मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राज्यात मोठी मुसंडी मारली. राज्यात महायुतीत भाजपला 9, शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गट 9 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. महायुतीला बसलेल्या फटक्याची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला मला सरकारमधून मोकळं करावे, अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार असल्याचे वक्तव्य केले. याबाबत मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) एबीपी माझाने संवाद साधला असता त्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. 


देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेबाबत छगन भुजबळ म्हणाले. पराभवानंतर दु:ख होणं स्वाभाविक आहे. आपल्यामुळेच हे झाले, असे त्यांना वाटत असावे. यश-अपयश ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कोणा एकावर ठपका ठेवणे योग्य नाही. महायुतीचे झाड वादळात सापडले आहे. यावेळी जे कर्णधार आहेत. त्यांनी बाजूला होणे हे योग्य नाही. सर्वांनी एकत्र राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करायला हवी. सरकार सुरळीत चालण्यासाठी फडणवीसांचे सरकारमध्ये राहणे आवश्यक आहे. त्यांनी बाहेर होण्याचा अजिबात प्रयत्न करु नये, असे त्यांनी म्हटले. 


नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात उशीर 


नाशिकसह इतर ठिकाणी उमेदवार देण्यात चूक झाली का?  असे छगन भुजबळ यांना विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, हो खरे आहे. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आज सकाळी म्हणाले की, माझी उमेदवारी जाहीर करण्यात फार उशीर झाला. नाशिक लोकसभेसाठी अगोदर माझे नाव चर्चेत आले होते. मात्र नावाची घोषणा लवकर न झाल्याने मी माझी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उशीर झाल्याने मी सांगितले होते की आता लवकर कुणाचे तरी नाव जाहीर करा. मी माघार घेतल्यानंतर देखील 12, 13 दिवस उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. त्यानंतर निर्णय घेण्यात आला. 


कांद्याचा प्रश्न अडचणीचा ठरला


छगन भुजबळ म्हणाले की, निवडणुकीसाठी एक एक दिवस महत्वाचा असतो. हेमंत गोडसे म्हणाले की, अंतिम दिवसाच्या आधी मला सांगण्यात आले की फॉर्म भरा. फॉर्म भरला त्यानंतर आम्ही प्रचाराला लागलो. उशीर झाला हे खरं आहे. मात्र, ते एकच कारण आहे का? नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न अतिशय अडचणीचा झाला होता. तसेच 400 पारचा नारा, म्हणजे संविधानात बदल केला जाणार, असा प्रचार विरोधकांकडून झाला. त्यामुळे काही ठिकाणी ठोकर बसली. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294


इंडिया आघाडी- 232


इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 29


महायुती- 18


अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9


शिवसेना (शिंदे गट)-7


राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13


ठाकरे गट-9


शरद पवार गट-8


आणखी वाचा 


उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांसह 6 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता, पराभवाची कारणे काय?