Alibaug Vidhansabha Election 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदासंघ (Maharashtra Assembly Election 2024) सर्वचर्चित आणि राजकीय सामाजिक दृष्या महत्वपूर्ण मानला जातो. पुर्वी शेकापचा बालेकिल्ला असणारा हा मतदार संघ (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024) आता शिंदेच्या शिवसेनेकडे जरी असला तरी पुन्हा शेतकरी कामगार पक्षाने हा गड आपल्याकडे मिळविण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. एकूणच या मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शेकापमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसत आहे.


2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेना (शिंदे गट) महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाच्या सुभाष पाटील यांचा 32924 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. अलिबाग-मुरुड हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असताना शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी 2019 च्या निवडणुकीत 30 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवल्याने या बालेकिल्ल्यास मोठे भगदाड पाडण्यात महेंद्र दळवी हे यशस्वी ठरले होते. 


अलिबागचा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एक दोन अपवाद सोडले तर या मतदार संघातून सतत शेकापचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी शेकापने केली आहे. या मतदारसंघातून शेकाप सरचिटणीस जयंत पाटील त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ऍड प्रवीण ठाकूर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदार संघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत सुद्धा पुन्हा नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर शिवसेनेने (ठाकरे) अलिबागमधून जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी दिली जावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेनी या मतदारसंघावरचा हक्क सोडू नये अशी इच्छा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अलिबाग विधानसभेतून नक्की कोणाला तिकीट मिळणार, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. 


अलिबाग मतदारसंघाचा इतिहास-


अलिबाग-मुरुड मतदारसंघाची 2008 मध्ये पुर्नरचना झाल्यानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. तत्पूर्वी अलिबागला उरणचा काही भाग जोडला होता. तर श्रीवर्धनला मुरुड जोडला होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या मीनाक्षी पाटील यांनी काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांचा पराभव केला होता. पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवींचा पराभव करून विधानसभेत पाऊल टाकले होते. तर 2019 च्या निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी पराभवाचा बदला घेत पंडित पाटील यांना पराभूत केले.


विधानपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव-


विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव झाला. 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शेकपच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला होता. पण जयंत पाटील यांना अपेक्षित मतेच मिळाली नाही. जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची फक्त 8 मते मिळाली. तर जयंत पाटलांच्या एकूण मतांची संख्या फक्त 12 इतकीच राहिली. पराभवानंतर जयंत पाटील संतप्त झाले होते.


संबंधित बातमी:


रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती