वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच वेळा काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे तर तीन वेळा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 1985 नंतर इथे कधीही काँग्रेसला यश मिळालं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागील निवडणुकीत इथे भाजपचं कमळ फुललं. हा मतदारसंघ सातत्यान बदल घडवणारा अशी ओळख आहे. दोन आमदारांचा अपवाद सोडला तर हिंगणाघाटच्या मतदारांनी कधीही आपल्या आमदाराला दुसऱ्यांदा निवडून दिलं नाही.


शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखल्या जाणारे, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनाही पराभव दाखवणारा हा मतदारसंघ. शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपाचं कोड सुटलं की आघाडीचेही उमेदवार स्पष्ट होताच निवडणुकीला रंगत येईल. यावेळी इथे भाजपचं कमळ पुन्हा खुलणार की राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे.


हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) ही महत्त्वाची शहरे आहेत. यातील हिंगणघाट ही मोठी बाजारपेठ आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती समजली जाते. वार्षिक कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीवर सहकार गट म्हणजेच आताच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. पण नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे बहुतेक सर्कल भाजपच्या ताब्यात आहेत. कधी काळी हा भाग शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला. शेतकरी संघटनेचे मोठे नेते येथून उदयास आले. पण, वसंतराव बोंडे वगळता शेतकरी संघटनेच्या कोणालाही या मतदारसंघात फारसं राजकीय यश मिळालं नाही. शेतकरी नेते वसंतराव बोंडे दोनवेळा, शिवसेनेचे अशोक शिंदे हे तीनवेळा येथून आमदार राहिले आहेत. इतरांना मात्र अशी संधी मिळाली नाही.


या मतदारसंघाच्या भूतकाळात डोकावल्यावर काय दिसतं. 1962 मध्ये विनायक चौधरी हे अपक्ष आमदार निवडून आले. 1967 ते 1985 पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिलेत. यात 1985 मध्ये वसंतराव बोंडे हे शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर या मतदारसंघात मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला कायम हाताची मूठ बांधून घेतली. शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने वसंतराव बोंडे जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले. 1995 मध्ये शिवसेनेकडून अशोक शिंदे यांनी भगवा फडकवला. यावेळी त्यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांचा पराभव केला होता. 1999 मध्ये पुन्हा अशोक शिंदे विजयी झाले. यावेळी अशोक शिंदे यांना शिवसेना-भाजप सरकारमध्ये उद्योग राज्यमंत्रीपद मिळालं होतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू तिमांडे विजयी झाले. 2009 मध्ये अशोक शिंदे यांनी पुन्हा बाजी मारली. यावेळी अपक्ष म्हणून समीर कुणावार दुसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपकडून रिंगणात उतरताना समीर कुणावार यांनी तब्बल 65 हजार अशा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून कमळ खुलवलं. त्यांनी पाच वर्षाच्या सत्ताकाळात मतदारसंघात विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक कामे, अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. हिंगणघाटचा पुन्हा संधी न देण्याचा इतिहास पाहता ही निवडणूक कुणालाही सोपी जाणारी नाही.

हिंगणगाटच्या जागेसाठी शिवसेना करू शकते दावा

शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे हे सर्वाधिक तीन वेळा येथून आमदार राहिले आहेत. त्यामुळे इथे तिकीटाकरिता शिवसेना दावेदारी करू शकते. भाजपला जागा सोडायची नसल्यास शिवसेनेला देवळी मतदारसंघाचा पर्याय दिला जाऊ शकतो असाही सूर ऐकायला मिळत आहे.

अंतर्गत गटबाजी

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षात येथे अंतर्गत गटबाजी आहे. हिंगणघाट पालिकेतील काही नगरसेवक, काही पदाधिकाऱ्यांत सुप्त नाराजीचे सूर ऐकायला मिळतात. युती झाली तरी ज्याचं तिकीट कटेल तो युतीच्या उमेदवाराचं काम करेल का, याविषयी कुणालाच खात्री देता येत नाही. बसपाची मतेही परिणाम करणारी असतील. मनसे जोरात नसली तरी राजकीय महत्वाकांक्षा ठेवून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार राजू तिमांडे यांच्या पुढे सहकार नेते, बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांचं आव्हान असणार आहे. अॅड कोठारी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरण्यासाठी तयारी करत आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क त्यांची दावेदारी प्रबळ करणारा ठरतो.

हिंगणघाटसाठी 2014 ची निवडणूक ही आगळी वेगळी होती. या निवडणुकीत भाजपने सर्वच उमेदवारांची अमानत रक्कम जप्त केली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अनुक्रमे तिसऱ्या चवथ्या क्रमांकावर ढकलत बहुजन समाजवादी पक्षाचे प्रलय तेलंग हे दुसऱ्या क्रमांकावर आले. या निवडणुकीनंतर प्रलय तेलंग यांचा नगर पालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने बहुजन समाज पक्षाकडून त्यांचे नाव मागे पडले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अनिल जवादे यांची उमेदवारी ही अनेक छोट्या मोठ्या पक्षांच्या पाठिंब्याने केली जाऊ शकते. अनिल जवादे हे देखील मोठं आव्हान उभे करू शकतात.

लोकसभेत भाजप उमेदवाराला सर्वाधिक आघाडी

लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगणघाट मतदारसंघातून सर्वाधिक 38 हजार 278 एवढं मताधिक्य मिळालं होतं. लोकसभेत भाजपचे रामदास तडस यांना 103610 तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना 65332 मते मिळाली.

मागील निवडणुकीत मिळालेली मतं

समीर कुणावार (भाजप) 90275 प्रलय तेलंग (बसपा) 25100 राजू तिमांडे (राष्ट्रवादी काँग्रेस) 23083