचित बहुजन आघाडीकडून इथे एमआयएमच्या उमेदवाराला तिकीट मिळेल. 2014 साली देखील तिसऱ्या क्रमांकाला एमआयएमचा उमेदवार होता. यावर्षी देखील मोठ्या संख्येने मत खेचण्यात हा उमेदवार यशस्वी होईल असे चिन्ह आहे.

हे देखील वाचा -चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान

इथल्या समस्या
वाहतूक कोंडी हा सर्वात मोठा विषय इथे आहे. कळव्यात जुन्या खाडी पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे काम सुरू आहे. तो सुरू झाला की मोठ्या प्रमाणात ही समस्या कमी होईल. मात्र मुंब्रा भागात अशा एखाद्या प्रकल्पाच्या प्रतीक्षेत लोकं आहेत. वीज इथे नेहमीच नसते. वीज चोरी आणि बिल न भरणे यामुळे एमएसइबीने जणू या विभागाला वाळीत टाकले आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. काही भागात पावसात पाणी देखील साचते. या सर्वांसोबत राजकीय वरदहस्त आणि भ्रष्टाचार यामुळे अनधिकृत वस्ती मोठ्या प्रमाणात इथे निर्माण झाली आहे. जी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यावर काहीही तोडगा काढताना कोणीही दिसत नाही. त्यामुळे नागरी सुविधांवर मोठा ताण येतोय.

2019 ची शक्यता
गेल्या 10 वर्षात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा येथील चेहरा मोहरा बद्दलण्यासाठी काम केले आहे, जे नाकारता येणार नाही. अनेक डोळ्यांना दिसतील असे बदल या भागात घडले आहेत. तर लोकांना हवा तेव्हा उपलब्ध असलेला आमदार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. मात्र युती असल्याने आव्हाड यांनी सीट पाडण्याचा पूर्ण प्रयत्न सेना भाजप करेल. त्यात भाजप विरोधात खुलेआम पणे टीका करणारे आमदार म्हणून देखील आव्हाड प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव कोणत्याही घोटाळ्यात न आल्याने त्यांच्या विरोधात प्रचार करायला देखील खूप कमी वाव आहे. तरी वंचित आघाडीकडून जर मोठ्या प्रमाणात मते विभागली गेली तर आव्हाडांची सीट धोक्यात येऊ शकते.

एकूण मतदार 3,48,482
पुरुष 185749
स्त्रिया 152593
एकूण मतदान केंद्रे 310

2014 चा निकाल ( पहिले तीन )
जितेंद्र आव्हाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 86,533
दशरथ पाटील ( शिवसेना ) 38,850
अश्रफ मुलानी ( एमआयएम ) 16,374

विजयी - जितेंद्र आव्हाड - 47,683 मतांनी विजयी

जाणून घ्या या मतदारसंघाविषयी