औरंगाबाद शहरातील आणखी एक विधानसभा मतदार संघ म्हणजे औरंगाबाद मध्य मतदारसंघ. 2014 च्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ सगळ्या राज्यात चर्चिला गेला त्याचं कारण या मतदारसंघातून मराठवाड्यातला एमआयएमला पहिला आमदार मिळाला. इम्तियाज जलील यांनी या मतदारसंघात शिवसेना-भाजपचा पराभव केला. या मतदारसंघाची रचना पाहता मुस्लिम दलित आणि हिंदू मतदारांची संख्या पाहता हिंदू मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र गत निवडणुकीमध्ये हे शिवसेना भाजपा वेगळी लढली आणि सहाजिकच मतांच्या विभाजनाचा फायदा इम्तियाज यांना झाल्याचं पाहायला मिळालं .याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले इम्तियाज जलील हे सध्या औरंगाबादचे खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून एमआयएमच्या इच्छुकांची यादी मोठी आहे.




एमआयएमकडून अतिक मोतीवाला, जावेद कुरेशी, फिरोज खान पटेल, मैफूजुर रहमान, डॉक्टर शमीन रिझवी, समीर साजिद आणि नाशेर कुरेशी यांच्यासह डझनभर नेत्यांची नावं आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढल्याने वंचित बहुजन आघाडी कडून या मतदारसंघांमध्ये अमित भुईगळ ही लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये रस्सीखेच झालेली पाहायला मिळू शकते.



2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपच्या दोनही उमेदवाराला मिळालेली मते जर एकत्रित केली तर इम्तियाज जलील यांना मिळालेल्या मतांपेक्षा ती वीस हजारांहून अधिक आहेत.  या निवडणुकीमध्ये हे शिवसेना-भाजपा जरी एकत्र लढली तरीदेखील वंचित बहुजन आघाडी चा फटका मध्येच या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढवली होती तर भाजपाकडून किशनचंद तनवाणी यांनी नशीब आजमावलं होतं .शिवसेना भाजपाच्या युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येतो. गत निवडणुकीमध्ये शिवसेनेला भाजपापेक्षा 2000 मतं अधिक आहेत त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील असा दावा केला जातोय. शिवसेनेकडून देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अनेकांना निवडणूक लढवायची आहे . ज्यामध्ये हे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, बंडू ओक , राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात ,महापौर नंदकुमार घोडेले ,विकास जैन यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपा देखील हा मतदार संघ स्वतःकडे मिळवण्यासाठीचे प्रयत्न निश्चित करेल.

गत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढली होती .काँग्रेस कडून एम .एम .शेख तर राष्ट्रवादीकडून विनोद पाटील यांनी नी की निवडणूक लढवली होती मात्र दोघांनाही पंधरा हजारापेक्षा कमी मतं मिळाली आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं . या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता अधिक आहे. असलं तरी या मतदारसंघातूनही काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवार शोधावाच लागेल.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कसे होते चित्र


इम्तियाज जलील (एमआयएम) : 61 हजार 843 मते
प्रदीप जयस्वाल (शिवसेना) : 41 हजार 861 
किशनचंद तनवाणी (भाजप)  : 40 हजार 770 मत
विनोद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)  : 11 हजार 842 मत


लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती मते ?


2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना या मतदारसंघातून 99 हजार 450 मते मिळाली होती. तर शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना 50 हजार 327 मतं मिळाली होती. तसेच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 30 हजार 210 मतं मिळाली होती.


लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी इम्तियाज जलील यांना मिळालेली मते एकोणवीस हजाराने अधिक आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तनवाणी आणि जैस्वाल यांना मिळालेली मतंही लोकसभेमध्ये हर्षवर्धन आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मतांएवढीच आहेत. त्यामुळेच या मतदारसंघातून लढण्यासाठी एमआयएमचे अनेक नेते इच्छुक आहेत. तर दुसरीकडे याच मतांमुळे वंचित बहुजन आघाडीला देखील हा मतदारसंघ एमआयएमने वंचित साठी सोडावा असे वाटते.


2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेना-भाजप विरुद्ध एम आय एम, वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढाई झालेली पाहायला मिळेल. जो कोणी विरोधकांच्या मतांचे विभाजन करण्यात यशस्वी होईल तोच या मतदार संघातुन मतदारसंघातून बाजी मारेल असे सध्याचे चित्र आहे.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित मतदारसंघापैकी हा एक मतदार संघ असेल हे मात्र नक्की.