ABP C Voter Survey: मणिपुरमध्ये भाजप, काँग्रेस आणि विविध स्थानिक पक्षांनी आगामी निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज देखील दाखल केला. त्याआधी शनिवारी काँग्रेसने राज्यातील  पाच पक्षांसोबत आघाडी करण्याची घोषणा केली. त्यामुळे सहा पक्ष एकत्र मिळून राज्यात आता निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे मणिपुरमध्ये नेमकी कोण सत्ता स्थापन करणार? हा मोठा प्रश्न आहे.

  

मणिपुरमध्ये कोण सरकार स्थापन करणार? या प्रश्नाला घेऊन सी वोटरच्या मदतीने केलेल्या सर्व्हेमधून जनतेचा कौल जाणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व्हेच्या अंतिम निर्णयाचा विचार करता मणिपुरमध्ये भाजपाला सर्वाधिक 34 टक्के पसंती मिळाली आहे. तर, काँग्रेसला 28 टक्के आणि एनपीएफला 10 टक्के मतं मिळाली आहेत. तर इतरांच्या झोळीत 28 टक्के मतं मिळाली आहेत. 

मणिपुरमध्ये कोणता पक्ष किती मतांनी जिंकेल? याबाबत नागरिकांना प्रश्न विचारला असता भाजपलाच सर्वाधिक लोकांची पसंती मिळाली आहे. भाजप यंदा 21 ते 25 जागांवर विजय मिळवू शकतो. तर काँग्रेस 17 ते 21 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर एनपीएफच्या खात्यात 6 ते 10 जागा जाताना दिसू शकतं. तर इतरांना 8 ते 12 जागा मिळण्याचं अनुमानही व्यक्त केलं जात आहे.

मणिपुरमध्ये कोणाला किती मतं?

एकूण जागा 60
भाजपा 34%
काँग्रेस 28%
एनपीएफ 10%
अन्य  28%

मणिपुरमध्ये कोणाला किती जागा?

एकूण जागा  60
भाजपा 21-25
काँग्रेस 17-21
एनपीएफ 6-10
अन्य  8-12

काँग्रेसची आघाडी

मणिपूर विधानसभा निवडणूकांच्या आधी शनिवारी सहा पक्षांनी मिळून आघाडी स्थापन केली आहे. ‘मणिपूर प्रोग्रेसिव सेक्युलर एलायन्स’ (एमपीएसए) असं नाव दिलं आहे.  या आघाडीमध्ये काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), फाॅरवर्ड ब्लॉक, आरएसपी आणि जेडी(एस) हे पक्ष सामिल आहेत. इंफाल येथील काँग्रेस भवनात या सहा ही पक्षांनी बैठक घेत आघाडीची घोषणा केली. यावेळी मणिपुरमध्ये काँग्रेसचे चुनाव पर्यवेक्षक जयराम रमेश, माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि इतर पक्षांचे प्रतिनिधी सामिल होते. यावेळी हे सरकार आल्यास 18 सूत्रीय अजेंडा लागू करु तसंच मणिपुरमध्ये सर्व सोयी तसंच मोफत उपचार, रोजगार अशा साऱ्या सुविधा पुरवू असे आश्वासन देण्यात आले.

कधी होणार निवडणूक?

मणिपूरमध्ये दोन भागांमध्ये मतदान पार पडणार आहे. यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दिवशी मतदान घेण्यात येईल. तर मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे, ज्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल.

सूचना :  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा प्रचार वेगाने सुरु आहे. थंडीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओपिनियन पोल सी-वोटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील  1 लाख 36 हजारपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला आहे. 690 मतदारसंघामध्ये याबाबतचा अभ्यास केला. हा सर्व्हे 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकष सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha