जळगाव : जळगाव विधानसभा मतदारसंघावर गेली चाळीस वर्षे सुरेश जैन यांची घट्ट पकड असल्याचे पाहायला मिळाले आहे. पक्ष कोणताही असो सुरेश जैन हे विजयी होणारच असं जणू समीकरणच या ठिकाणी बनलं होतं. राजकारणाच्या प्रवासात अनेक पक्षात प्रवेश करुन त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली होती. यामागे त्यांचा दांडगा जनसंपर्क, आक्रमक स्वभाव आणि विकासाची दृष्टी ही कारणे सांगितली जातात.


केवळ जळगाव मतदार संघाचेच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे राजकारण नेहमीच सुरेश जैन यांच्या अवतीभवती फिरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. जैन मंत्रीपदावर असताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे जैन यांना मंत्रीपद गमवावं लागलं होतं. त्यानंतर सुरेश जैन यांनी थेट अण्णा हजारेंच्या विरोधात मुंबईत उपोषण करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याचवेळी राष्ट्रवादी पक्षाला संपविण्याची भाषा केल्याने जैन हे राजकारणात चांगलेच चर्चेत आले होते.

काही काळातच जळगाव घरकुल घोटाळा प्रकरण समोर आलं आणि सुरेश जैन यांच्या अडचणींना सुरुवात झाली. या घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन यांना कारावासदेखील भोगावा लागला. कारावासाच्या काळात देखील जळगाव मनपाच्या निवडणुकीत त्यांच्या खान्देश विकास आघाडीने विजय मिळवल्याने सुरेश जैन यांची स्थानिक राजकारणावरील घट्ट पकड कायम असल्याचं दिसून आलं होतं.

2014 च्या निवडणुकीत सुरेश जैन हे कारागृहात असताना त्यांनी सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदी लाटेत सुरेश जैन यांना मोठा पराभव पत्करावा लागला. भाजपचे सुरेश भोळे यांनी त्यांचा 42 हजार 314 इतक्या मतांनी जैन यांचा पराभव केला होता.

ही जागा आतापर्यंत शिवसेनेकडे जागा राहिलेली होती. मात्र युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच भाजपने मुसंडी मारत विजय मिळवला. त्यामुळे भाजप पुन्हा जागेसाठी दावेदार मानला जात आहे. या निकालानंतर सुरेश जैन यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी विविध चर्चा होताना पाहायला मिळत होत्या. घरकुल घोटाळा प्रकरणात नुकतेच कारागृहातून जामीनावर बाहेर पडल्यानंतर सुरेश जैन हे राजकारणापासून अलिप्तच असल्याचे पाहायला मिळालं होत. परंतु जैन यांना फार काळ राजकारणापासून अलिप्त राहणे अशक्य होतं.

राज्यात सेना भाजप युतीसाठी अनुकूल असलेलं वातावरण पाहता सुरेश जैन यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जळगाव मतदार संघाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जळगाव मतदार संघात भाजपचे आमदार सुरेश भोळे हे देखील पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र युती झाली तर तिकीट कोणाला मिळते यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

भाजपकडून कैलास सोनवणे, ललित कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे विष्णू भंगाळे यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगला पाटील, अश्विनी देशमुख या इच्छुक आहेत. काँग्रेस पक्षातर्फे डॉ. राधेशाम चौधरी तर एमआयएमतर्फे रेयान जहागीरदार हे इच्छुक असले तरी खरे लक्ष सुरेश जैन यांच्या भूमिकेकडे असल्याचे पाहायला मिळत आहे.

नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्याचा निकाल अद्याप प्रलंबित असून तो पुढे ढकलला जात आहे. विधानसभा निवडणुकीआधी निकाल लागला तर सुरेश जैन यांना शिक्षा होईल, की ते सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटतात यावरही सुरेश जैन यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. निर्दोष सुटल्यास ते राजकारणात पुन्हा उर्जितावस्थेत भरारी घेतात काय? याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत जळगावात भाजपा-शिवसेना युतीचा मोठा प्रभाव झाला आहे.

सध्या जळगाव महानगरपालिकेत भाजपने सर्वाधिक जागा मिळवून वर्चस्व निर्माण केले आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांची काय भूमिका राहील? हेदेखील महत्वाचे आहे. गिरीश महाजन यांचा गट हा सुरेश जैन यांना सहकार्य करणारा दिसून येत आहे. त्यामुळे खडसे गट हा तटस्थतेची भूमिका घेण्याची शक्यता आहे. याचा सुरेश जैन यांनाच याचा फायदा होऊ शकतो. 2014 साली एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून खडसे आणि जैन यांना ओळखले जात होते. त्यानंतर दरम्यानच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे एकनाथ खडसे बचावात्मक परिस्थितीत आहेत तर घरकुल घोटाळ्यातील दाखल गुन्ह्याने सुरेश जैन हे दोघेही अडचणीत आहेत.

दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये उर्जितावस्था मिळण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी हे सक्रीय आणि दावेदार उमेदवार असले तरिही कॉंग्रेसकडे विजयासाठी सध्या कुठलीही सकारात्मक बाजू नाही. कार्यकर्ते आणि काँग्रेस समर्थक कमी असे चित्र आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही परिस्थिती सारखीच आहे. सध्या महिला उमेदवार मंगला पाटील आणि अश्विनी देशमुख हेच उमेदवारीच्या चर्चेत आहेत. सेना भाजपची केंद्रासह राज्यात असलेली घट्ट पकड पाहता या काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. प्रभावशील नेते संपल्यात जमा असल्याचे दोन्ही पक्षात चित्र आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
सुरेश भोळे, भाजप – 88 हजार 363 मतं
सुरेश जैन, शिवसेना – 46 हजार 49 मतं