Assembly Election Result : पाच राज्यातल्या निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीमध्ये घमासान होवू शकते. पाचही राज्यांमध्ये मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनं छोट्या पक्षांना विश्वासात घेतलं नाही असं सगळ्यांचं मत  झालं आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तसे बोलून गेल्यात. मध्य प्रदेशमध्ये अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याविषयी केलेल्या कमलनाथ यांच्या वक्तव्याची ही चर्चा झाली होती. जर सगळ्या छोट्या पक्षांना एकत्रित घेतलं तरच इंडिया आघाडी टिकेल असं मत या नेत्यांच आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे. 


हिंदी भाषिक राज्यांत मोठा विजय मिळवून भाजपने 2024 चा आपला मार्ग आणखी प्रशस्त केला आहे.  लोकसभेच्या 65 जागा असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. केवळ तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन केले. तेथे लढत बीआरएसशी होती. प्रादेशिक पक्षांवरील काँग्रेसच्या विजयाने विरोधी आघाडीचा मार्ग सोपा व्हायच्या ऐवजी अधिक कठीण होईल. त्याला कारणे आहेत. 


निकाल लागताच इडिया आघाडीतील पक्षांची टीका 


इंडियात सहभागी झालेल्या पाच पक्षांची त्यांच्या त्यांच्या राज्यात सरकारे आहेत. पाच राज्यांच्या निकालांमुळे कमकुवत झालेली काँग्रेस तेथे आपल्या मागण्या रेटू शकणार नाही. त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. 


निकाल लागताच घटकपक्षांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांनी हा भाजपचा विजयाऐवजी काँग्रेसचा पराभव म्हटले आहे. जेडीयू नेते केसी त्यागी म्हणाले की काँग्रेस स्वबळावर जिंकू शकत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विजयाचा आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांचीही तिच भाषा आहे. पण वास्तव वेगळे आहे.


उत्तर प्रदेश: अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. यूपीमध्ये काँग्रेसची नजर सपाच्या मुस्लिम व्होट बँकेवर आहे. अशा स्थितीत सपाला वेगळा मार्ग निवडावा लागल्यास विलंब लागणार नाही. यूपीत काँग्रेसकडे फक्त 1 जागा आहे. 


बिहार : नितीशकुमार यांनी काँग्रेसवर आघाडीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. बिहारमध्ये भाजप जेडीयूला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत आगामी काळात जेडीयूने वेगळा मार्ग पत्करला तर नवल वाटणार नाही.


पश्चिम बंगाल : जागावाटपाची सर्वाधिक लढत येथे आहे. गेल्या लोकसभेत भाजपला 42 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. डावे पक्ष व काँग्रेसने ममतांच्या अटी मान्य केल्या नाही तर ते वेगळे होऊ शकतात. तिघेही एकत्र राहिले तर भाजपला फायदा होईल. 


दिल्ली-पंजाब : ईडीच्या तपासाला सामोरे जाणारे अरविंद केजरीवाल काँग्रेसला पाठिंबा देण्याऐवजी दूर जाऊ शकतात. दोन्ही राज्यांमध्ये जागावाटपही सोपे नाही. 


झारखंड : हेमंत सोरेन सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग आहे. दोन्ही पक्षांची व्होट बँक सारखीच आहे. छत्तीसगडनंतर एसटीची मते वाचवण्याचे आव्हान सोरेन यांच्यासमोर आहे. दुसरे मोठे आव्हान म्हणजे ईडीचा तपास सोरेनविरुद्धही सुरू आहे


दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र आणि तेलंगणात लोकसभेच्या 130 जागांपैकी भाजपकडे 29 आणि काँग्रेसकडे 27 आहेत. बाकीच्या जागा प्रादेशिक पक्षांकडे आहेत. ओडिशातील 21 पैकी 12, बीजेडी 8,भाजप, काँग्रेसकडे एक जागा आहे. आंध्र प्रदेशात 25 पैकी 22 जागा वायआरएससीपी आणि 3 टीडीपीकडे आहेत. भाजपला 303 वरून आपल्या जागा वाढवायच्या असतील तर दक्षिणेतही मजबूत व्हावे लागेल


तसे प्रयत्न भाजपाने आधीपासूनच सूरू केले आहेत. अकाली दलासह उत्तरेतील काही जुने मित्रपक्ष आणि दक्षिणेतील नवे पक्ष भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात. कर्नाटकच्या पराभवानंतर भाजपने जेडीएससोबत हातमिळवणी केली आहेच. आंध्रात चंद्राबाबू किंवा जगनमोहन रेड्डींपैकी एक पर्याय भाजपा समोर आहे. त्याच वेळी तेलंगण, तामिळनाडू आणि केरळमध्ये लहान पक्षांना जोडून भाजपा आपली जागा मजबूत करू शकतो. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडूल्याने एनडीएसोबत नसलेल्या नेत्यांवर दबाव वाढेल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले तसे या निकालामुळे इंडिया आघाडीत फूट आणि विरोधाभास निर्माण होतील. काँग्रेसची बाजू घेतल्यास पक्षांना पराभवाची जाणीव होऊन ते दूर जातील. 


ही बातमी वाचा: