मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात सरासरी 61.30 टक्के मतदानाची नोंद झाल्याचा अंदाज आहे. म्हणजेच एक कोटी 58 लाख 9 हजार 109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं, तर पुणेकर मतदारांनी मात्र निराशा केली.


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं.

कोल्हापुरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 69 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूरपाठोपाठ हातकणंगलेतही मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. पुणेकरांना मात्र 'दुपारी एक ते चार' वामकुक्षीचा आवरता आला नसल्याचं चित्र आहे. कारण आज मतदान झालेल्या राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये पुण्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. पुणे कसाबसा पन्नाशीचा आकडा पार झाला. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुण्यात केवळ 53 टक्के मतदान झालं.

मतदारसंघ - टक्केवारी

कोल्हापूर - 69 टक्के


हातकणंगले - 68.50 टक्के

सांगली - 64 टक्के  

जालना - 63 टक्के


अहमदनगर - 63 टक्के

माढा - 63 टक्के


रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 62.26 टक्के

औरंगाबाद - 61.87 टक्के

बारामती - 59.50  टक्के   

रायगड - 58.06 टक्के     

जळगाव -  58 टक्के


रावेर -  58 टक्के   

सातारा - 57.06  टक्के

पुणे - 53 टक्के

सरासरी - 61.30 टक्के

राज्यभरात सध्या तापमान चांगलंच वाढत आहे. उन्हात फिरताना अंगाची लाही लाही होत असल्यामुळे अनेक जण घरी बसणं पसंत करतात. मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला हक्क बजावणं अपेक्षित आहे. परंतु  तापमानाचा पारा वाढल्यानंतर राज्यभरात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.

उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुनिल तटकरे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद झाली आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात होता.

ऐनवेळी अपेक्षित उमेदवारांचं कापलेलं तिकीट, दुसऱ्या पक्षातील 'आयारामां'ना दिलेली उमेदवारी, त्यावरुन झालेले रुसवे-फुगवे यामुळे यापैकी बहुतांश मतदारसंघ चर्चेत राहिले होते. सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रचारही जोरदार झाला. आता मतदारराजाने ईव्हीएमचं बटण दाबून कुणाला कौल दिला, हे बरोबर एका महिन्याने म्हणजे 23 मे 2019 रोजी समजेल.
महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, ओदिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही तेरा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

तिसऱ्या टप्प्यातील रंगतदार लढती

पुणे : गिरीश बापट (भाजप) vs मोहन जोशी (काँग्रेस)
बारामती : कांचन कुल (भाजप) vs सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) 
माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर  (भाजप) vs संजय शिंदे (राष्ट्रवादी)
सांगली : संजय पाटील  (भाजप) vs विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
सातारा :  नरेंद्र पाटील (शिवसेना) vs उदयनराजे भोसले  (राष्ट्रवादी)
कोल्हापूर :  संजय मंडलिक (शिवसेना) vs धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) vs राजू शेट्टी  (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
जळगाव :  उन्मेष पाटील (भाजप) vs गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर :  रक्षा खडसे (भाजप) vs उल्हास पाटील (काँग्रेस)
अहमदनगर :  सुजय विखे (भाजप) vs संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
जालना :  रावसाहेब दानवे (भाजप) vs विलास औताडे (काँग्रेस)
औरंगाबाद :  चंद्रकांत खैरे  (शिवसेना) vs सुभाष झांबड (काँग्रेस)
रायगड :  अनंत गीते  (शिवसेना) vs सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग :  विनायक राऊत  (शिवसेना) vs नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) vs निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)