Belgaum Election 2023 : महाराष्ट्रात एखाद्या घरात दोन व्यक्ती आमदार किंवा खासदार असणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र अशांवर घराणेशाहीचा आरोप होऊन पुढच्या निवडणुकीवेळी त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. पण सीमाभागात, बेळगाव जिल्ह्यात मात्र एकाच घरातील चार सख्खे भाऊ आमदार आहेत. इतकंच नाही तर, सरकार कुणाचंही असो, बेळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यापैकीच एका भावाकडे असतं आणि बेळगावाच्या राजकारणातही त्यांचा शब्द अंतिम असतो. गोकाकच्या जारळीहोळी बंधूंपैकी (Jarkhiholi Brothers) तीघेजण विधानसभेवर निवडून गेले आहेत, तर एकटा विधानपरिषदेवर निवडून गेला आहे. एकाच घरातील चार सख्खे भाऊ आमदार असणे ही देशातील पहिलीच वेळ आहे. 


मूळचे गोकाकचे असणारे जारकीहोळी बंधू यांचं बेळगावच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठं प्राबल्य आहे. रमेश, सतिश, भालचंद्र आणि लखन या चौघा भावांचा राजकीय प्रवासही जबरदस्त आहे. कधी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, एकमेकांना पाडलं तर कधी-कधी चौघांनी एकाच ठिकाणी बसून राजकीय शत्रूंचा काटा काढला, त्यावेळी मात्र त्यांनी पक्षाचा विचार केला नाही. उलट ते म्हणतील तीच पक्षाची भूमिका अशी स्थिती आहे. आता भाजपमधून दोन, काँग्रेसमधून एक आणि अपक्ष एक असे चार जारकीहोळी भाऊ आमदार आहेत.


Ramesh Jarkiholi : रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेस सरकार पाडलं 


जारकीहोळी कुटुंबातील सर्वात मोठे बंधू असलेले रमेश जारकीहोळी हे सध्या भाजपमध्ये आहेत. रमेश जारकीहोळी यांनी सर्वप्रथम 1999 साली काँग्रेसमधून निवडणूक लढवली. गोकाक मतदारसंघातून त्यांनी आतापर्यंय कायम विजय मिळवला आहे. 2019 साली त्यांनी काँग्रेसमधील 16 आमदारांचा गट फोडला आणि भाजपमध्ये प्रवेश मिळवला. 


2019 सालच्या निवडणुकीत रमेश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रीपद हवं होतं, तसेच बेळगावचे पालकमंत्रीपद हवं होतं. पण काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं नाही, आणि पालकमंत्रीपद त्यांना न मिळता सतीश जारकीहोळी यांना मिळालं. आपली ताकद दाखवण्यासाठी मग रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेसमधील 16 आमदारांचा गट फोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. फुटलेले हे 16 ही आमदार निवडून आले, त्यापैकी 12 जणांना मंत्रिपदं मिळाली. 


भाजप सत्तेत आल्यानंतर रमेश जारकीहोळी यांना महत्त्वाचं पद मिळणार असं दिसत असतानाच त्यांचं वादग्रस्त सीडी प्रकरण बाहेर आलं आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. असं असलं तरी त्यांचं राजकीय वजन मात्र कमी झालेलं नाही. आताही बेळगावातील भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांचाच शब्द अंतिम धरला आहे. रमेश जारकीहोळी यांनी आपल्या सर्व समर्थकांना तिकीटं मिळवून दिली आहेत हे विशेष. 


Satish Jarkiholi : सतीश जारकीहोळी, साधी राहणी पण राजकारणावर भन्नाट पकड 


जारकीहोळी बंधूतील दुसरे म्हणजे सतीश जारकीहोळी. सतीश जारकीहोळी यांचं राहणीमान हे अत्यंत साधं असं, पण राजकारणावरची पकड मात्र जबरदस्त. आजही बेळगाव जिल्ह्यातील राजकारण हे त्यांच्या शब्दाशिवाय पुढे जात नाही असंच चित्र आहे. सतीश हे आधी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते होते. 2006 साली त्यांनी सिद्धारमय्या (Siddaramaiah) यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. 2008 मध्ये त्यांनी यमकनमर्डी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आतापर्यंत त्यांनी तिथून विजय मिळवला आहे. 


काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते. बेळगाव जिल्ह्यातील बऱ्याच मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, पण भाऊ रमेश आणि लखन यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने अगदी कमी मताधिक्क्याने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आताही सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्यासोबत सतीश जारकीहोळी हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत. 


लखन जारकीहोळी (Lakhan Jarkhiholi) यांनी या आधी, 2019 साली त्यांचे बंधू रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी घेतली होती. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. नंतर रमेश आणि लखन हे एकत्र आले आणि त्यांनी सतीश जारकीहोळी यांना लोकसभेसाठी विरोध केला, त्यांचा पराभव केला. पण विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीत लखन यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यावेळी सर्व जारकीहोळी बंधू राजकीय मतभेद विसरून एकत्र आले आणि त्यांनी लखन यांना आमदार केलं. 


भालचंद्र जारकीहोळी (Balachandra Jarkiholi) यांनी 2008 साली जनता दल सोडले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 2008 साली त्यांना मंत्रीपदही मिळालं होतं. भालचंद्र जारकीहोळी हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. 


सरकार कुणाचंही असो, लाल दिवा घरातच हवा


नेहमी एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे जारकीहोळी बंधू निवडणुका आल्यानंतर मात्र एक होतात. वेगवेगळ्या पक्षात असलेले जारकीहोळी बंधू एकत्र बसतात आणि आपल्या विरोधकाचा काटा काढतात. तसेच सरकार कोणाचंही असो, मंत्रीपद आणि जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आपल्याच कुटुंबात असावं हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र. 


बेळगावातील 10 मतदारसंघात थेट प्रभाव 


जारकीहोळी बंधूंचा बेळगावातील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघात थेट प्रभाव आहे. गोकाक, यमकनमर्डी, आरभावी या मतदारसंघांसोबत बेळगाव ग्रामीण, अथनी, कागवाड, निपाणी, बेळगाव शहर या इतर मतदारसंघावरही पकड आहे. 


जारकीहोळींचा एक पाचवा भाऊ, भिमसी जारकीहोळी हे कारखानदार आहेत. बेळगावातील तब्बल नऊ कारखाने जारकीहोळींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मालकीचे आहेत. त्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर भक्कम पकड ठेवली आहे. जारकीहोळी बंधूंकडून दादागिरी केली जाते, विरोधकांना संपवण्यासाठी कोणताही थर गाठला जातो अशी दबक्या आवाजात चर्चा असते. 


जारकीहोळी बंधूंना फोडण्याचं, त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून झालं. पण सध्यातरी जारकीहोळी बंधू सर्वांना पुरुन उरले आहेत. आताही रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे भाजपमधून तर सतीश जारकीहोळी हे काँग्रेसमधून निवडणूक लढत आहेत. 


राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर सतीश जारकीहोळी हे थेट मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. भाजपची सत्ता आली तर रमेश जारकीहोळी हे उपमुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील, बेळगावचे पालकमंत्री त्यांनाच मिळण्याची शक्यत आहे. या व्यतिरिक्त जर जनता दलाला सरकार बनवण्याची संधी मिळालीच तर अपक्ष आमदार लखन जारकीहोळी हे त्या पक्षाला पाठिंबा देऊन एखादं मंत्रीपद मिळवतील यात शंका नाही. 


ही बातमी वाचा: