अकोला : लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात सध्या वादळापुर्वीची शांतता आहे. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ. 1989 पासून आतापर्यंत या मतदारसंघावर भाजपचा झेंडा आहे. याला अपवाद होता 1996 आणि 1998 च्या दोन निवडणुकांचा. या दोन निवडणुकांत प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचले होते.


राज्यासह विदर्भातील सर्वाधिक चर्चित मतदार संघांपैकी एक म्हणजे अकोला. अकोला लोकसभा मतदारसंघ हा भारिप-बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ. मात्र, गेल्या तीन सलग निवडणुकांमध्ये आंबेडकरांचा येथे दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं आंबडेकरांशी आघाडीचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र, बारा जागांची मागणी आणि संघासंदर्भात काँग्रेसनं घ्यायच्या ठोस भूमिकेवर आघाडीचं घोडं अडलं आहे. दरम्यान, शिवसेनेचंही भाजपसोबत युतीच्या मुद्द्यावर तळ्यात-मळ्यात सुरू आहे. आघाडी आणि युतीच्या मुद्द्यावर संभ्रमाचं वातावरण असल्यानं अकोल्यातील संभाव्य लढतीचं चित्र अद्यापही अस्पष्टच आहे. मात्र, २०१९ चा लोकसभेचा अकोल्यातील रणसंग्राम राज्यासाठी औत्सुक्याचा विषय ठरणारे.

अकोला लोकसभा मतदारसंघ राज्यातील एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. कारण या 'मतदारसंघाने राज्याला नेहमीच एक नवा विचार आणि दिशा दिली. 1990 च्या दशकात राज्यभरात गाजलेला प्रकाश आंबेडकर यांच्या 'अकोला पॅटर्न' याच जिल्ह्यात जन्माला आलेला. अलीकडे 'सोशल इंजीनिअरिंग' हा रूढ झालेला राजकीय विचार याच काळात प्रकाश आंबेडकरांनी अठरा पागड जातींना सोबत घेत यशस्वी करून दाखविला होता.

1989 मध्ये अकोला जिल्ह्यात भाजपचा शिरकाव झाला. अन पाहता-पाहता या पक्षाने शिवसेनेच्या मदतीने जिल्ह्यात चांगलेच पाय रोवले. 1998 आणि 1999 अशा दोन टर्म प्रकाश आंबेडकरांचा अपवाद वगळता येथून सातत्याने मोठ्या मताधिक्क्याने भाजपचा उमेदवार विजयी होतो आहे. 2014 च्या मोदी लाटेत खासदार संजय धोत्रेंनी तब्बल दोन लाखांवर मतांनी विजय मिळविला होता. तर प्रकाश आंबेडकर या निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. खासदार संजय धोत्रे चौथ्यांदा येथून लढण्यासाठी सज्ज आहेत. जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील असे दोन गट आहेत. येथून यावेळी संजय धोत्रेंना तिकिटासाठी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे आवाहन मिळण्याची शक्यता आहे. मात्र, खासदार धोत्रेंचा जिल्ह्यात भाजप संघटनेवर असलेला एकछत्री अंमल आणि वैयक्तिक संपर्क दांडगा आहे. यासोबतच प्रत्येक गावात असणारे कार्यकर्त्यांचं असणारं जाळंही त्यांची जमेची बाजू आहे. पालकमंत्री रणजीत पाटील हे याबाबतीत मागे पडत असल्यानं धोत्रेंचं पारडं जड समजलं जातंय.

२०१४ च्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
पक्ष : उमेदवार : मिळालेली मतं
भाजप : संजय धोत्रे : 4 लाख 56 हजार 472
कॉग्रेस : हिदायत पटेल : 2 लाख 53 हजार 356
भारिप : प्रकाश आंबेडकर : 2 लाख 38 हजार 776

हा जिल्हा कोणत्याही राजकीय विचारांना मोठ्या ताकदीने मोठा करणारा. त्यामुळेच 1989 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी जनता राजवटीच्या काळात संपूर्ण देशात काँग्रेसचे 'पानिपत' झालेले असतांना या मतदारसंघात काँग्रेसचे तेंव्हाचे 'बडे नेते' वसंत साठे निवडून आले होते. 1984 मध्ये मधुसूदन वैराळे यांच्या रूपाने या मतदारसंघात काँग्रेसला शेवटचा विजय मिळाला होता. त्यानंतर या जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावरुन काँग्रेस हद्दपार झाली ती कायमचीच.

आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून माजी खासदार अनंतराव देशमुख, मराठा मोर्चाच्या माध्यमातून समोर आलेलं नेत्रूत्व डॉ. अभय पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. या दोन नावांची शिफारस प्रदेश काँग्रेस समितीनं हायकमांकडे केली आहे. आंबेडकरांशी आघाडी न झाल्यास काँग्रेस ऐनवेळी 'मुस्लिम कार्ड' खेळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीत मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह काँग्रेसचे अकोल्यातील माजी राज्यमंत्री अजहर हूसेन हे प्रमुख दावेदार आहेत.

स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेचं धोरण अद्यापही युतीसंदर्भात 'तळ्यात-मळ्यात' असंच राहिलं आहे. मात्र, शिवसेनेनं युती न झाल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून लोकसभेसाठी चाचपणी सुरू केलीय. शिवसेनेकडून विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार गजानन दाळू गुरूजी आणि जेष्ठ नेते विजय मालोकार यांची नावं चर्चेत आहे.

युती न झाल्यास शिवसेना मराठा कार्ड खेळून भाजपाला अडचणीत आणण्याची शक्यता
काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य आघाडीवर या मतदारसंघातील निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. कारण प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी युती असतांना 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत येथून विजयी झाले आहेत. ही आघाडी झाली तर प्रकाश आंबेडकरच आघाडीचे उमेदवार असतील. नाहीतर काँग्रेस आंबेडकरांच्या पराभवासाठीच प्रयत्न करतांना दिसू शकते. ओवेसींच्या एम.आय.एम.सोबत आंबेडकरांनी एकत्र येत वंचित बहूजन आघाडी स्थापन केली आहे. मात्र, आघाडी नसल्यास ऐनवेळी काँग्रेसने येथे मुस्लिम कार्ड खेळल्यास आंबेडकरांना याचा कितपत फायदा होईल, यावर प्रश्नचिन्ह आहे.

अकोल्यातील संभाव्य राजकारणाच्या शक्यता आणि फायदे-तोटे

अ) आंबेडकर आघाडीसह किंवा आघाडीशिवाय लढले तर :
अकोल्यातून लोकसभेवर निवडून जाण्याचं आंबेडकरांचं स्वप्न संभाव्य आघाडीवरच अवलंबून आहे. याआधी 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत आंबेडकर येथून काँग्रेसशी आघाडी केल्यावरच विजयी झाले होते. आंबेडकरांची काँग्रेससोबत आघाडी झाली, मतदार संघातून निवडून काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य आघाडीवर या मतदारसंघातील निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. कारण प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी युती असतांना विजयी झाले आहेत. आघाडी झाली तर त्यांना त्यांच्या हक्काच्या दलित, ओबीसी, छोट्या समाज घटकांसह मुस्लिमांचंही मतदान मिळू शकेल. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट खासदार असदुद्दीन ओवेसी अकोल्यात तळ ठोकण्याची शक्यता आहे.

आंबेडकरांची काँग्रेससोबत ऐनवेळी आघाडी न झाल्यास काँग्रेस मागच्या निवडणुकीसारखं 'मुस्लिम कार्ड' खेळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आंबेडकरांच्या संभाव्य मुस्लिम वोट बँकेवर डल्ला मारण्यासाठी काँग्रेस हा मास्टर स्ट्रोक मारु शकतं.

ब) भाजप-सेनेची युती झाली अथवा न झाल्यास :
भाजप-सेनेच्या युतीसंदर्भात अद्यापही मोठी संदिग्धता आहे. या मतदारसंघात भाजप, भारिपसोबतच सेनेचं मोठं संघटन आहे. अकोला पूर्व आणि अकोट मतदार संघातून अनेकदा शिवसेनेचं आमदार निवडून गेले आहेत. याशिवाय जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांनी बाळापूर मतदारसंघात सेनेचं तगडं संघटन बांधलंय. युतीत प्रत्येक वेळी भाजपच्या विजयात सेनेची महत्वपूर्ण भूमिका राहिलीय. या निवडणुकीतही भाजपला याचा फायदा होऊ शकतो.
ऐनवेळी भाजप-सेनेची युती न झाल्यास सेना येथे भाजपला अपशकून ठरु शकते. अशा परिस्थितीत भाजपचा मराठा चेहरा असणाऱ्या खासदार संजय धोत्रेंविरोधात 'मराठा कार्ड' वापरु शकते. अशा परिस्थितीत मतविभाजनाचा मोठा फटका येथे भाजपला बसू शकतो. आंबेडकरांची काँग्रेससोबत आघाडी झाली आणि सेना-भाजप वेगळे लढले तर अकोला मतदारसंघ भाजपच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मतदारसंख्या : २०१४ च्या लोकसभेनुसार
एकूण मतदार : 16 लाख 74 हजार 456 मतदार
पुरुष : 8 लाख 83 हजार 196
महिला : 7 लाख 91 हजार 254

जातीय/भाषिक समीकरणे :
मराठा - 25 टक्के
कुणबी - 12 टक्के
दलित - 20 टक्के
आदिवासी - 08 टक्के
अल्पसंख्यांक - 15 टक्के
इतर (माळी, धनगर, हिंदी भाषिक आणि इतर) - 20 टक्के