अमरावती विधानसभा मतदारसंघ हा पूर्णतः शहरी मतदारसंघ असून या मतदार संघाने नेहमीच विचारपूर्वक कौल आजवरच्या निवडणुकीत दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचा अमरावतीत पराभव झाला असला तरी लोकसभा निवडणूक निकालाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीवर होणार, असे अमरावती विधानसभा मतदारसंघात तरी अजिबात वाटत नाही.


अमरावतीचे विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी गेल्या निवडणुकीतच काळाची पावलं खऱ्या अर्थाने ओळखून भाजपमध्ये प्रवेश घेतला. तो त्यांच्या पथ्यावरच पडला. खरं सांगायचं तर लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा झंझावात आहे, हे सिद्ध झालं. आज अमरावती मतदारसंघातही राजकीय वातावरण हे मोदीमय असेच आहे. हे जरी खरं असलं तरी काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत हे सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराची धुरा रावसाहेब शेखावत यांनी यशस्वी पेलली आणि अमरावती विधानसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळाली. आज रावसाहेब शेखावत पांडुरंग महोत्सवासारखे कार्यक्रम मतदार संघात आयोजित करून आपला जनसंपर्क दांडगा करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमधून रावसाहेबांना विरोधही होत आहे. काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष विश्वासराव देशमुख हे रावसाहेब शेखवतांविरोधात अगदी मांडी थोपटून समोर आले आहेत. यावेळी रावसाहेब नव्हे तर मलाच काँग्रेसने उमेदवारी द्यावी आम्ही काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते आहोत वगैरे सांगणे सुरू केले आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष सागर देशमख यांनीही उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके या त्यांचा बडनेरा मतदारसंघ सोडून अमरावतीतून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. आजच्या घडीला खोडके आणि शेखावत यांच्यात 36 चा आकडा आहे. विशेष म्हणजे खोडके आणि डॉ. सुनील देशमुख यांचे तर कधीही आपसात पटलं नाही. आज खोडके असोत वा एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अमरावतीत दोन्हीसाठी पोषक वातावरण आजिबात नाही. अमरावती विधानसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या बाजूने कल देणारा मतदारसंघ राहिला आहे. मध्यंतरी जगदीश गुप्ता यांनी दोन वेळा काँग्रेसचा पराभव करून या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला होता. डॉ. सुनील देशमुख यांनी 1994 साली जगदीश गुप्ता यांचा पराभव करून अमरावती विधानसभा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा चढविला. खरंतर डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये आमदार आणि मंत्री असताना या मतदारसंघाचा कायापालट झाला.

2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सुपुत्र असणारे रावसाहेब शेखावत यांची अचानक अमरावतीच्या राजकारणात एन्ट्री झाली आणि डॉ. सुनील देशमुख यांच्याविरोधात काँग्रेसने अन्यायाची भूमिका घेतली. केवळ राष्ट्रपतीपदाच्या दबावामुळे आपला हक्क डावलला जातो आहे म्हणून डॉ. सुनील देशमुखांनी 2009 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढली. राष्ट्रपती पुत्रविरोधात डॉ. सुनील देशमुखांचा लढा देशभर चर्चेचा विषय ठरला. 2009 मध्ये रावसाहेब शेखावत यांच्या रुपात अमरावती विधानसभा मतदारसंघाला नवे नेतृत्व मिळाले. प्रतिभा पाटील राष्ट्रपती असल्याने अमरावती शहराचे चित्र बरेचसे बदलले. प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला तोच 2014 च्या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपचे निशाण हाती घेऊन रावसाहेब शेखावत यांचा पराभव करून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढला.

अमरावती मतदार संघात मुस्लिम आणि दलितांचे प्राबल्य आहे. यासोबतच देशमुख-पाटील समीकरणही निवडणुकीत अतिशय महत्वाची ठरते. अमरावती शहरात मुस्लिम मोठ्या प्रमाणात असले तरी मुस्लिम समाजातील अनेकांचे. डॉ. सुनील देशमुख यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध आहेत. यामुळे डॉ. सुनील देशमुख भाजपचे की काँग्रेसचे हा मुद्दा गौण ठरतो. एकूण मतदारांची आजची मानसिकता काय असेल याचा अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. आता निवडणुकीचा ज्वर हळू हळू वाढायला लागला असून अमरावती मतदारसंघात येत्या काही दिवसात कसे चित्र पाहायला मिळते याची उत्सुकता सर्वांना आहे.