मुंबई: शरद पवारांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्यानं अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला. ज्या पक्षानं मला मान-सन्मान  व पदं दिली त्या पक्षाविरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं आणि राष्ट्रवादीला सोडण्याच्या किंवा अन्य शक्यतांनाही त्यांनी फेटाळून लावलं. काल झालेल्या राजीनाम्यानंतर आज अत्यंत हायव्होल्टेज पत्रकार परिषदेत त्यांनी हे खुलासे केले. यावेळी पहिल्यांदाच भावनेचा बांध फुटून अश्रू अनावर झालेले अजित पवारही पाहायला मिळाले.


काल अजित पवारानी राजीनामा दिल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. शरद पवार यांनीही काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार हे सध्याच्या राजकारणाला वैतागले असल्याचं सूचित केलं. अजित पवार यांनी आपले चिरंजीव पार्थ यांच्याकडे राजकारण सोडून शेती, उद्योग करण्याबाबत चर्चा केल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. दरम्यान, कालपासून आज ही पत्रकार परिषद होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. अखेर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहातील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सर्व शंका-कुशंकांना पूर्णविराम दिला. या पत्रकारपरिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार व छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील हे नेते उपस्थित होते.

माझा राजीनामा

अजित पवार यावेळी म्हणाले की, माझ्या अचानक राजीनाम्यानं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वेदना झाल्या. मी कुणालाही कल्पना दिली असती तर त्यांनी राजीनामा द्यायला नाहीच म्हटलं असतं. मात्र, त्यांच्या मनाला दुखावल्यानं मी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना कल्पना दिली होती. काही दिवसांपूर्वीपासून हे विचार माझ्या मनात येत होते, मात्र निवडणुकीच्या काळात पक्षाला अडचणीत टाकावं का, असंही वाटत होतं.

२५ हजार कोटी, २५ हजार कोटी!

आम्ही सारे सहकारी बँकांवर काम करत होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि अन्य पक्षातले लोकही सहकारी क्षेत्रात काम करत होते. या प्रकरणावर चौकशी होत असताना सहकार मंत्र्यांनी १ हजार कोटी रूपयांची इतर अनियमितता झाल्याचं म्हटलं. एकूण २५ हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. मात्र, १० हजार कोटीच्या ठेवी असलेल्या बँकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल? असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला. बँक अस्तित्वात आल्यापासून धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख असे नेते तसंच गोयल, श्रीवास्तव असे अधिकारी यांनीही यावर काम केलंय. ही शिखर बँक आहे. चांदा ते बांदा लोक इथं प्रतिनिधीत्व करतात. दुष्काळ पडला, काही अडचणी आल्या तर, 'आऊट ऑफ वे' जाऊन मदत करावी लागते. धनंजय महाडिक, विनय कोरे, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना 'आऊट ऑफ वे' जाऊनच सरकारनं मदत केली. हा सरकारचा अधिकार आहे. कारखाने अडचणीत आल्यास नाबार्ड, सरकार कर्ज देतं, शून्य टक्यानं कर्ज देतं. सगळं कर्ज फिटलं आहे. राज्य सरकारची गॅरंटी आहे.  यंदा ही बँक २८५ कोटी नेट प्रॉफिटमध्ये आहे.

शरद पवार ते अजित पवार कालपासूनच्या सर्व घटनांचा आढावा

म्हणून मी ईडी-पवार भेटीत सोबत नव्हतो....

१०० कोटींपेक्षा जास्त रकमेचं असल्यानं हे प्रकरण ईडीकडे गेलं. शरद पवारांचा कोणताही संबंध नाही, ते संचालक नाहीत, काही ठिकाणी सभासद आहेत, असं असताना पवार साहेबांचं नाव बातम्यात आलं. मी मनाला विचारलं की साहेबांचं नाव का? अजित पवार-शरद पवार यांच्यातल्या नात्यांमुळे त्यांचं नाव आलं का? मी विचार करत होतो की आपण राजीनामा दिला पाहिजे, आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागतेय. म्हणून मी कुणालाही न सांगता राजीनामा दिला. मी माझा फोन बंद केला. मुंबईत एका नातेवाईकांकडे थांबलो. साहेबांची या वयात  बदनामी झाली यामुळे अस्वस्थ होतो. हे प्रकरण २०१९मध्येच कसं बाहेर आलं?  उद्विग्न व अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी मला विचारलं की कशाला राजीनामा देता, पण मी त्यांना म्हणालो की नंतर सांगेन. राष्ट्रवादीत काही अडचणीमुळे राजीनामा देतोय का, असंही त्यांना वाटलं पण मी त्यांना व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं. मला विचारलं गेलं की ईडीच्या प्रकरणात मी पवारांबरोबर का नव्हतो. कारण, मी बारामतीमध्ये पूरस्थिती पाहत होतो. मदत कार्यात होतो. रात्री निघायचं होतं, मात्र पुण्यातून निघालो तर वाटेत पवारांच्या ईडी भेटीला पाठिंबा देणाऱ्यांची खूप गर्दी होती. म्हणून येता आलं नाही. मग, चित्र रंगवलं गेलं की अजित पवार आले नाहीत. ज्या पक्षानं अनेक मान-सन्मान मान दिले, त्या पक्षाच्या विरोधात काहीही करणार नाही.

गृहकलह नाही, पवार साहेबच आमचे कुटुंबप्रमुख!

आम्ही पवार कुटुंबिय अनेक वर्ष एकत्र काम करतोय. आजदेखील पवार साहेब सांगतील तसंच आम्ही करतो. मात्र, गृहकलह असं का पसरवलं जातं? आधी माझ्यावेळी, मग सुप्रिया, पार्थ आणि आता रोहितच्यावेळीही असं रंगवलं जातं. काल पवार म्हणाले तेच खरं  आहे. आमचं घर मोठं आहे. ज्येष्ठ व्यक्ती जे सांगतात तसं घडतं. पवारसाहेबांशी बोललो. मी म्हणालो की मी पुण्याला येतो.  मात्र, तेच म्हणाले की मीच मुंबईला येतो. त्यांना १ वा. भेटलो, भूमिका सांगितली. त्यांनीही मला जे सांगायचं ते संगितलं. त्यांनीच मला सांगितलं की पत्रकार परिषद घेऊन काय ते सांग.

...आणि भावूक अजित पवार

मागीलवेळी सिंचन घोटाळ्याबाबतही असेच आरोप झाले. ७० हजार कोटी रूपये म्हणे! पण, खात्याकडे पैसा किती आला, पगारासाठी, भूसंपादनासाठी, कामासाठी किती खर्च झाला याचा विचार का झाला नाही? त्यावेळीही नाराज होतो. त्या प्रकरणाची चौकशी किती वर्ष चाललीये? आता काय तर २५ हजार कोटींचा घोटाळा, एखाद्याला वाटेल की अजितचं हजारशिवाय चालतंच नाही. या ठिकाणी अजित पवारांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

कुटुंबियांसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया



वाचा : शरद पवार ते अजित पवार कालपासूनच्या सर्व घटनांचा आढावा