जालना : जालना बियाणांची पंढरी आणि किंग ऑफ स्टील सिटी अशी जागतिक पातळीवर ओळख असलेले शहर आहे. जालना विधानसभा मतदार संघ 75 टक्के शहरी आणि 25 टक्के ग्रामीण मतदारांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत जालना शहराला महत्त्व असते. 1990 पूर्वी एक अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सलग सहा निवडणुकींपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले.


मुस्लिम, दलित तसेच मराठी मातृभाषा नसलेल्या मतदारांची संख्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. पूर्वीच्या काळी मुस्लीम आणि दलित मतदार काँग्रेसची हक्काची वोट बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु गेल्या 15-20 वर्षांत त्यात हळूहळू बदल होत गेला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाकडून उभे राहिलेले अब्दुल रशीद या मतदारसंघातून पराभूत झाले असले तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार दुरावल्याचे स्पष्ट झाले. 2014 मध्ये चौरंगी लढतीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले तरी त्यांचे मताधिक्य केवळ 296 मतांचे एवढे कमी राहिले.


2014 जालना विधानसभा निवडणूक निकाल


अर्जुन खोतकर (शिवसेना) - 45078 मतं


कैलास गोरंट्याल (काँग्रेस) - 44782 मतं


अरविंद चव्हाण (भाजप) - 37591 मतं


अब्दुल रशीद (बसपा) - 36350 मतं


2019 च्या विधासभा निवडणुकीत शिवसेनेकडून मंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांची उमेदवारी निश्चित आहे. 2014 प्रमाणे जर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यास भाजपकडून खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांना उमेदवारी मिळू शकते. भाजपकडून त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नुकत्याच झालेल्या वंचित आघाडीच्या मुलाखतींमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच पक्षांच्या गोट्यात वंचित आघाडीमुळे चिंता पसरली आहे.


वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे, त्याती प्रचिती लोकसभा निवडणुकीत देखील आली. जालना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 2014 च्या निवडणुकीप्रमाणे मुस्लिम आणि दलित मतदारांची मते घेतली तर ती साहजिकच काँग्रेससाठी ही धोका ठरतील. दलित, मुस्लीम, ख्रिश्चन इत्यादी समाजघटकतील एक लाखापेक्षा अधिक मतदार या विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी किंवा शिवसेना-भाजप युतीच्या विजयामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची दाणादाण उडवून जालना लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यांनी काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांचा तबल 3 लाख 32 हजार 815 मतांनी पराभव केला. यात जालना विधानसभा मतदार संघात दानवे यांना 41 हजार 815 मतांची आघाडी होती. लोकसभा निवडणुकीतील याच प्रभावाचा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न युतीच्या उमेदवाराकडून होईल.


2019 लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते


रावसाहेब दानवे (भाजप) - 698019 मतं


विलास औताडे (काँग्रेस) - 365204 मतं


शरद वानखेडे (वंचित बहुजन आघाडी) - 77158 मतं


जालना विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार संख्या 2 लाख 90 हजार 207 एवढी आहे. यावेळी तिरंगी लढत झाल्यास विजयी उमेदवाराचे मताधिक्य कमी असणार यात शंका नाही. मतदारसंघातील प्रश्न शहरी भागाशी निगडीत असून, यात पाणीपुरवठा, रस्ते, शहरांतर्गत पाणीपुरवठा, स्टील औद्योगिक वसाहत विकास, सिड पार्क, मोसंबी प्रक्रिया केंद्र इत्यादी अनेक प्रश्न मागच्या 20 वर्षापासून निवडणुकीचे मुद्दे राहिले आहेत. मात्र हे प्रश्न आद्यपही सुटले नसल्याने यावेळी देखील या मुद्यांवर मतदारांना आकर्षित करण्याचे काम उमेदवार करतील यात शंका नाही.