सिंधुदुर्ग : कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरु आहे. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असं काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असं नाही, असं वक्तव्य केलं आहे.


ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच, असं कुणीही समजू नये. मागील इतिहास पाहिला तर ज्यांची चौकशी झाली त्या सर्वांनाच अटक झाली असं नाही. कालच उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात सांगितल की चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं.


काल दिल्लीत जो प्रकार झाला तो महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे. ईडी चौकशीला राज ठाकरे यांनीही संयमाने घेतलं आणि सहकार्य केलं आहे. कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसेच मी देखील सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करतो, असं केसरकर म्हणाले.



मनसे कार्यकर्त्यांची फार मोठी धरपकड करायची असती तर ती कालच झाली असती. पोलीस विभागाने संयमाने घ्यावं अशा सूचना केल्या आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली, असं वाटत नाही. कोणावरही दडपशाही करण्याचा हेतू नाही, मात्र खबरदारी घ्यावी लागले, असं केसरकर यांनी सांगितलं.


मुंबई मोठं शहर असल्याने कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखणं ही सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस खात्याचं हे कर्तव्य आहे, म्हणून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामागे काही वेगळी भूमिका नाही. तसेच या चौकशीतून काही निष्पन्न झालं नाही तर लोक हे प्रकरण विसरुनही जातील, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.


VIDEO | राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? : अंजली दमानिया



संबंधित बातम्या